पाणी चोरी करणारे सात जण पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:19 AM2021-07-25T04:19:44+5:302021-07-25T04:19:44+5:30
तिसगाव : पाथर्डी व नगर तालुक्यातील ३३ गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या मुख्य पाईपलाईन मधूनच पाणी चोरी ...
तिसगाव : पाथर्डी व नगर तालुक्यातील ३३ गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या मुख्य पाईपलाईन मधूनच पाणी चोरी करणाऱ्या सात व्यक्तींना या योजनेच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला.
यामध्ये कात्रड येथे सहा जण तर उदलमल येथील एक अशा सात व्यक्तींनी मुख्य पाईपलाईनला अनधिकृतपणे कनेक्शन घेऊन पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी ही हे पाणी वापरत होते. पाऊस लांबल्याने या योजनेंतर्गत येणाऱ्या अनेक गावांची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता तसेच तिसगाव-मिरी सारख्या टेलच्या गावांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः गेल्या काही दिवसांपासून या योजनेमध्ये विशेष लक्ष घालून या योजनेचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली.
या योजनेमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या. मुळा धरणापासून पांढरीपूल पर्यंत मुख्य पाईपलाईन व एअर वॉलमधून काही पाणी चोरी होत आहे का? एअर वॉल लिक आहेत का? याची खातरजमा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. मागणीनुसार प्रत्येक लाभधारक गावाला पिण्याचे पाणी पूर्ण दाबाने मिळालेच पाहिजे, अशाही सूचना त्यांनी दिल्या. पाईपलाईन मधून कोणी अनधिकृतपणे पाणी चोरी करताना आढळून आल्यास तो कोणत्याही पक्षाचा, पार्टीचा असू द्या त्याच्यावर कारवाई करा. असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे योजनेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही तत्काळ पाणी चोरी शोधणे सुरू केले.
शुक्रवारी कात्रड येथे सहा जण मुख्य पाईपलाईन मधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी घेत असल्याचे आढळून आले. तर उदलमल येथे एकजण या योजनेचा एअर वॉल नादुरुस्त करून पाणी घेत असल्याचे आढळले, अशी माहिती या योजनेचे सचिव ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब सावंत व नितीन काचोळे यांनी दिली.
---
‘त्या’ व्यक्तींवर फौजदारी दाखल करणार
मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजनेच्या पाईपलाईन व एअर वॉल मधून अनधिकृतपणे कनेक्शन घेणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोणीही मुख्य पाईपलाईन अथवा एअर वॉलची छेडछाड करून नये, असे आवाहन या योजनेचे सचिव भाऊसाहेब सावंत यांनी केले आहे.