विडी कामगारांचा कैवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 03:09 PM2019-08-20T15:09:28+5:302019-08-20T15:09:36+5:30

कॉम्रेड राम रत्नाकर आणि कम्युनिस्ट चळवळ यांचे नाते अतूट आहे. विडी कामगारांच्या उद्धारासाठी त्यांनी त्यांचे जीवन चळवळीच्या माध्यमातून पणाला लावले. शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाची त्यांनी आयुष्यभर वकिली केली. त्यांचे घर म्हणजे एक कार्यशाळाच होती. अहमदनगर जिल्हा साम्यवादी विचारांचा बालेकिल्ला बनविणाºया अनेक रत्नांमध्ये ‘राम रत्नाकर’ यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल़

The cadre of Vidi workers | विडी कामगारांचा कैवारी

विडी कामगारांचा कैवारी

Next

अहमदनगर : कम्युनिस्टांचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आता कमी होत असली तरी पूर्वी कधीकाळी हा संपूर्ण जिल्हा लाल रंगात रंगलेला होता. महाराष्टÑातील अनेक चळवळी अहमदनगरमधून सुरू झाल्या. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर लढे उभारले गेले. यापैकी अनेक लढ्याला यशही मिळाले. अहमदनगर शहरामध्ये पूर्वी विडी उद्योग मोठ्या प्रमाणावर चालत होता. या उद्योगामध्ये पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होता. त्यांच्यामध्ये आज दिसत असलेली सामाजिक सुधारणा, भरभराट ही कॉम्रेड राम रत्नाकर यांनी घेतलेल्या कष्टांमुळेच दिसत आहे, असे म्हटले तर वावगे ठरु नये़
अ‍ॅड. कॉ. रामचंद्र कृष्णाजी रत्नाकर हे कोºहाळा (ता. कोपरगाव) येथील मूळ रहिवासी. सात भाऊ आणि दोन बहिणी असणाºया शेतकरी कुटुंबातील रत्नाकर हे वडिलांच्या निधनानंतर अहमदनगरला मामांकडे आले. अहमदनगर महाविद्यालयात पदवीपर्यंतचे  शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे येथील महाविद्यालयात एल. एल. बी.चे शिक्षण घेतले. त्यावेळी राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही ते जात होते. नगर शहरातील नामवंत डॉक्टर क्षीरसागर हे त्याकाळी साम्यवादी विचारांचे कार्यकर्ते होते. त्यांनी रत्नाकर यांना मार्क्स, लेनिन यांची पुस्तके वाचायला दिली. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली आणि ते साम्यवादी विचारांकडे झुकले. संयुक्त महाराष्टÑ चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.  त्यानंतर १९६० मध्ये ते भारतीय कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले.
१९६१ मध्ये लाल बावटा कामगार युनियनची त्यांनी स्थापना केली. ते अहमदनगरचे अध्यक्ष बनले. १९६३ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्टÑातील असंघटित कामगारांचा संप झाला. महाराष्टÑ राज्य विडी, सिगारेट, तंबाखू वर्कर्स् फेडरेशनची धुरा त्यांनी स्वत:कडे घेतली. कामगारांच्या विविध प्रश्नात लक्ष घालून ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील झाले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शहर, जिल्हा व राज्य कौन्सिलवर त्यांनी काम केले. कामगार विषयक आपल्या कार्यकर्तृत्वाने उभ्या महाराष्ट्राला ते परिचित झाले. अहमदनगर शहरात विडी कामगारांना राहण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा श्रमिकनगर वसाहतीची कॉ. सुरेश संत यांच्या सहकार्याने त्यांनी स्थापना केली. विडी कामगारांनी ४५० रुपये सभासद फी, १ हजार रुपये डेव्हलपमेंट फी व १४ हजार ५०० रुपये महाराष्टÑ हौसिंग फायनान्सचे कर्ज एवढ्या कमी रकमेत ६२० स्क्वेअर फूट जागेमध्ये २२० फूट बांधकाम केलेली घरे कामगारांना मिळाली. त्यासाठी रत्नाकर यांनी मोठे परिश्रम घेतले.
