हेल्मेट सक्तीच्या संभ्रमात दंडाची ‘लगीनघाई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 10:26 PM2018-04-26T22:26:56+5:302018-04-26T22:26:56+5:30
जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात प्रारंभी ७ मे पर्यंत नागरिकांना हेल्मेटची सवय लागावी याकरिता नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले; मात्र नेहमी वसुलीचे टार्गेट बाळगणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून यात वसुली होणार नाही तर नवलच.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली. यात प्रारंभी ७ मे पर्यंत नागरिकांना हेल्मेटची सवय लागावी याकरिता नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले; मात्र नेहमी वसुलीचे टार्गेट बाळगणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून यात वसुली होणार नाही तर नवलच. सुमारे १५ दिवस नोटीस बजावण्याचे सांगणाऱ्या वाहतूक पोलिसांकडून या हेल्मेटसक्तीच्या नावावर दंड ठोठावण्याची लगीनघाई झाली असल्याचे दिसत असून अनेकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
वर्धा शहर सुमारे चार किमीच्या परिघात संपणारे एक छोटे शहर आहे. येथे हेल्मेटसक्तीची चर्चा झाली त्या वेळातच सर्व सामान्यांकडून त्याला विरोध झाला. तरीही जिल्हा पोलीस प्रशासनाने ही सक्ती केली. हेल्मेट सक्ती करण्यापुर्वी शहरातील अनियंत्रित वाहतूक नियंत्रित करण्याची मागणी नागरिकांकडून झाली. याकडे मात्र वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे. अशातच झालेली हेल्मेटसक्ती अनेकांना त्रासाची ठरत आहे. यात प्रारंभी नागरिकांना सवय लागावी याकरिता व हेल्मेटचे महत्त्व नागरिकांना पटावे याकरिता त्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले. यावेळी कोणताही दंड आकारण्यात येणार नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले होते.
यानुसार शहरातील मोठ मोठ्या चौकात वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना अडवून त्यांना हेल्मेटबाबत विचारणा करून त्याला नोटीस बजावणे सुरू झाले. कालपर्यंत वाहतूक पोलिसांकडून ४५० नागरिकांना नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. या नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असताना काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कार्यवाही करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
आदित्य संजय भिसे हा विद्यार्थी परीक्षा असल्याने पिपरी (मेघे) येथील रामकृष्ण बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात जात असताना तंत्रनिकेतनजवळ वाहतूक पोलिसांनी अडविले. वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचा दंड आकारतानाच हेल्मेटसाठी तब्बल १५०० रुपयांचा दंड आकारला. यातील एक हजार रुपये त्याचे वडील संजय भिसे यांनी अदा केले. वास्तविक, पोलिसांनी ७ मे नंतर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे सांगितले होते; पण कारवाईची लगीनघाई झालेल्या वाहतूक पोलिसांनी २६ एप्रिलपासूनच दंडात्मक कारवाईला प्रारंभ केल्याचे दिसते.
नागरिकांना हेल्मेटची सवय लावण्याकरिता असलेली ही सक्ती आता दंडात्मक कारवाईकडे दिलेल्या मुदतीच्या पहिलेच वळत आहे. यामुळे हेल्मेटच्या नावाखाली वाहतूक पोलिसांना हेल्मेट सक्तीच्या नावाखाली काय साधायचे आहे, याचा अंदाज येत आहे.
शहरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची गस्त
हेल्मेट सक्तीच्या नावावर होत असलेल्या कारवाईकरिता वाहतूक पोलीस केवळ शहरातच नाही तर शहराबाहेर असलेल्या रस्त्यांवरही पोलिसांची गस्त सुरू झाली आहे. शहराबाहेर होत असलेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत नागरिकांचे समर्थन आहे. पण शहरात होत असलेल्या दंडात्मक कारवाईमुळे मात्र असंतोष पसरत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भात पोलीस विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देत होत असलेल्या या प्रकारावर आळा घालण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचलण्यात आलेल्या या पावलाचा संबंधितांकडून अतिरेक होणार नाही याची वेळीच काळजी घेण्याची गरज आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या दंडात्मक कार्यवाहीवर प्रतिबंधाची मागणी आहे.
विद्यार्थ्याला १५०० रुपयांचा दंड
पिपरी (मेघे) येथील रामकृष्ण बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात जात असताना तंत्रनिकेतनजवळ वाहतूक पोलिसांनी अडविले. वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचा दंड आकारतानाच हेल्मेटसाठी तब्बल १५०० रुपयांचा दंड आकारला.
पिपरी येथील रामकृष्ण बजाज तथा अन्य महाविद्यालयांत स्वत: जाऊन विद्यार्थ्यांना सूचना केल्या होत्या. यावरून बहुतांश विद्यार्थी हेल्मेट घालूनच दुचाकी चालविताना आढळले; पण आदित्यने परवाना नसतानाही हेल्मेटचा वापर केला नाही. यामुळे त्याला स्वत: दंड केला.
- दत्तात्रय गुरव, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रक शाखा, वर्धा.