Join us

मोठी बातमी! दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून कांद्याचे विकिरण अन् साठवणूक

By दत्ता लवांडे | Published: May 23, 2024 9:22 PM

नाफेड आणि एनसीसीएफलाही ५ लाख टन कांद्याचे बफर स्टॉक करण्यासाठी विकिरण केंद्र शोधण्याच्या सूचना केंद्राकडून आल्या आहेत.

पुणे : कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने वारंवार पावले उचलल्याचे आपण पाहिले आहे. पण येणाऱ्या काळातही कांद्याचे दर वाढू नयेत आणि देशात कांद्याची कमतरता भासू नये यासाठी केंद्र सरकारने अजून एक पाऊल उचलले असून १ लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करण्यासाठी कांद्याचे विकिरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती इकोनॉमिक्स टाइम्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. 

दरम्यान, यंदा म्हणजेच २०२३-२४ या वर्षामध्ये पावसाच्या कमतरतेमुळे कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कांद्याच्या उत्पादनात १६ टक्क्यांनी घसरण होऊन २ कोटी ५४ लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे.

देशांतर्गत कांद्याचे घटते उत्पादन लक्षात घेता सरकारने कांद्याची साठवणूक करण्यासाठी पावले उचलली असून कांद्याचे जीवनमान वाढवण्यासाठी आणि कांदा खराब न होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सरकारची योजना असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सचिव निधी खरे यांनी सांगितलं.

कांदा उत्पादन होणाऱ्या भागामध्ये केंद्र सरकारकडून ५० विकिरण केंद्रे शोधली जात असून असे झाल्यास यावर्षी १ लाख टन विकिरण प्रक्रिया केलेला कांदा साठवला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

त्याचबरोबर नाफेड आणि एनसीसीएफलाही ५ लाख टन कांद्याचे बफर स्टॉक करण्यासाठी सोनपत, ठाणे, नाशिक आणि मुंबईसारख्या भागांत विकिरण केंद्रे शोधण्यास सांगितले आहे. तर मागच्या वर्षी जवळपास १ हजार २०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली होती.

कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर आता बफर स्टॉक करून दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असून यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला समोरे जावे लागू शकते.

टॅग्स :शेती क्षेत्र