जि. प.ची सर्वसाधारण सभा सभागृहात घेणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:26 AM2021-02-25T04:26:50+5:302021-02-25T04:26:50+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेत येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणारी सर्वसाधारण सभा कोरोना नियमांचे पालन करून जिल्हा परिषदेच्या सभागृहातच घेणे ...
अहमदनगर : जिल्हा परिषदेत येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणारी सर्वसाधारण सभा कोरोना नियमांचे पालन करून जिल्हा परिषदेच्या सभागृहातच घेणे शक्य आहे. अधिकारी, पदाधिकार्यांनी तशी इच्छाशक्ती दाखवावी. सभेसमोर सुमारे ४० विषय असल्याने त्यावर सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. केवळ नियमांचा बाऊ करून ॲानलाईन सभेचा अट्टाहास योग्य नाही, अशी भूमिका जि. प. सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केली आहे.
परजणे म्हणाले की, रूग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव केला आहे. परंतु खरंच तंतोतंत या आदेशाचे पालन होते का? जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा इतर मोठ्या कार्यालयांतच १०० पेक्षा जास्त कर्मचारी रोज एकत्र काम करतात. जिल्हा परिषदेत रोज सुमारे साडेतीनशे कर्मचारी व अभ्यागत मिळून पाचशे लोक एकत्र येतात. मग केवळ १०० लोकांच्या उपिस्थितीत सर्वसाधारण सभा घेणे प्रशासनाला शक्य नाही का? जिल्हा परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह दोनशे ते अडिचशे क्षमतेचे आहे. सोशल डिस्टंन्सिंग पाळून तेथे सभा सहज शक्य आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रत्यक्ष सभा झाली नसल्याने अनेक सदस्यांना विषयांवर चर्चा करण्यास संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रशासनाने ही सभा सभागृहात किंवा एखाद्या मंगल कार्यालयात घ्यावी, अशी मागणी परजणे यांनी केली आहे. दरम्यान, जि. प. सदस्य शालिनी विखे, भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे, हर्षदा काकडे आदींनीही अशीच मागणी केलेली आहे.