रेतीचा ट्रॅक्टर सोडल्याचे प्रकरण, एसडीपीओंनी नोंदविले जबाब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:19 AM2021-05-07T04:19:57+5:302021-05-07T04:19:57+5:30
पिंपळखुटा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच, चान्नी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पिंपळखुटा येथून राहेरकडे विनापरवाना रेतीने ...
पिंपळखुटा नदीपात्रातून विनापरवाना वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच, चान्नी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पिंपळखुटा येथून राहेरकडे विनापरवाना रेतीने भरलेला ट्रॅक्टर-ट्रॉली आढळून आला. पोलिसांनी रेती वाहतुकीचा परवाना नसतानाही ट्रॅक्टर मालकाशी फोनवर बोलून अवघ्या आठ मिनिटात रेतीने भरलेला ट्रॅक्टर परस्पर सोडून दिला. त्यामुळे काही ग्रामस्थांनी तहसीलदार दीपक बाजड यांच्याकडे तक्रार केली.
एसीपीओंची पोलीस ठाण्यात भेट
पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांनी परस्पर ट्रॅक्टर सोडला. या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशावरून बाळापूरचे प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी दत्तात्रय आव्हाडे यांनी चान्नी पोलीस स्टेशनला ५ मे रोजी भेट देऊन ट्रॅक्टर मालकासह काही पोलिसांचे जबाब नोंदवून अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर केला आहे. त्यामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पोलीस व ट्रॅक्टर मालकाच्या जबाबात तफावत
विनापरवाना वाळूचा ट्रॅक्टर सोडल्यानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षकाने ट्रॅक्टर-ट्रॉलीतून चालकाने रेती खाली केल्याचे सांगितले होते आणि एसडीपीओंनी नोंदविलेल्या जबाबात ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून दगड खाली करून परत येत असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस व ट्रॅक्टर मालकाच्या जबाबात तफावत असल्याचे दिसून येत आहे.