अहमदनगर नगरपालिकेच्या नगरसेवकपदी ते दोनदा निवडून आले. शिक्षण मंडळाचे सभापती म्हणूनही त्यांनी काहीकाळ काम केले. विडी कामगारांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी शाळा व शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या.
शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गाचे वकील म्हणून ते शहरात उत्तम वकिली करीत होते. शहरातील त्यांचे घर म्हणजे सर्वपक्षीय  कार्यकर्त्यांची कार्यशाळाच होती. विविध पक्षाचे पुढारी घरी जाऊन त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे. पक्षाची विविध अधिवेशने, मोठ्या नेत्यांच्या सभा त्यांनी आयोजित केल्या होत्या. मुळा चारी, निळवंडे धरण, जायकवाडी धरणग्रस्त लढ्यामध्ये ते सातत्याने सहभागी व्हायचे. अहमदनगर शहराची जीवनदायी ठरलेल्या मुळा धरणातून थेट पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी शहर बंदची हाक १९७२ मध्ये त्यांनीच दिली होती.
विडी कामगारांना किमान वेतन मिळावे, फंड मिळावा, ग्रॅच्युईटी मिळावी, महिलांना बाळंतपणाची सुट्टी मिळावी यासाठीचे लढे उभारून त्यांनी विडी कामगारांना न्याय मिळवून दिला. कष्टकरी महिलांना पेन्शन मिळावी, ही त्यांची मागणी मान्य झालीच. शिवाय विडी कामगार महिला, विधवा महिला असल्यास तिच्या मुलीच्या विवाहासाठी सानुग्रह अनुदान त्यांनी सुरू करायला भाग पाडले. कोणत्याही प्रश्नावर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हाक दिल्यास ते सर्वात पुढे असायचे. कोणी समोर असो नसो. त्यांचे भाषण सुरू होई आणि लोक जमत, हा अनुभव अनेकांनी घेतला. कामगारांना संघटित करून त्यांना त्यांच्या प्रश्नांची जाणीव करून देणे, त्यांची सोडवणूक करण्यासाठी ते प्रयत्न करायचे. प्रश्नाची तड लावल्याशिवाय ते थांबत नसत.
अहमदनगर जिल्ह्यात त्यांचे समवेत कॉ. पी. बी. कडू पाटील, कॉ. बाळासाहेब नागवडे, कॉ. नामदेव आव्हाड, कॉ. वकीलराव लंघे, कॉ. बाबासाहेब ठुबे, कॉ. बी. के. देशमुख हे त्यांचे पक्षातील सहकारी होते तर मित्र पक्षाचे कॉ. भास्करराव जाधव, कॉ. मधुकर कात्रे, बापूसाहेब भापकर, कॉ. एकनाथ भागवत, दिनकर नलावडे, राजाभाऊ कुलंगे, रामभाऊ निसळ, साथी राम दसरे, नानासाहेब नानल, अ‍ॅड. ना. ज. पाऊलबुद्धे, मल्लेश्याम येमूल, कॉ. चंद्रभान आठरे पाटील हे त्यांचे सहकारी होते. रत्नाकर यांनी पक्षाचा आदेश मानून दोन वेळा विधानसभा तर एक वेळा लोकसभेची निवडणूक लढवली होती. पक्षाचे मोठे पुढारी कॉ. सी. राजेश्वरराव, कॉ. इंद्रजीत गुप्ता यांच्या सभांचे त्यांनी आयोजन केले होते. रत्नाकर हे कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी असले तरी सर्व पक्ष संघटनेतील मान्यवर त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी यायचे. 

लेखक - कॉ. शंकर न्यायपेल्ली (सहकार्य : अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे)

Web Title: The cadre of Vidi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.