आ. संग्राम जगताप जिल्हा प्रशासनावर संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:23+5:302021-04-23T04:23:23+5:30
अहमदनगर : कोरोनाने कहर माजविला असताना उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असून, प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक बंद आहेत. ...
अहमदनगर : कोरोनाने कहर माजविला असताना उपाययोजना करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असून, प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक बंद आहेत. प्रशासनाचा कारभार रामभरोसे सुरू आहे, अशा शब्दांत आ. संग्राम जगाताप यांनी गुरुवारी जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त केला.
आ. जगताप म्हणाले, जिल्हा रुग्णालयासह खाजगी रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने रुग्णांना जीव गमवावा लागत आहे, दुसरीकडे ऑक्सिजनचा आलेला टँकर बंद पडतो. ही बाब अत्यंत गंभीर आहे. आक्सिजनचा टँकर बंद पडल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे संपत बारस्कर, अविनाश घुले यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना फोन केला. त्यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर या दोघांनी जिल्हा शल्यचिकित्सक अनिल पोखरणा यांनाही फोन केला. त्यांनीदेखील फोन उचलला नाही. राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी टँकर सुरू करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न केले. टँकरला बेल्ट नव्हता. रात्री शोधाशोध करून बेल्ट उपलब्ध करून दिला. त्यानंतर ऑक्सिजनचा टँकर सुरू झाला. ऑक्सिजन वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. एवढे सर्व होऊनही अधिकारी फोन बंद करून बसतात. नातेवाइकांचा संपर्क होत नाही. त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होत असून, वेळेवर आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत.
रेमडेसिविरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. एक एक इंजेक्शनसाठी नातेवाइकांची अक्षरश: धावपळ सुरू आहे. रेमडेसिविरचा पुरवठा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पी. एन. कातकडे व उपजिल्हाधिकारी किशोर कदम या दोन अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कदम हे फोन उचलत नाहीत, अधिकाऱ्यांवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. जनतेसाठी खुले केलेले किती संपर्क क्रमांक बंद असतात, याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जगताप यांनी केली आहे.
....
प्रशासनाची बेफिकिरी उघड
जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. शहरात उपचार मिळतील, या आशेने रुग्ण दाखल होत आहेत, अशा कठीण परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेकडून तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. मात्र, ऑक्सिजन आणि रेमडेसिविरसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे फोन बंद असल्याची तक्रार यापूर्वी नातेवाइकांनी केली हाेती. शहराचे आ. संग्राम जगताप यांनीही याबाबत संताप व्यक्त करत प्रशासनाचा कारभार रामभरोसे सुरू असल्याचा गंभीर आरोप केला आहे.