जामखेड: तालुक्यातील बांधखडक येथे चार महिन्यांपूर्वी वीजरोहित्र जळाल्याने पाणी असूनही गावात निर्जळी निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरणने गावात वीजरोहित्र बसवून दिला.
बांधखडक येथील सिंगल फेज वीजरोहित्र चार महिन्यांपूर्वी जळाला होता. नवीन रोहित्र बसवून देण्याबाबत ग्रामस्थांनी महावितरणकडे पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. पर्यायाने ग्रामस्थांवर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली होती. गावात पाणीपुरवठा करणारे कोरोना बाधित झाल्याचे समोर आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय वारे, ग्रामपंचायत सदस्य शांतीलाल वारे, प्रभाकर वारे, किशोर वारे, बाबासाहेब पवडमल यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण उपअभियंता यांची भेट घेऊन परिस्थिती विशद केली. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर गावात वीजरोहित्र बसविण्यात आला.