१९७१ नंतर पहिल्यांदाच भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:30 PM2018-05-24T22:30:47+5:302018-05-24T22:30:47+5:30

१९७१ नंतर यवतमाळात पहिल्यांदा निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईने विविध उद्योग, व्यवसायांवर प्रचंड परिणाम केला आहे. त्यामुळे अनेकांवर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. कामकाजच ठप्प झाल्याने मजूर-कारागिरांनी रोजगाराच्या शोधात इतरत्र स्थलांतर केले आहे.

The first severe water shortage since 1971 | १९७१ नंतर पहिल्यांदाच भीषण पाणीटंचाई

१९७१ नंतर पहिल्यांदाच भीषण पाणीटंचाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : १९७१ नंतर यवतमाळात पहिल्यांदा निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईने विविध उद्योग, व्यवसायांवर प्रचंड परिणाम केला आहे. त्यामुळे अनेकांवर रोजगाराचे संकट निर्माण झाले आहे. कामकाजच ठप्प झाल्याने मजूर-कारागिरांनी रोजगाराच्या शोधात इतरत्र स्थलांतर केले आहे.
मजुरांवर उपासमारीची वेळ
आर्किटेक्ट सुहास पुरी म्हणाले, आमचा व्यवसाय खूप मोठा आहे. हजारो मजुरांना प्रत्यक्ष काम देणारा हा व्यवसाय आहे. आता नगरपरिषदेने बांधकामावर बंदी आणली. त्यामुळे मजूर बेरोजगार झाले आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेक जण यामुळे अडचणीत आले आहे. मात्र आगामी काळात पाणीटंचाई होऊ नये म्हणून असोसिएशन आॅफ प्रायव्हेट प्रॅक्टीसिंग आर्किटेक्ट अ‍ॅन्ड इंजिनीअरतर्फे रेन वॉटर हार्वेस्टींगची मोहीम हाती घेतली आहे. घराघरात रेन वॉटर हार्वेस्टींग केले जाणार आहे.
अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत
बिल्डर प्रवीण खांदवे म्हणाले, नोटाबंदी, जीएसटी, रेरा सोबत आता पाणीटंचाईचा फटका बांधकाम व्यवसायाला बसत आहे. अनेक प्रकल्प आज अपूर्ण अवस्थेत आहेत. गत काही दिवसांपासून अपुरा पाऊस आणि नापिकी यामुळे बाजारपेठेत पैसाच नाही. त्याचाही परिणाम या व्यवसायावर होत आहे.
कारागिरांचे स्थलांतर
मजुरांचे ठेकेदार जावेदभाई म्हणाले, मजुरांच्या हाताला काम नाही. अनेक मजूर आता गाव सोडून इतरत्र काम शोधत आहे. पूर्वी ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात मजूर यायचे. परंतु शहरातीलच मजुरांना काम नाही. तर त्यांना देणार कोठून. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची जशी अवस्था झाली तशीच आज मजुरांची झाली आहे.
टँकर आला नाही तर हॉटेल बंद
बांधकाम व्यवसायापाठोपाठ पाणीटंचाईचा फटका हॉटेल व्यवसायाला बसत आहे. शहरात शेकडो लहान-मोठे हॉटेल आहेत. काही हॉटेलमध्ये लॉजिंगचीही व्यवस्था आहे. या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागते. ज्या दिवशी टँकर येत नाही त्या दिवशी चक्क हॉटेल बंद ठेवावे लागते.
पाहुणे आले की थेट हॉटेलात
सुखकर्ता हॉटेलचे संचालक अविनाश ओमनवार म्हणाले, पाणी टंचाईमुळे ग्राहकांचा हॉटेलमध्ये जेवणाकडे कल वाढला आहे. घरातील पाणी वाचविण्यासाठी पाहुणे आले की थेट हॉटेल गाठले जाते. परंतु आम्ही सर्वच ग्राहकांना आता पाणीटंचाईमुळे सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. आलेल्या ग्राहकाला हात जोडून नकार देण्याशिवाय पर्याय नसतो. दररोज सकाळपासूनच पाण्याच्या व्यवस्थेत रहावे लागते. टँकरचा शोध घेऊन टँकर मागवावे लागते. सकाळी बोलाविलेले टँकर अनेकदा रात्री येते. त्यामुळे हॉटेल सुरू करावे की नाही, असा प्रश्न असतो. महिनाभरात दोन वेळा हॉटेल पाण्याअभावी बंद ठेवण्याची वेळ आली. पाणी पिण्यासाठी मिनरलचे वापरले जात असले तरी इतर कामासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते आणि तेच मिळत नसल्याने आमच्यापुढे संकट उभे ठाकले आहे.
पाणी पाहून खोल्यांचे आरक्षण
