Join us

शेतकऱ्याचा १०-१२ वर्षाचा पोर का म्हणाला "खबरदार जर टाच मारूनी.."

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 19, 2024 12:30 PM

ओतप्रोत अभिमानाने भारलेले, शिवकार्यात रयतेच्या सहभागाचं प्रतिक असणारे या शब्दांमागची भावना आली कुठुन?

शेतकऱ्याच्या १०-१२ वर्षाचा पोरअसं काय होतं या राजाच्या कतृत्वात, की शेतकऱ्याचा १०- १२ वर्षाच्या पोराची शस्त्रसज्ज घोडेस्वारांना या शब्दात दम भरण्याची हिंमत झाली?

"खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या.. 

इतिहासाच्या पानांवर या कदाचित अगदी सोपे शब्द असतील. ओतप्रोत अभिमानाने भारलेले, शिवकार्यात रयतेच्या सहभागाचं प्रतिक असणारे या शब्दांमागची भावना आली कुठुन? आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा वाचला पाहिजे हीच ती भावना. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकात या भावनेचा शोध घेण्याचा प्रयत्न लेखकानं केलाय. या ओळींमध्ये काय दडलंय पाहूया..

कवी वर्णन करतो एका छोट्या प्रसंगाचे. हा धामधुमीचा काळ आहे. सैनिक शिपायासह शेतात नांगरणारा शेतकरीही सावध आहे. कोण कुठं जातंय याकडं सैनिकांचं लक्ष आहे. स्वराज्यकार्यात दगाफटका करणाऱ्याला कुणी आढळला तर त्याला हटकला पाहिजे हीच सगळीकडे भावना आहे.

याचवेळी बांधावरून चार घोडेस्वार जाऊ पाहत आहेत. शेतकऱ्याचा १०-१२ वर्षाचा पोरगा मोठ्या धिटाईनं समोर येतो. शस्त्रसज्ज घोडेस्वारांना अडवतो आणि सांगतो, " खबरदार! पुढे जाल तर चिंधड्या उडवीन. तुम्ही कोण आहात? कशासाठी जात आहात?.. अशा प्रश्नांचा भडिमार करत न घाबरता त्या घोडेस्वारांना दम देतो. 

त्या घोडेस्वारांना आपण रोखलं पाहिजे. हे आपलं काम आहे. शिवाजी राजा काहीतरी चांगलं कार्य करतोय. त्याला आपण मदत करायला हवी असं त्याला वाटतं. पुढे कवी असे सांगतो, की ज्या घोडेस्वाराला हा लहानगा दम देत असतो तो स्वत: शिवाजीराजाच होता. पण या मुलानं त्यांना कधी पाहिलंच नव्हतं. ओळख नसताना केवळ राजाच्या कामात त्याला मदत करायची होती. त्यासाठी तो धोका पत्करतो.

रयत राजाशी कशी वागते याचा राजा रयतेशी कसा वागतो यावरून ठरते. युद्ध लढायांमध्ये छोट्या छोट्या कृतींमधून राजाची रयतेची काळजी अधोरेखीत होते. सैन्य गावाहून जाऊ लागले किंवा मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्ती- काय होई? उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई. वर्षभर राबून निढळाच्या घामाने पोसलेल अन् हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुईसपाट होई. आपल्याच राजाचं सैन्य. नुकसानाची तक्रार करणार कुणाकडे? दाद कोण घेणार? स्वत:च्या नशिबाला दोष देत घरातल्य घरात रडतकुढत बसण्याखेरीज दुसरे काही करायला वाव नसे.

असे बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती त्या काळात शिवाजीने सैन्याल आदेश दिले आहेत की, कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडी- शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये. पिकाची नासाडी होता कामा नये. उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभं पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि 'पिकाचे जराही नुकसान होऊ नये' अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पाहायला मिळाले तर त्यांना काय वाटेल? रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काया वाटले असेल? हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे, असे रयतेला का नाही वाटणार? का एखादा शेतकऱ्याला मुलगा "खबरदार!.." नाही म्हणणार?

कोणत्याही लोभाच्या मोहापोटी, जहागिरी मिळवण्यासाठी नाही तर राजाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी ही रयतेची निष्ठा होती. शिवकाळात सर्व सैनिकात आणि रयतेच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही भावना शिवाजी महाराज निर्माण करू शकले. यातच त्यांचे वेगळेपण सामावलेले आहे. 

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजशिवजयंती