परिवहनच्या आगारामध्ये सौरऊर्जेचा होणार वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:47 PM2018-10-30T23:47:16+5:302018-10-30T23:47:55+5:30

विजेची होणार बचत, पहिलीच वास्तू, एकाच वेळी २३ बस उभ्या करण्याची क्षमता

Use of solar energy will be in transport agreements | परिवहनच्या आगारामध्ये सौरऊर्जेचा होणार वापर

परिवहनच्या आगारामध्ये सौरऊर्जेचा होणार वापर

Next

- राजू काळे

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन विभागाला यावर्ष अखेरीस नवीन बस आगाराची वास्तू उपलब्ध होणार असून हे आगार सौर ऊर्जेवर चालणारी पालिकेची पहिली वास्तू ठरणार आहे. यामुळे विजेच्या खर्चात बचत होणार आहे.

पालिकेने २००५ मध्ये स्थानिक परिवहन सेवा कंत्राटावर सुरू केल्यानंतर ती दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर बदलण्यात आली. सतत ती तोट्यात जात असल्याच्या कारणांमुळे बंद करून ही सेवा एनसीसी (नेट कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट) विथ व्हेरीएबल कॉस्ट संकल्पनेवर सुरू करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.

परिवहन सेवा तोट्यात चालल्याने ती असमाधानकारक ठरल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सेवा सुरू करताना प्रशासनाने त्यासाठी आगाराची व्यवस्था करण्याचे करारात मान्य करूनही ते १२ वर्षापासून परिवहन विभागाला उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आजही बसस्थानक व आगाराअभावी परिवहन सेवा कोलमडली आहे. एकूण ५८ पैकी सुमारे ३५ बसच प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत असून उर्वरित नादुरूस्त अवस्थेत आहेत. या बसची वेळेवर दुरूस्ती होत नसल्याने त्यांची दुरूस्ती कंत्राटावर शहराबाहेर केली जाते. त्यातही आवश्यक निधीसाठी स्थायीची परवानगी आवश्यक ठरत असल्याने दुरूस्तीला विलंब लागतो.

या दुरूस्तीसाठी अव्वाच्यासव्वा रक्कम खर्ची घातली जात असतानाही बस सतत नादुरूस्त होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सेवेसाठी आगाराची व्यवस्था प्रशासनाने अद्याप केली नसली तरी त्यांच्या पार्किंगसाठी मीरा रोड येथील प्लेझंट पार्क परिसरातील आरक्षित जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून परिवहन विभाग आगाराच्या प्रतीक्षेत असताना यावर्ष अखेरीस नवीन दुमजली आगार उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. घोडबंदर येथील ट्रक टर्मिनलच्या १८ हजार चौरस मीटर आरक्षीत जागेत एक इमारत प्रशासकीय कारभारासाठी तर दुसरी इमारत कार्यशाळेसाठी बांधण्यात आली आहे. या आगारात एकावेळी २३ बस उभ्या करता येणार असून आगारातच बसच्या इंधनाची सोय होणार आहे.

३६ कोटी येणार खर्च
३६ कोटींहून अधिक खर्चाच्या या आगारात अद्ययावत संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार असून, त्यासाठी पालिकेला खासगी कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वीज खरेदी करावी लागणार आहे.
त्यात लाखोंचा निधी खर्ची घालावा लागणार असल्याने त्याला बगल देण्यासाठी हे आगार थेट सोलार ऊर्जेवर चालविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असून, त्यातून सुमारे २०० किलो वॅटहून अधिक वीजनिर्मिती होणार आहे.

Web Title: Use of solar energy will be in transport agreements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.