ट्रक अपघातात १६ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 09:59 PM2018-01-15T21:59:26+5:302018-01-15T22:00:56+5:30

कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली.

16 cattle killed in truck accident | ट्रक अपघातात १६ जनावरे ठार

ट्रक अपघातात १६ जनावरे ठार

Next
ठळक मुद्दे१९ जखमी : पांढरकवडा बायपास चौफुलीवरील पहाटेचा थरार

आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : कत्तलीसाठी हैदराबादकडे जनावरे घेऊन जाणारा ट्रक उलटून १६ जनावरांचा तडफडून मृत्यू तर १९ जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता येथील पांढरकवडा बायपास चौफुलीवर घडली. या ट्रकचे चालक वाहक वाहन सोडून पसार झाले आहेत.
मध्य प्रदेश आणि नागपूर येथून जनावरे घेऊन ट्रक (क्र.एम.पी.०९ - ८४१४) हैद्राबादकडे जात होता. सोमवारी पहाटे येथील पांढरकवडा चौफुलीवर ट्रकचालकाचे नियंत्रण गेल्याने ट्रक उलटला. यात ट्रकमधील १६ जनावरांचा तडफडून मृत्यू झाला. तर १९ जनावरे गंभीर जखमी झाली. घटनास्थळावर हृदय हेलावणारे दृश्य दिसत होते. जनावरांच्या प्रेतांचा सडाच रस्त्यावर पडला होता. शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पहाटे ६ वाजतापासून अपघातग्रस्त ट्रकमधून जनावरे बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.हटकर व डॉ.वटाणे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठून जनावरांवर उपचार सुरू केले. नगरपरिषदेच्या मदतीने मृत जनावरे घटनास्थळावरून हलविण्यात आली.
या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात प्राणीसंरक्षण कायद्यानुसार शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कर्तव्यावर असलेले सहायक निरीक्षक विनोद झळके यांच्यासह ठाणेदार यशवंत बावीस्कर, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी घटनास्थळाला भेट देवून मदत कार्यास सुुरुवात केली.

हप्तेखोरीच्या वादातून घडला अपघात
जनावरे घेऊन जात असलेल्या ट्रकचा कळंबपासून आयटेन कार पाठलाग करीत होती. कत्तलीसाठी जाणाऱ्यां जनावरांना शहराबाहेर काढून देण्यासाठी काही टोळके राजरोसपणे हप्ते घेतात. एका ट्रिपला दहा ते वीस हजार रुपये आकारले जाते. हा ट्रक मडकोना येथून जात असताना या ट्रकमागे आयटेन कार लागली होती. यामध्ये काही तरुण चालकाला धमकावत होते. या धावपळीतच ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले तर पाठलाग करणारी आय-टेन कार गतिरोधकावर इंजीन आदळून जागेवरच बंद पडली. पोलिसांनी या कारच्या माध्यमातून तपास केल्यास रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दारव्हा येथे ४७ जनावरांची सुटका, १२ अटकेत, २० लाखांचा मुद्देमाल

दारव्हा : जनावरांची निर्दयपणे वाहतूक करणारी सहा वाहने पोलिसांनी पकडून ४७ जनावरांची सुटका तालुक्यातील हातोला येथे सोमवारी सकाळी ६ वाजता करण्यात आली. १२ जणांना पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारव्हा पोलिसांनी गोपनीय माहितीवरून हातोला येथे सोमवारी सकाळी सापळा रचला. त्यावेळी वाहनांची तपासणी केली असता सहा वाहनांमध्ये जनावरांची निदर्यपणे वाहतूक होत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ४७ जनावरांची सुटका केली. तर आरोपी साहेबराव विठ्ठलराव इंगोले (५०), फकीर मोहंमद शेख चाँद, एयाज खान मिराज खान (३०) सर्व रा. उमर्डा बाजार ता. कारंजा, शेख इकबाल शेख नूर (२०) रा. लोही, शेख अजीज शेख बशीर (६५), नईम खान कासम खान (२६), कासम खान फकीर खान (७२), हारुन खान रशीद खान (३६), शेख अन्वर शेख गुलाब (४२), शेख शहजाद शेख गुलाब (२९), शेख इर्शाद शेख रऊफ (३४), अलिम खान कासम खान (३६) सर्व रा. लोही यांना अटक करण्यात आली. तर शेख असफाक शेख कादीर (४७) रा. लोही पसार झाला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ डॉ. नीलेश पांडे, ठाणेदार रिता उईके, पीएसआय संदीप मुपडे, संतोष माने, प्रेमसिंग चव्हाण, कासम निम्सुरवाले, रोशन गुजर, केशव मुंढे, संजय साबळे आदींनी केली.

Web Title: 16 cattle killed in truck accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.