विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते मंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 02:56 PM2019-08-20T14:56:07+5:302019-08-20T14:56:19+5:30

जनसेवेची परंपरा नि:स्वार्थपणे निभावणारे प्रा. एस. एम. आय़ असीर हे जिल्ह्यातील आगळे नाव. मूळचा शिक्षकाचा पिंड असलेले सर राजकारणासारख्या क्षेत्रात आले आणि कर्तृत्वाने राज्याच्या राजकारणात आघाडीवर पोहोचले. एक विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते कॅबिनेट मंत्री हा त्यांचा प्रवास नव्या पिढीला कदाचित माहीत नसेल. सध्याच्या ‘कौटुंबिक’ राजकारणाच्या युगात सरांसारखे ध्येयवादी, तत्त्वनिष्ठ कार्यकर्ते म्हणूनच दखलपात्र ठरतात.

Student-friendly professor to minister | विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते मंत्री

विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ते मंत्री

Next

अहमदनगर : अहमदनगर शहर हे कॉस्मोपॉलिटीन शहर म्हणून ओळखले जाते. सर्व धर्म, जाती, पंथाचे लोक या शहरात गुण्यागोविंदाने राहतात. किंबहुना बहुभाषिकेतील एकता इथे पहायला मिळते. ऐक्याचा एक वस्तूपाठ या शहराने घालून दिला आहे. नगरची माती आणि भूमी त्यागाची, समर्पणाची आहे. राजकारण, समाजकारण, उद्योग-अर्थ, क्रीडा, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात नगरी माणसाने आपली अमीट छाप उमटवली आहे. त्यामध्ये असीर यांचे एक नाव घेतले जाते. 
१० जून १९२७ रोजी त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. सरांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण नगर आणि पुणे येथे झाले. विद्यार्थी दशेत असताना स्वातंत्र्य चळवळीच्या भारावलेल्या वातावरणात महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद आदी नेत्यांच्या भाषणांचा त्यांचेवर प्रभाव पडला. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी १९४० मध्ये त्यांनी रावसाहेब पटवर्धन यांच्या प्रेरणेने काँग्रेस सेवादलात प्रवेश केला. १९४२ च्या चले जाव आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. पुण्याहून नगरला रोज बुलेटिन्स आणून वाटण्याचे काम केले. एकदा याच काळात ते पोलिसांच्या तावडीत सापडले. काही काळ तुरुंगवासही पत्करावा लागला. सेवादलात काम करताना स्वयंसेवकांची फळी उभारणे, सभा, मेळावे आयोजनात त्यांचा पुढाकार असायचा. राष्टÑीय ऐक्य, सामाजिक सुधारणा याविषयी विविध नियतकालिकात त्यांनी लेखन केले. नगर कॉलेजमध्ये अध्यापन नंतर इंग्रजीचे वर्ग घेतले.
१९५२ मध्ये सरांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा नगर जिल्हा हा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. २५ वर्षांच्या पक्षकार्यात त्यांनी शहर काँग्रेस आणि १३ वर्ष जिल्हा काँग्रेसचे सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. या कालखंडात काँग्रेस विचार जनतेपर्यंत पोहोचविला.
आणीबाणीनंतरच्या कालखंडात नगर जिल्हा  अर्स काँग्रेसचा बालेकिल्ला होता. जिल्ह्यातील साखर कारखाने, जिल्हा बँक, जिल्हा परिषद अर्स काँग्रेसच्या ताब्यात होती. शंकरराव काळे, बबनराव ढाकणे आणि गोविंदराव आदिक हे तत्कालीन पुलोद सरकारमध्ये मंत्री होते. या परिस्थितीत इंदिरा काँग्रेसने १९७८ ची विधानसभा निवडणूक लढविली. प्रतिकूल परिस्थिती आणि जनता लाट असताना या पक्षाच्या उमेदवारांना दुसºया क्रमांकाची मते मिळाली. तत्पूर्वी २६ जानेवारी १९७७ मध्ये प्रा.असीर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. जिल्ह्यात इंदिरा काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी इंदिरा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांचे निवासस्थान हेच पक्षाचे कार्यालय बनले. मोजक्या सहकाºयांसह त्यांनी जिल्ह्यात काँग्रेस (आय)ची बांधणी केली. तत्कालीन जनता पक्षाच्या केंद्र सरकारने इंदिराजींविरुद्ध अनेक चौकशी आयोग नेमून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. देशभर कार्यकर्त्यांनी याविरुद्ध निदर्शने केली. नगर जिल्ह्यातही प्रा. असीर यांचेसह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यामुळे पुन्हा सरांना कार्यकर्त्यांसमवेत तुरुंगवास पत्करावा लागला.
