श्रीरामपूरने दिली कॉंग्रेसलाच साथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 04:54 PM2019-10-25T16:54:54+5:302019-10-25T16:55:30+5:30

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विजयामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे या साखर कारखानदारांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतेही फुटली. या विजयामुळे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना राजकीय उभारी मिळणार आहे. पक्षबदलामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांची जी अवस्था केली तीच अवस्था मतदारांनी कांबळे यांची केली.

Shrirampur joins Congress | श्रीरामपूरने दिली कॉंग्रेसलाच साथ 

श्रीरामपूरने दिली कॉंग्रेसलाच साथ 

googlenewsNext

श्रीरामपूर विधानसभा निवडणूक विश्लेषण - शिवाजी पवार । 
श्रीरामपूर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे लहू कानडे यांच्या विजयामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे व माजी आमदार भानुदास मुरकुटे या साखर कारखानदारांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना व भारतीय जनता पक्षाची पारंपरिक मतेही फुटली. या विजयामुळे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना राजकीय उभारी मिळणार आहे. पक्षबदलामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांची जी अवस्था केली तीच अवस्था मतदारांनी कांबळे यांची केली. 
सलग पाच वेळा येथे काँग्रेसने गड राखत वर्चस्व सिद्ध केले. श्रीरामपुरात आजवर काँग्रेस पक्षाने १९ हजार मतांनी मिळविलेला हा सर्वात मोठा विजय ठरला. विशेष म्हणजे दिवंगत जयंत ससाणे यांनाही एवढे मताधिक्य मिळविता आले नव्हते. एमआयएम, वंचित आघाडी तसेच अपक्ष उमेदवार रामचंद्र जाधव हे काँग्रेसची मते खाण्यात निष्प्रभ ठरले.
श्रीरामपुरचा निकाल अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे व भानुदास मुरकुटे यांची येथे युती झाली. सोबतीला शिवसेना, भारतीय जनता पक्ष, सभापती दीपक पटारे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले अशी प्रस्थापितांची यंत्रणा कांबळेंच्या पाठीशी उभी राहिली. याउलट काँग्रेसचा किल्ला करण ससाणे गटाने लढविला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनीही अखेरच्या टप्प्यात जोरदार प्रचार राबविला. 
प्रारंभी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या टप्प्यात चुरशीची बनली. कांबळे यांचा प्रशासनावर कुठलाही वचक नाही, असा आरोपही केला गेला. तो कांबळे यांना अखेरपर्यंत खोडून काढता आला नाही. खासदार सदाशिव लोखंडे प्रचारात फारसे सक्रीय नव्हते. अनेक शिवसैनिकही प्रचारात नव्हते. 
विखे-थोरात संघर्षाची किनार
श्रीरामपूर तालुका दत्तक घेऊन येथील विकासाची बांधिलकी स्वीकारण्याची तयारी विखे यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. त्याविरोधातही जनतेतून प्रतिक्रिया उमटली. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात विखे यांचे येथील अतिक्रमण हाच मुद्दा पुढे रेटला गेला. याउलट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी श्रीरामपुरातील हस्तक्षेप टाळत करण ससाणे यांच्यावर विश्वास दाखविला़ थोरातांचा हा मुत्सदीपणा मतदारांना भावला तर विखेंचा हस्तक्षेप चांगलाच खटकला असल्याचेही दिसते़
 विकासाच्या विचाराला हा विजय समर्पित
जात्यंध शक्तीविरोधात सर्वांना सोबत घेऊन जाणा-या विचारांचा, सर्वधर्म समभाव मानणा-या विचारांचा हा विजय आहे. दिवंगत गोविंदराव आदिक, जयंतराव ससाणे यांनी केलेल्या विकासाच्या विचाराला हा विजय समर्पित करतो. निष्क्रियतेविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. श्रीरामपूर मतदारसंघात विकासाचे चक्र अधिक गतिमान करणार आहे, असे आमदार लहू कानडे यांंनी सांगितले. 
    

Web Title: Shrirampur joins Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.