अतिवृष्टीचा तडाखा : होलसेल किराणा धान्य बाजारातील दुकानांमध्ये शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 10:45 AM2021-07-25T10:45:46+5:302021-07-25T10:46:48+5:30

Heavy rains hit grocery stores : दुकानांमधील धान्य, कडधान्य, डाळी आणि किराणा साहित्य भिजल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे.

Heavy rains hit: Water seeps into wholesale grocery stores | अतिवृष्टीचा तडाखा : होलसेल किराणा धान्य बाजारातील दुकानांमध्ये शिरले पाणी

अतिवृष्टीचा तडाखा : होलसेल किराणा धान्य बाजारातील दुकानांमध्ये शिरले पाणी

googlenewsNext

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात अकोला शहरातील होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानांमधील धान्य, कडधान्य, डाळी आणि किराणा साहित्य भिजल्याने दुर्गंधी पसरली असून, दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बुधवार, २१ जुलै रोजी जिल्हयात रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, अतिवृष्टी झाल्याने गुरुवार २२ जुलै रोजी जिल्हयातील नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात शेती आणि पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्येच अकोला शहरातील गंगा नगर भागात होलसेल किराणा व धान्य बाजाराला अतिवृष्टीचा तडाखा बसला. होलसेल मार्केटमधील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानामधील धान्य, कडधान्य, विविध प्रकारच्या डाळींची पोती तसेच किराणा साहित्य पाण्यात भिजले. धान्य, डाळी आणि किराणा साहित्य भिजल्याने दुर्गंधी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या तडाख्यात होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

डाळी आणि किराणा साहित्य!

पावसाचे पाणी दीड ते दोन फूट दुकानांमध्ये शिरल्याने, दुकानांमधील मूग, उडीद, हरभरा, तूर, मसूर, मठ, बरबटी, हरभरा इत्यादी प्रकारच्या डाळी तसेच काबुली हरभरा, वाटाणा, तांदूळ असे धान्य आणि खडीसाखर, चारोळी, काजू, सोयावडी, जिरे, खोबराखिस, हळद, चिंच, सोप आदी प्रकारचे किराणा साहित्य भिजले आहे. पाण्यात भिजलेल्या धान्य व साहित्याची दुर्गंधी पसरली आहे.

‘चारोळी’वर चढली बुरशी!

दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने धान्य, डाळी व विविध किराणा साहित्य पाण्यात भिजले. त्यामध्ये पाण्यात भिजलेल्या चारोळीचे खडे तयार झाले असून, त्यावर बुरशी पसरल्याचे चित्र एका दुकानात आढळून आले.

 

भिजलेल्या बरबटीला फुटले कोंब; वाटाणा, हरभरा, मठाच्या घुगऱ्या!

अतिवृष्टीच्या तडाख्यात पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने कडधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामध्ये पाण्यात भिजलेल्या बरबटीला पोत्यातच कोंब फुटले असून, वाटाणा, हरभरा, मठ आदी कडधान्याच्या घुगऱ्या झाल्याचे वास्तव आहे.

 

नुकसानाचे पंचनामे सुरू!

अतिवृष्टीमुळे होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानाचे पंचनामे संबंधित तलाठी व कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत.

दुकानदार, व्यापारी म्हणतात....!

अतिवृष्टी झाल्याने होलसेल किराणा व धान्य बाजारातील ६० ते ७० दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानांमधील धान्य, कडधान्य व किराणा साहित्य पाण्यात भिजले असून, दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन शासनाने नुकसानग्रस्त दुकानदारांना मदत दिली पाहिजे.

रमाकांत खेतान

अध्यक्ष, होलसेल किराणा व धान्य मार्केट सोसायटी, अकोला.

 

 

दुकानात दीड फूट पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे दुकानातील कडधान्ये, डाळी व इतर साहित्य भिजले असून, पाण्यात भिजलेल्या धान्याची दुर्गंधी येत असल्याने हे धान्य व कडधान्ये उपयोगात येणार नाही. नुकसानाचे पंचनामे सुरू असून, नुकसान भरपाईची मदत तातडीने मिळण्याची गरज आहे.

श्यामलाल

दुकानदार, होलसेल किराणा व धान्य बाजार.

 

होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने धान्य, कडधान्ये व विविध किराणा साहित्य भिजले. त्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून, तीन दिवस उलटल्यानंतरही अद्याप नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले नाही. पंचनामे तातडीने पूर्ण करून, दुकानदारांना तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.

मनोहर पंजवाणी

व्यापारी, अकोला.

 

Web Title: Heavy rains hit: Water seeps into wholesale grocery stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.