भुयारीच्या ठेकेदाराने रस्त्यावर काढली खडीची रांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:26 AM2021-02-25T04:26:52+5:302021-02-25T04:26:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : भूमिगत पाइप टाकून झाल्यानंतर भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालय ते जुने महापालिका कार्यालय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : भूमिगत पाइप टाकून झाल्यानंतर भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालय ते जुने महापालिका कार्यालय रस्त्यावर अक्षरश: बारीक खडीची रांगोळीच घातली आहे. खडीवरून वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. मनपाच्या अभियत्यांनीही याबाबत बघ्याची भूमिका घेतल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेने शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारीचे काम हाती घेतले आहे. रस्ते खोदून त्यात काळे पाइप टाकले जात आहेत. हे काम गेल्या मार्चपासून सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते जुनी महापालिका कार्यालय मार्गावर पाइप टाकून झाले आहेत. हे काम होऊन चार महिन्यांचा कालावधी उलटून गेला. पाइप टाकून झाल्यानंतर, रस्त्याचा खोदलेला भाग बुजविणे, त्यावर खडी आणि नंतर डांबरीकरण, ही कामे करणे ठेकेदारावर बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदाराने खोदलेले रस्ते चार महिने उलटूनही बुजविले नाहीत. त्यामुळे रस्त्यावर कमालीची धूळ झाली आहे. महापालिकेवर टीका झाल्याने ठेकेदाराला याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ठेकेदाराने रस्त्याचा खोदलेला भाग बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाची सुरुवात ठेकेदाराने जिल्हाधिकारी कार्यालय ते जुने मनपा कार्यालय या रस्त्यापासून केली. ठेकेदाराने रस्त्याचा जेवढा भाग खोदला होता, तेवढ्या भागात खडी टाकली जात आहे. विशेष म्हणजे, ही खडी पूर्णपणे मोकळी आहे. वाहनांमुळे खडी रस्त्यावर पसरली गेली असून, त्यावरून वाहने घसरत आहेत. काही ठिकाणी तर खडीचा त्रिकोण पाहायला मिळत असून, या कामावर नेमणूक असलेल्या अभियंत्यांकडून याकडे डोळेझाक केली जात आहे. हे विशेष.
....
एमजीपीच्या अभियंते गेले कुठे?
महापालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी सल्लागार संस्था म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे. भुयारी गटारीचे पाइप टाकून झाल्यानंतर रस्त्यांच्या केल्या जाणाऱ्या दुरुस्तीकडे कुणाचेच लक्ष नाही. महापालिकेच्या अभियंत्यांनी तर याकडे डोळेझाक केलीच आहे, पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (एमजीपी) अभियंतेही तिकडे फिरकायला तयार नाहीत. त्यामुळे एमजीपीचे अभियंते गेले कुठे, असा सवाल या परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.