इंदिराजींची शहा आयोगासमोर चौकशी चालू होती. बॅरिस्टर रामराव आदिक  इंदिराजींची बाजू मांडत होते. आदिक हे असीर सरांचे वर्गमित्र असल्याने तेही त्यांचेबरोबर या कामासाठी दिल्लीला जात असत. असीर सरांच्या आग्रहानेच आदिकांनी इंदिराजींची बाजू न्यायालयात मांडली. याच काळात गांधी घराण्याशी सरांचे ऋणानुबंध निर्माण झाले.
राजकीय कारकिर्दीत १९६० साली असीर सर नगरपालिका निवडणुकीत तारा (स्टार) चिन्हावर विजयी झाले. तेव्हा पाच वॉर्ड होते. वीस वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले. धुप्पड नगराध्यक्ष असताना सरांनी उपनगराध्यक्ष पदही भूषविले. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नवनीतभाई बार्शीकर विजयी झाले होते तर असीर सर दुसºया क्रमांकावर होते.
समाजातील उपेक्षित, गरीब वर्गाविषयी त्यांना सहानुभूती होती.  झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नात सरांनी आस्थेने लक्ष घातले. प्राथमिक गरजा, निवारा, आरोग्य, शिक्षण सोयी त्यांना मिळवून दिल्या. श्रमिक, कष्टकरी, विडी कामगार, विणकर कामगार, ट्रक ड्रायव्हर, क्लिनर, रिक्षा चालक यांच्या संघटना स्थापन करून त्यांना न्याय मिळवून दिला. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनांच्या  माध्यमातून पदाधिकारी म्हणून काम केले.
मुस्लिम समाजातील गोरगरीब मुला-मुलींना शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी ए.टी.यु. चाँद सुलताना हायस्कूलच्या स्थापनेत पुढाकार घेतला. या संस्थेचे उपाध्यक्ष, विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिले. चाँद सुलताना हायस्कूलने शिक्षणाची नवी दारे उघडून दिली. इथे शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी पुढे विविध क्षेत्रात चमकले. नगरमधील यतीमखाना या संस्थेतही सुरुवातीच्या तीन वर्षात अध्यक्ष म्हणून सरांनी जबाबदारी पार पाडली. यतीमखाना संस्थेच्या माध्यमातून अनाथ बालकांना मायेची उब मिळाली. नगरपालिकेचे उपाध्यक्ष असताना सरांनी शहराच्या पाणी प्रश्नात लक्ष घातले. चौकाचौकात सार्वजनिक नळ सुरू करण्याची योजना अंमलात आणली. पिंपळगाव तलावाच्या जमिनीत उसाचे पीक घेण्याची योजना आखली. पालिका शिक्षण समितीचे चेअरमन असताना या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले.
१९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सरांना इंदिरा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली. शहर मतदारसंघातून ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. असीर सरांना विजयी करून नगरच्या सर्वधर्मीय जनतेने त्यांच्या प्रती वाटणारा आदर, विश्वास व्यक्त केला होता. आमदार म्हणून काम करीत असताना जिल्हा भूविकास बँकेचे संचालकपद त्यांचेकडे आले. बँकेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकºयांना कर्जपुरवठा केला. संजय गांधी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य केले. यासाठी सरांनी मार्गदर्शन केले.
प्रा.असीर यांच्या नेतृत्वाखाली १९८० साली झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात इंदिरा काँग्रेसचे नऊ आमदार विजयी झाले होते. तर बाळासाहेब विखे आणि चंद्रभान आठरे पाटील लोकसभेवर निवडून गेले होते.
२५ जानेवारी १९८२ ला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना राज्य मंत्रिमंडळात त्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला. नगर शहराच्या आमदाराला राज्य मंत्रिमंडळात काम करण्याची संधी सरांच्या रूपाने मिळाली. पुढे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असतानाही सर मंत्री होते. राज्य मंत्रिमंडळात ऊर्जा, परिवहन, तुरुंग, वक्फ आणि पर्यटन, राजशिष्टाचार अशा विविध खात्यांचा कार्यभार सरांनी कार्यक्षमतेने पाहिला. बॅ. ए.आर. अंतुले मुख्यमंत्री असताना पब्लिक अंडरटेकिंग कमिटीच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. सोपविलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडली.
