अटलजींच्या नेतृत्वाला जिल्ह्यातून लाखमोलाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:43 PM2018-08-16T22:43:14+5:302018-08-16T22:43:31+5:30

अमोघ वक्तृत्वाने अवघ्या देशाचे मन जिंकणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असंख्य आठवणी मागे ठेऊन दिगंताच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या जीवन प्रवासातील तीन महत्त्वाचे क्षण यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला आले होते.

Lakh lakh support from Atalji's leadership in the district | अटलजींच्या नेतृत्वाला जिल्ह्यातून लाखमोलाची मदत

अटलजींच्या नेतृत्वाला जिल्ह्यातून लाखमोलाची मदत

Next
ठळक मुद्देभारतरत्नाच्या आठवणी : आझाद मैदानात गाजली अटलबिहारी वाजपेयी यांची सभा, ७० च्या दशकात कवितेचे गारुड

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अमोघ वक्तृत्वाने अवघ्या देशाचे मन जिंकणारे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी असंख्य आठवणी मागे ठेऊन दिगंताच्या प्रवासाला निघाले. त्यांच्या जीवन प्रवासातील तीन महत्त्वाचे क्षण यवतमाळ जिल्ह्याच्या वाट्याला आले होते. राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व म्हणून पुढे येणाऱ्या अटलजींना ७० च्या दशकात यवतमाळ जिल्ह्यानेही ‘लाखमोलाची’ मदत केली होती. त्यावेळी आझाद मैदानात गुंजलेले या नेत्याचे शब्द आजही ताजे आणि आश्वासक वाटतात.
काँग्रेसचा पारंपारिक गड मानला जाणारा यवतमाळ जिल्हा नव्याचेही तेवढ्याच खुल्या दिलाने स्वागत करणारा आहे. त्यामुळेच जनसंघातून राजकीय पटलावर चमकणारे अटलबिहारी वाजपेयी या नावाचीही जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. देशाला ताजे-ताजे स्वातंत्र्य मिळाले होते. १९६०-६५ च्या त्या काळात सामाजिक चळवळींनाही जोर चढलेला होता. नेमक्या याच स्थित्यंतराच्या काळात अटलजी यवतमाळात आले.
१९६९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी जनसंघाचे अध्यक्ष असताना त्यांनी पहिल्यांदा यवतमाळला भेट दिली. देशभरात काँग्रेस हाच एकमेव मोठा राजकीय पक्ष असताना जनसंघाला पूर्ण ताकदीनिशी उभे करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज होती. या पक्षनिधीसाठीच अटलजी खासदार यज्ञदत्त शर्मा यांच्यासोबत जिल्ह्यात आले. त्यावेळी पुसद-उमरखेड परिसरातून तब्बल ५१ हजार रुपयांची देणगी अटलजींच्या हाती सुपूर्द करण्यात आली होती. तर दुसऱ्या वर्षी १९७० मध्ये बलराज मधोक यांच्यासह अटलजींनी पुन्हा जिल्ह्यात दौरा केला. जिल्ह्याविषयीचा त्यांचा विश्वास सार्थ ठरवित पुन्हा ६५ हजार रुपयांचा पक्षनिधी देण्यात आला.
जनसंघाने १९८० मध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून नवे रुप धारण केल्यावर आर्थिक पाठबळाची गरजही वाढली होती. या पक्षाचा यवतमाळातील पहिला जाहीर कार्यक्रम १९८३ मध्ये आझाद मैदानावर झाला. तत्कालीन पक्षाध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी हजर होते. त्यांच्या या तिसऱ्या दौऱ्यातही जिल्हावासीयांनी तब्बल दीड लाख रुपयांचा निधी दिला. त्यावेळी आझाद मैदानात झालेल्या सभेतील अटलजींचे भाषण जुन्या जाणकारांना आजही आठवते. या सभेला त्यावेळचे भाजपाचे राज्याध्यक्ष मोतीरामजी लहाने, जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाई पटेल, तत्कालीन आमदार गंगाधरराव फडणवीस, सरचिटणीस डॉ. अशोक गिरी, वसंतराव चिद्दरवार (दिग्रस), बाळासाहेब अत्रे (पुसद), डॉ. मधुसुदन मारू, डॉ. दिनकरराव बोधनकर, जयंत भिसे, उद्धवराव येरमे, अ‍ॅड. रवीशेखर बदनोरे आदी या सभेला उपस्थित होते.
अटलजींच्या प्रारंभीच्या काळात यवतमाळ जिल्ह्याने दिलेली लाखमोलाची मदत महत्वाची ठरली. गुरुवारी दिल्ली येथे अटलजींची प्राणज्योत मालवल्याचे वृत्त जिल्ह्यात धडकताच भाजपाच्या वर्तुळासह सर्वच कार्यकर्त्यांमध्ये शोकभावना पसरली.
एका कवितेने जिंकला जिल्हा
पक्षासाठी निधी गोळा करताना अटलजींच्या नेतृत्व गुणांसोबतच त्यांच्या तडाखेबाज कविताही महत्वपूर्ण ठरल्या. यवतमाळ जिल्ह्यातून पक्षनिधी गोळा करून तो अटलजींना सुपूर्द करण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हा कार्यकारिणीने घेतला होता. त्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांची कविता असलेले ‘ट्राय कलर फोल्डर’ तयार करण्यात आले. हे फोल्डरही महाराष्ट्रात पहिल्यांदाच बनविले गेले होते. अटलजींची कविता आवडल्याने लोकांनी हे फोल्डर भराभर घेतले. प्रती फोल्डर एक रुपया याप्रमाणे लोकांकडून निधी घेण्यात आला. आश्चर्य म्हणजे केवळ एका कवितेमुळे तब्बल दीड लाख रुपयांचा निधी त्यावेळी गोळा झाला होता.

Web Title: Lakh lakh support from Atalji's leadership in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.