शेतकरी, शास्त्रज्ञांची कार्यशाळा घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 10:03 PM2017-11-17T22:03:39+5:302017-11-17T22:04:03+5:30

जेव्हा जेव्हा देशात कुठे यवतमाळची आठवण केली जाते, तेव्हा तेव्हा वसंतराव नाईकांचीही आठवण काढली जाते.

Farmers, scientists will take workshops | शेतकरी, शास्त्रज्ञांची कार्यशाळा घेणार

शेतकरी, शास्त्रज्ञांची कार्यशाळा घेणार

Next
ठळक मुद्देशरद पवार : राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात भाष्य

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जेव्हा जेव्हा देशात कुठे यवतमाळची आठवण केली जाते, तेव्हा तेव्हा वसंतराव नाईकांचीही आठवण काढली जाते. ज्यांनी संपूर्ण राज्याला कृषिक्रांतीची दिशा दाखविली, त्याच वसंतराव नाईकांच्या यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, फवारणीत शेतकरी बळी पडत आहेत. ही स्थिती पाहून अत्यंत दु:ख होते. बीटी कापसावर बोंडअळी का आली, त्यावर उपाय काय याबाबत लवकरच नागपुरात देशभरातील कृषी शास्त्रज्ञ आणि राज्यातील निवडक शेतकºयांची कार्यशाळा घेऊ, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी यवतमाळात दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी येथे पार पडला. त्यावेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, आजची स्थिती भयावह आहे. लोकांनी मोठ्या अपेक्षेने भाजपाला सत्ता दिली. हा माणूस आपले जीवन बदलवेल म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना देशाच्या पंतप्रधानपदावर बसविले. त्यांनी काय सांगितले होते? काळापैसा आणतो, गरिबांच्या खात्यात १५ लाख टाकतो. आले का कुणाच्या खात्यात? नाही आले. खुद्द सुरतचे व्यापारी आता बिलावर छापू लागलेत, हो गई भूल कमल का फूल. व्यापारीच कशाला सर्वच लोक नरेंद्र मोदींच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत, अशा शब्दात पवार यांनी सडकून टीका केली.
नोटाबंदीच्या निर्णयाचाही शरद पवार यांनी मिश्कील समाचार घेतला. ते म्हणाले, आठ नोव्हेंबरला रात्री पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करणार असल्याचे कळले. मला वाटले, भारत-पाकिस्तानचे काहीतरी बिनसले असावे. रात्री टीव्ही लावून बघू लागलो, तर हे महाशय म्हणाले, ये जो हजार रुपये का नोट है वो अब कुछही देर मे कागज बन जायेगा! दुसऱ्या दिवशी पुण्यात एका अधिवेशनासाठी ते आले. तेव्हा त्यांना म्हणालो, मोदीजी कल रात ये आपने क्या किया? तर ते म्हणाले, सब खतम कर दिया! पण नोटा बदलून घेण्यासाठी कोणताही टाटा बिर्ला रांगेत दिसला नाही. जेवढे पैसे बाहेर होते, तेवढेही परत आले. मग काळा पैसा गेला कुठे? नोटाबंदी कमी होती म्हणून या सरकारने जीएसटी लावली. एकच कर लावणार म्हणत, वेगवेगळ्या वस्तूवर वेगवेगळे कर लावले. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही निर्णयांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे.
आमदार मनोहरराव नाईक, आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, उत्तमराव शेळके, वसंतराव घुईखेडकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे, राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, युवती जिल्हाध्यक्ष मनिषा काटे आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आमदार प्रकाश गजभिये, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार सुभाष ठाकरे, वसुधाताई देशमुख, रमेश बंग, शरद तसरे, बांधकाम सभापती निमिष मानकर, अ‍ॅड. आशीष देशमुख, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष आशीष मानकर, अशोकराव घारफळकर, अ‍ॅड. शंकरराव राठोड, आदी उपस्थित होते.

बीटीवर बंदीची गरज नाही
बीटी बियाण्याची अळी मारण्याची शक्ती आता कमी झाली आहे. पण बीटीवर येणाºया अळीची सहनशक्ती वाढली आहे. असे असले तरी, बीटीवर बंदी आणण्याची घाई करण्यात अर्थ नाही. बीटीमुळेच आपल्या देशात गेल्या १८ वर्षात कापूस उत्पादन वाढले. एकेकाळी आयात करणारा आपला देश आता कापूस निर्यातीत जगात दुसºया क्रमांकावर आहे. त्यामुळे बीटीच्या रोपट्याची क्षमता कशी वाढविता येईल यावर विचार केला पाहिजे. तोच विचार नागपूरच्या कार्यशाळेत केला जाईल, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.

मी लाभार्थी, लबाडाचं आवतन
लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. कर्जमाफीसाठी या सरकारने चावडी वाचन केले. ज्याच्यावर कर्ज आहे, त्याची गावभर बदनामी केली. हे आत्महत्या थांबविण्याचे प्रयत्न आहे की वाढविण्याचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने केलेल्या ‘मी लाभार्थी’ जाहिरातीचे कात्रण दाखवित ते म्हणाले, ३४ हजार कोटींचे कर्ज माफ केले, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, असे सरकार जाहिरात करून सांगत आहे. वरून योजनेचा फायदा घेतला म्हणून सरकार पैसा खर्चून तुमचे आभारही मानत आहे. अन् तुम्ही लोकं विनाकारण कर्जमाफी मिळालीच नसल्याचे सांगता, अशी कोपरखळी मारताना नरेंद्र-देवेंद्रचे फोटो छापून शेतकºयांची शुद्ध फसवणूक केली जात असल्याची टीका शरद पवार यांनी केली.

Web Title: Farmers, scientists will take workshops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.