ही अग्निपरीक्षा शिवसेना-भाजपची अन् बहुजन विकास आघाडीचीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 02:26 AM2018-05-23T02:26:50+5:302018-05-23T02:26:50+5:30

काटशहात सेनेची सरशी : कमळाने लावली सारी ताकदपणाला, काँग्रेस, डावे पिछाडीवर,बहुरंगी लढत होते आहे फक्त दुरंगी

This fire of Shiv Sena-BJP and Bahujan Vikas Aghadi also will be held | ही अग्निपरीक्षा शिवसेना-भाजपची अन् बहुजन विकास आघाडीचीही

ही अग्निपरीक्षा शिवसेना-भाजपची अन् बहुजन विकास आघाडीचीही

googlenewsNext

विक्र मगड : विक्रमगड- पालघरमध्ये निवडणुकीचे वारे सध्या जोरात आहेत, किंबहुना हे वारे वादळी झाले आहेत. सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवल्याने सगळ्यांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. खरे तर भाजपच्या एका चुकीनेच या निवडणुकीला इतके महत्त्व आले आहे. ही चूक होती, वनगा पुत्रांची अवहेलना.
ज्यांनी भाजपला या भागात ओळख निर्माण करून दिली, पक्ष वाढवला, त्यांनाच आणि त्यांच्या कुटुंबीयांना भाजपने वनगा यांच्या निधनानंतर बाजूला सारण्याचा प्रयत्न केला. तशी नाराजी वनगापुत्रांनी पत्रकार परिषद घेउन व्यक्त केली होती. ही नाराजी मात्र शिवसेनेच्या पथ्यावर पडली. शिवसेनेने लागलीच वनगापुत्रांना आश्रय देउन त्यांना उमेदवारीही बहाल केली. साहजिकच वनगापुत्रांचा शिवसेना प्रवेश व त्यांना दिली गेलेली उमेदवारी भाजपला बोचणारी आणि त्यांच्या अहंकाराला डिवचणारी ठरली. नंतर मुख्यमंत्र्यांनी सारवासारव करून आपण कसे त्यांना उमेदवारी देणार होतो आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत सल्लामसलत केली होती, याचे पाढे वाचले होते. पण एव्हाना शिवसेनेने यात सरशी केली होती आणि पालघरवासीयांची सहानुभूतीही आपल्या बाजूने केली होती.
शिवसेनेची ही खेळीच आणि भाजपची ही चूक पालघरची ही निवडणूक प्रतिष्ठेची करणारी ठरली आहे. अन्यथा, ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची झाली नसती. राज्यातील पोटनिवडणुकांत भाजपविरोधी आलेले निकाल, कर्नाटकमध्ये भाजपला आलेली नामुष्की, या सगळ्याचा परिपाक पालघर निवडणुकीत दिसण्याची चिन्हे असल्याने भाजपनेही कंबरेचा कासोटा घट्ट करत मातब्बर नेत्यांना या निवडणुकीच्या प्रचारात उतवण्याचा निर्णय घेतला आहे.
याचेच फलित म्हणून उद्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरारमध्ये येत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही आपली तोफ रविवारी नालासोपाऱ्यात येउन डागली आहे. ही अग्निपरीक्षा शिवसेना-भाजपची असली तरी याचे चटके आता बहुजन विकास आघाडी या स्थानिक पक्षालाही बसत आहेत. बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सुरु वातीलाच भाजप-शिवसेना एकच उमेदवार देणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, असे घोषित केले होते. पण वाघा-सिंहाच्या या लढाईत आता संपूर्ण जंगलातच वणवा भडकला असून, आपल्या गुहेत निवांत असलेल्या बविआसारख्या हरणाचीही होरपळ होणार आहे.
पालघरची ही पोटनिवडणूक आता वेगळ्या वळणावर येउन ठेपली आहे. या निवडणुकीला केवळ या निवडणुकीचेच कंगोरे राहिलेले नाहीत. तर ही निवडणूक पुढील निवडणुकांवरही प्रभाव टाकणारी ठरणार आहे. आणि याचे जास्तीत जास्त चटके भविष्यात बविआला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कधी नव्हे, ते अनेकानेक मातब्बर नेते पालघर आणि वसई-विरारची धूळ उडवत आहेत.
नुकतेच राज ठाकरे या भागात येउन गेले होते. त्यांच्या येण्याने या भागात चैतन्य होते. पण राज ठाकरे यांचे भाषण मनसे आणि वसईकरांच्या अपेक्षेला उतरले नाही. त्यांनी भाजपवर आणि मोदींवर तोंडसुख घेतले. पण सत्ताधारी बहुजन विकास आघाडीविरोधात बोलणे टाळले. त्यामुळे बविआ निश्ंिचत झाली. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे त्यांना तसे अपेक्षितच होते. अशीच अपेक्षा रविवारच्या सभेत बविआला मुख्यमंत्र्यांकडून होती. तर वसईकरांचा समज मुख्यमंत्री तसे काही बोलणार नाहीत, असा होता.
पण राज ठाकरे यांनी केलेली चूक मुख्यमंत्र्यांना करून भागणार नव्हते. अप्रत्यक्ष का होईना, मुख्यमंत्र्यांनी बविआवर टीका करून त्यांचीच शिट्टी वाजवत त्यांना सूर्याचे पाणी दाखवले आणि वसईकरांनाही धक्का दिला. राज ठाकरे यांनी बविआवर बोलणे टाळल्याने वसईकरांची राज ठाकरे यांच्यावरील नाराजी बविआला मते देणार नाही. तर राज ठाकरे यांनी मोदींवर केलेली टीका आणि मराठी माणूस हा मुद्दा शिवसेनेच्या पारड्यात अप्रत्यक्ष मते टाकणारा ठरेल. तर मुख्यमंत्र्यांनी बविआवर टीका करून नालासोपारा आणि वसईतील बविआच्याच परप्रांतीय मतांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे बविआच्या गोटात थोडी का होईना, खळबळ असेलच.

मनोज तिवारी यांची विरार ते नालासोपारा प्रचार रॅली आणि उद्या विरारमध्ये येत असलेले योगी आदित्यनाथ हा भविष्यातील निवडणुकांचा ट्रेलर आहे, हे कदाचित बविआच्या लक्षात आले असेलच. कधी काळी भाजपच्या राम नाईक यांच्याविरोधात गोविंदाला पाठिंबा देउन बविआने या भागातील परप्रांतीयांना चुचकारले.

बविआची ही खेळी यशस्वीही ठरली होती. पण या लढाईत एका अभ्यासू नेत्याचा झालेला पराभव कुणाच्याच पचनी पडला नव्हता. त्यानंतर गोविंदा या भागात किती वेळा आला हादेखील संशोधनाचा विषय ठरला होता. या निवडणुकी निमित्ताने भाजपलाही बविआवरील उट्टे काढण्याची संधी मिळाली आहे.

ती अशी. बविआच्या तीन आमदारांचे समर्थन राज्यात भाजपला आहे, पण पालघरची खासदारकीही भाजपला सोडायची नाहीये. ती त्यांच्यासाठी प्रतिष्ठा आहे. या सगळ्याचा लेखाजोखा रविवारी मुख्यमंत्र्यांनी मांडला. पण आता या गडाला हळूहळू का होईना सगळेच पक्ष ढुसण्या देउ लागले आहेत. उद्या या भागात विरोधकांची ताकद वाढेल.

Web Title: This fire of Shiv Sena-BJP and Bahujan Vikas Aghadi also will be held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.