टिएमटी एम्पालॉईज युनियनवर कोणाचा कब्जा शिवसेना विरुध्द भाजपा रंगणार सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 04:12 PM2017-10-27T16:12:12+5:302017-10-27T16:17:29+5:30
तब्बल १२ वर्षानंतर होत असलेल्या टिएमटी एम्पॉलाईज युनियवर कोणचा कब्जा होणार याचे चित्र आता शनिवारी मध्यरात्रीच स्पष्ट होणार आहे. शिवसेनेच्या हातून सत्ता खेचण्यासाठी भाजपाने आपली शक्ती पणाला लावली आहे. तर विद्यमान प्रगती पॅनलने देखील आपली सत्ता अबादीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ठाणे - तब्बल १२ वर्षांनंतर लागलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या मान्यताप्राप्त टिएमटी एम्पलॉईज युनियनच्या निवडणुकीत आता शेवटच्या टप्यात आरोप प्रत्यारोप, श्रेयाची लढाई सुरु झाली आहे. मागील २५ वर्षात परिवहनला चांगले दिवस दिल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. तर शिवसेनेने परिवहनचा बट्टाबोळ केल्याचा आरोप भाजपाने केला आहे. परंतु तिसरीकडे राष्टÑवादीच्या पॅनलने मात्र आपला छुपा प्रचार कायम ठेवत या निवडणुकीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता परिवहनवर कोणाचा झेंडा फडकणार हे आता शनिवारी रात्रीच निश्चित होणार आहे. या निवडणुकीत सात पदाधिकारी आणि ३० सदस्य पदासाठी तब्बल ९४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहेत.
ठाणे परिवहनची सेवा १९८९ च्या सुमारास ठाणेकरांच्या सेवेसाठी सुरु झाली. त्यानंतर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली या परिवहन सेवेत टिएमटी एम्पलॉईज युनियनची स्थापना करण्यात आली. ही एक मान्यता प्राप्त युनियन असून या युनियनवर १९९०-९१ च्या सुमारास धर्मवील पॅनलने कब्जा केला होता. मधला काळ वगळता थेट १२ वर्षांनतर आता युनियनची निवडणुक लागली आहे. या निवडणुकीत सुरवातीला शिवसेनेच्या धर्मवीर पॅनल विरुध्द राष्टÑवादीच्या शरद राव प्रणीत प्रगती पॅनल असा सामना रंगणार अशी चिन्हे होती. परंतु अचानकपणे भाजपाच्या विकास पॅनलने या निवडणुकीत उडी घेतली आणि मतांचे विभाजन होण्यास सुरवात झाली. विकास पॅनलने विकासाचा मुद्दा घेऊन शिवसेनेकडून झालेल्या चुकांचा पाडाच कामगारांना पुढे वाचण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे, ज्या ६१३ कामगारांना कायम करण्याचे आश्वासन शिवसेना मागील कित्येक वर्षापासून देत होती. त्याबाबतचा निर्णय भाजपाने एका फटक्यात शेवटच्या टप्यात आणून ठेवला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून देखील भाजपाचे आता केंद्राचे दाखले दिले जाऊ लागले असून त्यांच्याकडून केवळ दिशाभुलच केली जात असल्याचा आरोप होत आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून स्वत: ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचारात घौडदोड घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपाच्या वतीने आमदार संजय केळकर, शिवाजी पाटील, नारायण पवार, भरत चव्हाण, कृष्णा पाटील यांनी शिवसेनेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे.
दरम्यान आता निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी सांयकाळी आरोप प्रत्यारोपांच्या झडी उडवित संपला आहे. शनिवारी सकाळी सात वाजता खºया अर्थाने मतदानाला सुरवात होणार असून येथील एनकेटी महाविद्यालयात ही प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी सात ते सांयकाळी पाचवाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार असून यात १८८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पाच वाजता निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर सांयकाळी सहा वाजता मतमोजणीला सुरवात होऊन रात्री १२ वाजेपर्यंत निकाल हाती येणार आहे.