चितळी येथे ग्रामसेवकांविषयी नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:49+5:302021-03-08T04:21:49+5:30
तिसगाव : चितळी (ता. पाथर्डी) येथे ग्रामसेविकांविषयी ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याने वैयक्तिक दाखले व लाभांच्या योजनांबाबतही ...
तिसगाव : चितळी (ता. पाथर्डी) येथे ग्रामसेविकांविषयी ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याने वैयक्तिक दाखले व लाभांच्या योजनांबाबतही ग्रामस्थांना अडचणी येत आहेत. वित्त आयोगाचा निधी शिल्लक असूनही कामे करता येत नाहीत, अशी तक्रार नूतन सरपंच, उपसरपंचांसह सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक होऊन नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीला एक महिना सरतो ना सरतो तोच चितळीत ग्रामसेवकांविषयी नाराजीचा मुद्दा पुढे आला आहे. विकासकामे करण्यासाठी जीवाचे रान करून निवडणूक जिंकली. तीच कामे करता येत नसतील तर काय उपयोग, असा उद्विग्न सवाल सरपंच अशोक आमटे यांनी केला. उपसरपंच सुवर्णा कदम म्हणाल्या, आम्ही पदभार घेतल्यापासून ग्रामसेविका सप्ताहात केवळ दोनच दिवस येतात. भ्रमणध्वनीवर संपर्क केला तर पाथर्डी कार्यालयात बैठक आहे. तुमचे काम असेल तर पंचायत समिती कार्यालयात या, असे सांगतात. लोकांच्या अडचणींबाबत त्या गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे वरिष्ठस्तरावर तक्रार केली आहे.
--
नवीन पदाधिकारी असल्याने कामे त्वरित व्हावीत, ही अपेक्षा असते. प्रशासकीय स्तरावरील अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. चितळी गावचा पदभार दोन वर्षांपासून माझ्याकडे आहे. तक्रारींबाबत प्रशासन दरबारी खुलासा करू.
- अश्विनी कटके,
ग्रामसेविका, चितळी