संत साहित्य सामान्यांपर्यंत पोहचावे, चिदंबरेश्वर महाराज साखरे यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 01:08 PM2021-02-24T13:08:00+5:302021-02-24T13:08:12+5:30
मानवी जीवनाचा उत्कर्ष हीच प्रत्येक साहित्य निर्मितीमागील प्रेरणा असावी. बदलत्या आधुनिक तंत्रासोबत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवणारा जीवनमंत्र देणारे संत साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सारस्वतांनी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन आळंदी येथील चिदंबरेश्वर महाराज साखरे यांनी केले.
शेवगाव : मानवी जीवनाचा उत्कर्ष हीच प्रत्येक साहित्य निर्मितीमागील प्रेरणा असावी. बदलत्या आधुनिक तंत्रासोबत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवणारा जीवनमंत्र देणारे संत साहित्य सामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सारस्वतांनी स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन आळंदी येथील चिदंबरेश्वर महाराज साखरे यांनी केले.
महर्षी व्यासांच्या समकालीन ऋषी श्री दलादन मुनी यांनी दत्त महात्म्यपर लिहिलेल्या व आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी संशोधित केलेल्या संस्कृत स्तोत्रांचा मराठी अनुवाद प्राचार्य रमेश भारदे यांनी ‘दत्तलहरी’ या पुस्तक रूपाने केला आहे. या साहित्यकृतीचे प्रकाशन साधकाश्रम आळंदी येथील चिदंबरेश्वर महाराज साखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पाश्चात्त्यांच्या विकृतीचे अंधानुकरण न करता आपल्या धर्म संस्कृतीचा आदर्श विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम राष्ट्रनिर्मितीसाठी कार्यक्षम बनवणारे शिक्षण शाळेतून मिळायला हवे.
अध्यक्षस्थान माजी प्राचार्य एस. व्ही. कुलकर्णी त्यांनी भूषवले. यावेळी भागवताचार्य दिनकर महाराज अंचवले, वारकरीभूषण राम महाराज झिंजुर्के, अजित देशपांडे, अरुंधती देशपांडे, वृंदा कुलकर्णी, बापूसाहेब भोसले, मुकुंद कुलकर्णी, श्यामसुंदर भारदे, हरीश भारदे, प्रसाद भारदे, प्राचार्य मदन मुळे, भारदे साक्षरता प्रसारक मंडळाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते.