भौगोलिक परिस्थितीनुसारच लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:31+5:302021-05-26T04:22:31+5:30
अहमदनगर : पावसाळा तोंडावर आल्याने शहराच्या भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येनुसार मंगल कार्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू ...

भौगोलिक परिस्थितीनुसारच लसीकरण केंद्र
अहमदनगर : पावसाळा तोंडावर आल्याने शहराच्या भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्येनुसार मंगल कार्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी मनपाने हे पाऊल उचलले आहे.
महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू आहे; परंतु महापालिकेने मध्यंतरी उपकेंद्रांना परवानगी दिल्याने लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे; परंतु त्यामुळे लसीकरणाचे नियोजन कोलमडत आहे. लस वितरणातही अडचणी येत असल्याने आरोग्य यंत्रणेचाही गोंधळ उडाला आहे. लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी प्रभागनिहाय लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी मनपाच्या आरोग्य समितीकडून करण्यात आली आहे; मात्र प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू न करता भौगोलिक परिस्थिती व लोकसंख्या विचारात घेऊन नव्याने लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यात पावसाळा तोंडावर आला आहे. लस घेण्यासाठी केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा लागतात. त्यामुळे मंगल कार्यालयात लसीकरण केंद्र सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी उपायुक्त यशवंत डागे यांनी शहर व परिसरातील मंगल कार्यालयांची पाहणी केली असून, पाहणीचा अहवाल ते आयुक्तांना सादर करणार आहेत. उपायुक्तांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नव्याने लसीकरण केंद्र सुरू केले जातील. नगरसेवकांनी मागणी केल्याप्रमाणे लसीकरण केंद्र सुरू होणार नाही. त्यामुळे लसीकरणाचा गोंधळ उडतो. आरोग्य विभागालाही नियोजन करणे शक्य होत नसल्याने लसीरण मोहिमेचा आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
....
- नव्याने लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. पावसाळ्यामुळे हे लसीकरण केंद्र मंगल कार्यालयात सुरू केले जातील. लोकसंख्येनुसार लशींचे केंद्रांना वितरण होईल.
- शंकर गोरे, आयुक्त.
....
नगरसेवकांमध्ये रस्सीखेच
लसीकरण केंद्र सुरू करण्याची नगरसेवकांमध्ये स्पर्धा सुरू आहे. दररोज एक नवीन केंद्र सुरू होत आहे. केंद्रांच्या शुभारंभाचे सोहळे शहर व परिसरात पार पडत आहेत. या कार्यक्रमांनाही गर्दी होत असून, उपकेंद्रांची संख्या वाढली आहे; परंतु लस अपुरी असल्याने लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे.