आश्वासनानंतर नेवाशातील पदविकाधारकांचे उपोषण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:12+5:302021-07-30T04:23:12+5:30
नेवासा : एमसीएईआरच्या अधिकाऱ्यांनी कृषी पदविकाधारकांच्या कृषी पदविकेसाठीच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नेवासा तहसीलसमोरील ...
नेवासा : एमसीएईआरच्या अधिकाऱ्यांनी कृषी पदविकाधारकांच्या कृषी पदविकेसाठीच्या प्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर सकारात्मक चर्चा होत असल्याचे आश्वासन दिल्यानंतर नेवासा तहसीलसमोरील सुरू असलेले उपोषण बुधवारी स्थगित करण्यात आले.
बीएस्सी ॲग्रीसाठी प्रवेश द्या, अन्यथा इच्छा मरणाला परवानगी द्या, अशी मागणी करत कृषी पदविकाधारक यज्ञेश नागोडे याने इतर मुलांसह तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केले होते. तीन वर्षाच्या कृषी पदविकेनंतर बीएस्सी ॲग्रीच्या पदवीसाठी दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळत असे. परंतु, या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या बॅचला या सुविधेपासून वंचित ठेवण्यात आले होते. हा चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. राज्यातील दोन हजार विद्यार्थी यामुळे नैराश्यात आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. सलग ४६ तासांच्या उपोषणानंतर निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी, नायब तहसीलदार राजेंद्र गायकवाड यांनी कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली. अधिकाऱ्यांनी प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले. त्यांनी उपोषण थांबविण्याचे आवाहन केले. यानंतर चांगदेव महाराज काळे, यज्ञेशचे वडील संजय नागोडे, सरपंच सचिन नागोडे, बबनराव नागोडे, रमेश राजगिरे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, स्वप्नील मापारी, प्रशांत देशमुख यांच्या उपस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले.
290721\img-20210728-wa0042.jpg
नेवासा : आश्वासनानंतर पदविकाधारकाचे उपोषण स्थगित....