धम्म संस्था, विहार व कार्यकर्त्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:08 PM2019-07-20T22:08:27+5:302019-07-20T22:09:15+5:30

धम्म चळवळीतील कार्यकर्ते आणि संस्थांचा सत्कार सोहळा येथील मेडिकल चौकातील जिल्हा परिषद बचत भवनात पार पडला. तिबेटियन लामा लोंबझ्यांग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पत्रकार विजय डांगे अध्यक्षस्थानी, तर चंदन तेलंग स्वागताध्यक्ष होते.

The pride of the Dhamma organization, the Vihar and the workers | धम्म संस्था, विहार व कार्यकर्त्यांचा गौरव

धम्म संस्था, विहार व कार्यकर्त्यांचा गौरव

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । नवदीक्षितांनी केला प्रचार आणि प्रसार, श्रावस्ती सोसायटीतील गौतमी बौद्धविहार प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धम्म चळवळीतील कार्यकर्ते आणि संस्थांचा सत्कार सोहळा येथील मेडिकल चौकातील जिल्हा परिषद बचत भवनात पार पडला. तिबेटियन लामा लोंबझ्यांग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पत्रकार विजय डांगे अध्यक्षस्थानी, तर चंदन तेलंग स्वागताध्यक्ष होते.
प्रमुख पाहुणे म्हणून वाशिमचे सहकार उपनिबंधक रमेश कटके, धम्मानुयायी उल्हास राठोड, बौद्ध इतिहास संशोधक गोपीचंद कांबळे, आंबेडकरी साहित्य व कला अकादमीचे कवडूजी नगराळे, इंजिनिअर संजय मानकर, महेंद्र मानकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सदाशिवराव भालेराव, धर्मपाल माने आदी उपस्थित होते. यावेळी दिवंगत आंबेडकरी साहित्यिक राजा ढाले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आॅक्टोबर १९५६ साली धम्मदीक्षा दिल्यानंतर नवदीक्षित बौद्ध समाजाने विविध धम्म संस्था स्थापित केल्या. काहींनी व्यक्तिश: धम्म प्रसार व प्रचाराचे काम केले. आषाढ पौर्णिमा अर्थात वर्षावास आरंभ दिनी आयोजन समितीचे मुख्य निमंत्रक आनंद गायकवाड, संयोजक नवनीत महाजन, निमंत्रक संजय बोरकर व मित्र परिवाराने यवतमाळ शहरातील ४० हून अधिक बौद्ध विहार समित्यांचा सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करून सत्कार केला.
याच कार्यक्रमात शहरातील उत्कृष्ट बुद्ध विहार म्हणून पाटीपुरा भागातील श्रावस्ती सोसायटीतील गौतमी बुद्ध विहाराला प्रथम क्रमांकाचा सम्राट अशोक धम्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. जामनकरनगरातील महाप्रजापती गौतमी बौद्ध विहाराला अनागारिक धम्मपाल हा द्वितीय, तर पिंपळगाव रोडवरील बोधीसत्व बुद्ध विहाराला भदन्त आनंद कौसल्यायन हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
या कार्यक्रमाची भूमिका संजय बोरकर यांनी मांडली. प्रास्ताविक आनंद गायकवाड यांनी केले. संचालन सुनील वासनिक, आभार नवनीत महाजन यांनी मानले. द्वितीय सत्रातील सत्कार सोहळ्याचे निवेदन पद्माकर घायवान, प्रा. श्रद्धा धवने यांनी केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अरविंद खोब्रागडे, आनंद धवने, मालती गायकवाड, माया महाजन, डॉ. सुभाष जमधाडे, डॉ. साहेबराव कदम, प्रा. संदीप नगराळे, सुमेध ठमके आदींनी पुढाकार घेतला.

बुद्धांचा मैत्रीभावच जगाला तारू शकतो -लोंबझ्यांग
भारत भूमी ही आमची गुरूभूमी आहे. तथागत बुद्धांच्या या भूमीतील धम्म विचाराने संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा व पंचशीलांची मानवतावादी शिकवण दिली आहे. भौतिकवादाकडे झुकलेल्या आधुनिक जगाला नव्याने अंथरण्यासाठी युद्धाची नव्हे तर बुद्धाची व त्यांच्या समतामूलक विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन तिबेटियन लामा लोंबझ्यांग यांनी सत्कार सोहळ्याचे उद्घाटक म्हणून बोलताना केले. यावेळी त्यागमूर्ती रमाई पुरस्कार व यशोधरा अर्थात भद्रा कात्यायनी पुरस्कार अनुक्रमे विश्वशांती बौद्धविहार, उमरसरा व विशाखा बौद्धविहार, अंबिकानगर यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यकर्ते व संस्थांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: The pride of the Dhamma organization, the Vihar and the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.