पुढे महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी असीर सरांची निवड करून इंदिराजींनी त्यांचेवर आणखी विश्वास व्यक्त केला. १९८४-८५ मध्ये महाराष्टÑात विविध जिल्ह्यात दौरे करत सरांनी काँग्रेस पक्ष मजबूत केला. एकाच वेळी मंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी कार्यक्षमतेने हाताळले. असीर सर मंत्री असताना शहरातील तारकपूर बसस्थानक, कार्यशाळेचे काम झाले. आय.टी.आय.मध्येही नवीन कोर्सेस सुरू झाले. नगर-पुणे टॅक्सी सुविधा सुरू होऊन प्रवाशांची सोय झाली. मतदारसंघातील विविध विकासाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले.
सामाजिक राजकीय जीवनात वावरताना ते अत्यंत साधेपणाने जगले. पदाचा कुठलाही बडेजाव त्यांनी मिरविला नाही. त्यांचे निवासस्थान २४ तास गोरगरीब, सामान्य जनतेसाठी कायम खुले असायचे. किंबहुना मुंबईतही त्यांचे निवासस्थान म्हणजे नगरच्या लोकांचे दुसरे घर होते. शासकीय योजनांचा कुठलाही गैरफायदा त्यांनी घेतला नाही. जिथे जात तिथे त्यांना मान-सन्मान मिळायचा. राजकारणात विरोधकांबरोबरही सौहार्दाची त्यांची वागणूक असायची. मनात वैरभाव न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागले, अशा भावना सरांचे जावई मुन्नाशेठ चमडेवाले आणि कन्या सौ.फरहत चमडेवाले यांनी व्यक्त केल्या.
सौ.फरहत म्हणाल्या, मुंबईतही राजकीय व्यापात असतानाही ते परिवारासाठी वेळ द्यायचे. सायंकाळी सर्वांसोबत जेवण घ्यायचे. आमची विचारपूस करायचे. माझ्यासह बहिणींच्या मैत्रिणी, अभ्यास अशा बाबींवर त्यांचे लक्ष असायचे. मी तेव्हा दहावीत होते. आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले. सर्वोत्तम शिक्षण दिले. त्याचबरोबर माझ्या आत्यांनाही तशीच वागणूक दिली. त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे आम्हाला ते आईपेक्षाही जवळचे वाटायचे. १९८५ मध्ये मंत्री, आमदार नसतानाही ते सामान्यांच्या प्रश्नांसाठी  जागरूक राहिले. ९५ पर्यंत मुंबईला एका छोट्या फ्लॅटमध्ये त्यांचे वास्तव्य असायचे. या काळातही नगरहून शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नागरिक यांची निवास-भोजनाची व्यवस्था अगत्याने करायचे. नगरहून आलेल्या व्यक्तीला पाहून त्यांना आनंद व्हायचा. त्यांना सर्वतोपरी मदत करायचे. १९९५ नंतर त्यांचे वास्तव्य नगरमध्येच होते.
अध्यापक असलेले सर युवा अवस्थेत उत्कृष्ट क्रिकेटपटू होते. फिरकी गोलंदाजी, फलंदाजी यात ते प्रवीण होते. रणजी पातळीपर्यंत ते क्रिकेट खेळले. खेळाडू वृत्तीने वावरले. त्यांच्या आयुष्यात चढ-उतार आले परंतु पक्षनिष्ठा, तत्त्वनिष्ठा आणि सर्वांप्रति आदर-स्नेह कायम जपला. नागरदेवळे परिसरात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आयटीआय, उर्दूू हायस्कूल सुरू केले. १९ आॅक्टोबर १९९८ रोजी त्यांचे निधन झाले. सरांच्या पश्चात त्यांच्या पत्नी पै. श्रीमती मेहरूनिसा असीर, तीन कन्या, जावई, नातू असा परिवार आहे. मोठी कन्या फरहत या इंग्रजी साहित्यात बी.ए. आहेत. तलत या दुसºया कन्या एलएलबी अ‍ॅडव्होकेट असून, इशरत बी.ए. या फॅशन डिझायनर म्हणून मुंबईत कार्यरत आहेत. सरांचे व्याही पै. उस्मानशेठ चमडेवाले पालिकेत दीर्घकाळ उपनगराध्यक्ष, नगरसेवक म्हणून कार्यरत होते. सध्या ज्येष्ठ जावई मुन्नाशेठ चमडेवाले राष्टÑवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश पदाधिकारी आहेत. सरांचा राजकीय, सामाजिक ऐक्याचा वारसा असीर आणि चमडेवाला परिवार त्याच आस्थेने जपत आहेत.

विनायक डिक्कर (संपादकीय विभाग, लोकमत),  

 (लेखातील संदर्भ प्रा. असीर यांच्या कन्या फरहत आणि जावई मुन्नाशेठ चमडेवाले  यांच्याकडून उपलब्ध झाले आहेत.)

Web Title: Student-friendly professor to minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.