चक्रीवादळाचा पाऊस; कही खुशी कही गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:33 PM2018-09-22T23:33:20+5:302018-09-22T23:33:36+5:30

वातावरणात बदल होऊन गत २४ तासात वर्धा जिल्ह्यात सरासरी ९९.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. हा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला असला तरी काही ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.

Hurricane; So happy gum | चक्रीवादळाचा पाऊस; कही खुशी कही गम

चक्रीवादळाचा पाऊस; कही खुशी कही गम

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात सरासरी ९०.३० मि.मी. पाऊस : घरांसह उभ्या पिकांना फटका, काही मार्गावरील वाहतूक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वातावरणात बदल होऊन गत २४ तासात वर्धा जिल्ह्यात सरासरी ९९.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. हा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला असला तरी काही ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. नदी व नाले दुथडी भरून वाहत असल्याने पुराचे पाणी पुलावरून ओसंडून वाहत आहे. परिणामी, काही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पुलावरील पुराचे पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
भूपृष्ठावरील वाढते तापमान आणि समुद्रावरील घटलेले तपामान यामुळे वातावरणात बदल होऊन सायक्लोन (चक्रीवादळ) तयार झाले. सदर चक्रीवादळ चायना, जपान कडून काल छत्तीसगड व मध्यप्रदेश वर राहिल्याने त्याचा परिणाम वर्धा जिल्ह्यावर जाणवला. याच चक्रीवादळामुळे वातावरणात बदल होऊन शुक्रवारी जिल्ह्यात वरुण बरसला. मागील २४ तासात वर्धा जिल्ह्यात सरासरी ९९.३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्याचे हवामान खात्याच्या सुत्रांनी सांगितले.
शुक्रवारी झालेला पाऊस हा परतीचा नसून परतीचा पाऊस आणखी सुमारे एक आठवला लांबल्याचेही हवामान खाद्याच्या सुत्रांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही जलाशयांच्या पाणी पातळीत थोडी का होईना पण वाढ झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काहींचे नुकसान झाल्याने त्यांना चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना शासकीय यंत्रणेने सर्वेक्षण करून शासकीय मदत देण्याची मागणी आहे.
कापसीनजीकचा नवीन पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद
मोझरी (शे.) : वर्धा-राळेगाव मार्गावरील कापसी नजीेकच्या नाल्यावरील नवीन पुलाचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून सूरू आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे या नाल्यातील जलपातळीत वाढ झाली. याच दरम्यान नाल्याच्या पूरात नवीन बांधकामाचा काही भाग वाहून गेला. शिवाय पाईप व दिलेला मातीचा भरही वाहून गेला.
वादळासह पावसामुळे घराचे नुकसान
समुद्रपूर : शुक्रवारी झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे अंतरगाव येथील शेतकरी श्रावण भोयर यांच्या घराचे नुकसान झाले. सततच्या पावसादरम्यान त्यांचे घर जमिनदोस्त झाले. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. शुक्रवारचा पाऊस पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला असला तरी तालुक्यातील काही भागातील शेतपिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. काही ठिकाणी घरांची परडझ तर काही ठिकाणी मोठाली झाडे उन्मळून पडल्याचे सांगण्यात आले. घर पडल्याने शेतकरी श्रावण भोयर यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. तलाठी पन्नासे यांनी या घटनेची नोंद घेतली असून सरपंच जया कन्हाळकर, उपसरपंच प्रशांत बोरकुटे, ग्रा.पं. सदस्य प्रकाश चौधरी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
यशोदेच्या पुरामुळे दहा तास वाहतूक प्रभावित
वायगाव (नि.) : शुक्रवारी झालेल्या सततच्या पावसामुळे यशोदा नदीच्या जलपातळीत वाढ झाली. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास बघता-बघता दुथडी भरून वाहनाऱ्या यशोदा नदीचे पाणी वायगाव (नि.) नजीकच्या सरुळ येथील नदीवरील पुलावरून वाहण्यास सुरूवात झाल्याने वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी दुपारी पूराचे पाणी कमी झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सुमारे दहा तास या मार्गावरील वाहतूक बंद होती.
१४८ घरांचे अंशत: तर दोन घरांचे पूर्णत: नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : काल दुपारपासून सुरु झालेल्या पावसाने हिंगणघाट तालुक्याला चांगलेच झोडपले. एकाच दिवसात सरासरी २२६.२४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. सावली (वाघ ) मंडळ क्षेत्रात २५२ मिमीसह पावसाचा उच्चांक राहिला असल्याची माहिती तहसीलदार सचिन यादव यांनी दिली. पावसामुळे तालुक्यातील सुलतानपूर येथील नाल्यावरचा पूल वाहून गेल्याने या गावाचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला. त्याच प्रमाणे मनसावळी जवळील हिंगणघाट कापसी रस्ता पूर्णपणे पाण्यामुळे खरडून नेला. शुक्रवारी सकाळी १० वाजता रिपरिप पावसाला सुरवात झाली. दुपारी पावसाने चांगलाच जोर धरला. तालुक्यातील बहूतांश नाले दुथडी भरून वाहत असल्याने तसेच काही वेळी पाणी पुलावरूनही वाहल्याने वाहतूक प्रभावीत झाली होती. हिंगणघाट येथून काजळसरा मार्गे नरसाळा येथे रात्री ७.३० वाजता १७ प्रवासी घेऊन जाणारी एसटी कुंभी आणि सातेफळ शिवारातील नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्यात अडकली होती. आ. समीर कुणावार तसेच स्थानिक प्रशासन आणि सातेफळच्या ग्रामस्थांच्या मदतीने या अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे चिचोली, मनसावळी, नंदोरी यासह काही ग्रामीण रस्त्यावरील वाहतूक काहीवेळेकरिता बंद होती. पावसासोबत वादळी वारा असल्याने काही झाडे उन्मळून पडली. शहरातील शिवाजी वॉर्ड, गांधी वॉर्ड, जुनी वस्ती या परिसरातील जुने मोठे झाडे उन्मळून पडले. तसेच काही घरांची पडझड झाली आहे. तालुक्यातील १४८ घरांचे अंशत: तर दोन घरांचा पुर्णपणे नुकसान झाले आहे. पुरात अडकलेल्या भगवा गावातील तिघांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
झाड उन्मळून पडले
शुक्रवारी झालेल्या पावसादरम्यान रात्री ७.३० वाजताच्या सुमारास प्रभाग क्रमांक १३ मधील गांधी वॉर्ड भागातील सालफेकर यांच्या घरासमोरील मोठे झाड अचानक उन्मळून पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. झाड पडल्यामुळे विद्युत ताराही तुटल्या होत्या. जमिनीवर पडून असलेल्या जीवंत विद्युत तारा मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देत असल्याने माहिती मिळताच नगरसेवक सौरभ तिमांडे यांनी संबंधितांना त्याची माहिती दिली. त्यानंतर या भागातील विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. रस्त्यावरील झाड बाजूला करून वेळीच पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सौरभ तिमांडे यांनी केली आहे. भिकमचंद रांका, सुरेश भंडारी, अविरचंद भागडीया, विजय मुश्या, डॉ. चौधरी, केशव सालवेकर, रविंद्र डोंगुलवार, श्याम बतरा आदींची उपस्थिती होती.

Web Title: Hurricane; So happy gum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.