हॉटेल रेवती प्राईडचे नरेश गोदवाणी म्हणाले, ‘पाणी के हिसाब से रुम दे रहे है’ पाणीच नसल्याने नेहमीच्या ग्राहकांनाही आम्हाला नकार द्यावा लागतो. मुक्कामी असणाऱ्या बाहेरच्या ग्राहकांना यवतमाळातील पाणीटंचाईची कल्पना नसते. त्यामुळे ते पाण्याचा मुबलक वापर करतात. त्यांना कितीही सांगितले तरी ते पैसे देत असल्याने ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. अशा वेळी आम्ही आता सुरुवातीलाच बाहेरगाववरून येणाऱ्या ग्राहकांना पाणीटंचाईच कल्पना देतो आणि पाणी जपून वापरण्याची विनंती करतो. टँकरच्या पाण्यावर हॉटेल सुरू आहे. टँकरचे पाणी जर मिळाले नाही तर आमचे काही खरे नाही, असे ते म्हणाले. रामायण हॉटेलचे संचालक नितीन कोठारी म्हणाले, या पाणीटंचाईने पाण्याचा काटकसरीने कसा वापरा करावा हे शिकविले. पाण्याची किंमत आता कळत आहे. शहरातील लहान-मोठ्या हॉटेलची अशीच अवस्था झाली आहे. पाण्यासाठी सर्वजण काकुळतीला आले आहे.
कुलर, साहित्य विक्री थंडावली
उन्हाळा म्हटला की कुलरची सर्वाधिक विक्री होते. अनेक व्यावसायिकांनी लाखो रुपये गुंतवून कुलर आणले. परंतु फेब्रुवारी महिन्यापासूनच पाणीटंचाईने उग्ररुप घेतल्याने हा व्यवसाय ठप्प झाला आहे. कुलरला मागणीच नाही. एवढेच काय ताट्या आणि उलवूडलाही मागणी दिसत नाही. शहरातील लॉन्ड्री व्यवसायही प्रभावित झाला आहे. घरी पाणी नसल्याने अनेक जण लॉन्ड्रीत कपडे पाठवितात. परंतु पाणी टंचाईने येथे दर वाढले आहे तर काही लॉन्ड्री चक्क पाण्याअभावी बंद आहे.
गर्दी खूप, गल्ला तेवढाच
पाणीटंचाईमुळे हॉटेलमध्ये अलिकडे गर्दी वाढली आहे. घरी पाहुणे आल्यास पाण्याचा अधिक वापर होऊ नये म्हणून अनेक जण चक्क जेवणासाठी सायंकाळच्या वेळी हॉटेल गाठतात. यामुळे घरच्या पाण्याची बचत होते. परंतु असे ग्राहक धोरणी असतात. हॉटेलमध्ये गर्दी दिसत असली तरी व्यवसाय मात्र तेवढाच होत असल्याचे एका हॉटेल चालकाने सांगितले.
शहरातील हॉस्पिटलच आले ‘आॅक्सिजन’वर
जीवनावश्यक सेवा असलेल्या वैद्यकीय क्षेत्रालाही पाणीटंचाईने अक्षरश: आॅक्सिजनवर आणले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहेत. क्षमता असूनही पाणी नसल्याने किती पेशंट भरती करून घ्यायचे, याचा दहादा विचार करावा लागतो. बाहेरगावचे रुग्ण पाण्याची काटकसर करीत नाही. मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय करतात. कितीही बजावून सांगितले तरी ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. त्यामुळे डॉक्टरही आता पाणीटंचाईला वैतागले आहेत. विशेष म्हणजे एका रुग्णासोबत कमीत कमी तीन जण मुक्कामी असतात. त्यांचाही पाण्याचा भार डॉक्टरला सहन करावा लागतो. ३० पेशंट भरती असल्यास त्यांच्यासोबत ९० नातेवाईक रुग्णालयात ठाण मांडून असतात. रुग्णालयासाठी दररोज टँकरचे पाणी घ्यावे लागते. साधारणत: ५०० ते ८०० रुपयांचा टँकर खरेदी करावा लागतो. महिनाभरात ३० हजार रुपयांचे पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे एका डॉक्टरांनी सांगितले. खासगी रुग्णालय असले तरी हे स्थळ सार्वजनिक असते. या ठिकाणी लावलेल्या वॉटर कुलरवर बाहेरची मंडळी पाणी पितात. एवढेच नाही तर अनेकदा बॉटलही भरुन नेतात. काही जण तर चक्क रुग्णालयाच्या शौचालयाचाही वापर करीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे पाणी कितीही आणले तरी दुपारपर्यंतच संपून जाते.
डॉक्टर म्हणतात, रुग्णापेक्षा पाण्यावरच ठेवावे लागते लक्ष
डॉक्टर संदीप धवने म्हणाले, सध्या उन्हाळा असल्याने आम्ही रुग्णाला सात ते आठ लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतो. त्यावेळी रुग्ण डोळे विस्फारुन यवतमाळात पाणीटंचाई आहे, हे माहीत आहे ना, असा सवाल करतात. सध्या उन्हामुळे लूज मोशनचे रुग्ण वाढले आहे. अशा रुग्णांना पाण्याचीही मोठी गरज असते आणि ती गरज पुरविताना आम्ही अडचणीत येतो. अनेकदा स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण होतो. रुग्णालयात घाण निर्माण होऊन दुर्गंधी आली की पेशंट आमच्या कर्मचाºयांवर त्याचा राग काढतात. यातून वादाचेही प्रसंग उद्भवतात.

Web Title: The first severe water shortage since 1971

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.