भाजपच्या चुकांचे खापर एकट्या विखेंच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 06:32 AM2019-12-28T06:32:13+5:302019-12-28T06:32:45+5:30

उमेदवारांबाबतही होते आक्षेप: सत्तेविरोधातील शेतकऱ्यांची नाराजीही नडली

The BJP's mistake is alone on the wing | भाजपच्या चुकांचे खापर एकट्या विखेंच्या माथी

भाजपच्या चुकांचे खापर एकट्या विखेंच्या माथी

Next

सुधीर लंके 

अहमदनगर : नगर जिल्ह्यात भाजपपेक्षा व भाजपच्या तथाकथित मोदी लाटेपेक्षाही विखे पिता-पुत्र प्रभावी आहेत असे प्रमाणपत्र एकप्रकारे भाजप नेत्यांनी स्वत:च देऊन टाकले आहे. स्वत:च्या चुकांचे खापर भाजप नेत्यांनी एकट्या विखेंवर फोडले आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारणात विखे नावाचा स्वतंत्र फॅक्टर आहे हे कधीही लपून राहिलेले नाही. विखेंनी स्वत:चे अस्तित्व टिकविणारे राजकारण सातत्याने केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला विखेंबद्दल काहीच आक्षेप नव्हता. विधानसभा निवडणुकीच्या सांगतेपर्यंतही हा आक्षेप नव्हता. मात्र, निकालानंतर सर्वच पराभूत उमेदवारांनी एकासुरात विखेंबाबत तक्रार केली. मात्र, एकटे विखे यास जबाबदार आहेत का? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. नगर जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला यापैकी पाच जागा मिळाल्या होत्या. म्हणजे भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता. असे असतानाही भाजप गत पाच वर्षे जिल्ह्यात इतर सत्तास्थाने मिळवू शकला नाही. भाजपचे जे आमदार पराभूत झाले त्यास केवळ विखे जबाबदार नसून स्थानिक संदर्भही आहेत.

राम शिंदे यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क तुटला होता. त्यांचे अनेक कार्यकर्ते खासगीत ही बाब मान्य करतात. रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघात जी तयारी करत होते त्याकडेही शिंदे यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. शिंदे हे ४३ हजाराहून अधिक मतांनी पराभूत झाले आहेत. एवढा फटका एकटे विखे कसा देऊ शकतात? राहुरीमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते हे आमदार कर्डिले यांच्यावर नाराज होते. नेवाशात शंकरराव गडाख यांनी मोठी तयारी केली होती. त्यामुळे भाजपचे बाळासाहेब मुरकुटे पराभूत झाले. कोपरगावात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांचे पुत्र विजय वहाडणे यांनी बंडखोरी करत चार हजार मते घेतली. त्याचा स्नेहलता कोल्हे यांना फटका बसला. तेथे राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी बंडखोरी केली हे खरे आहे. मात्र, वहाडणे गत पाच वर्षे भाजपवर नाराज असताना भाजप त्यांचेही मन वळवू शकला नाही ही बाब दुर्लक्षित केली जाते.

काँग्रेस सोडली खरी....
राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर कधीही टीका केली नाही. तेच धोरण राम शिंदे यांनी अवलंबिले. तेही विखेंबाबत कधीच बोलले नाहीत. तेव्हा मैत्री जपत लिव्ह इन रिलेशन सुरु होते. आता मात्र शिंदे यांना विखेंबाबत आक्षेप आहेत. विखे यांनी काँग्रेस सोडली खरी, पण भाजप आपली नाही हेही त्यांना आता जाणवू लागले असेल.

Web Title: The BJP's mistake is alone on the wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.