वाघबीळ ग्रामस्थांनी राजन विचारेंना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:42 AM2019-04-25T01:42:03+5:302019-04-25T01:42:47+5:30

पोलिसांसोबतही झाला वाद, शिवसेनेला टेन्शन, भूमिपुत्रांना संकटसमयी साथ न दिल्याचा आरोप

Waghbil villagers threw Rajan's ideas | वाघबीळ ग्रामस्थांनी राजन विचारेंना पिटाळले

वाघबीळ ग्रामस्थांनी राजन विचारेंना पिटाळले

Next

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारक्षेत्रातून निवडून आलेले खासदार भूमिपुत्रांवर आलेल्या संकटांच्या वेळी गेली पाच वर्षे गावात फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे संतापलेल्या वाघबीळ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरवले आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी वाघबीळ गावातून शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांची रॅली गावकऱ्यांनी रोखून त्यांना पिटाळून लावले. यावेळी पोलिसांबरोबरसुद्धा बाचाबाची झाली. हे लोण आता ठाणे, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर क्षेत्रातील गावागावांत पसरण्याची चिन्हे असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.

गेल्या दोनतीन वर्षांत भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, खाडीचे पाणी शुद्धीकरणाचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टिंग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे जमीन अधिग्रहण, मोबदला न देताच सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई आदी अनेक संकटे आली. परंतु, या समस्या सोडवण्यासाठी खासदारांसह कोणत्याही राजकीय मंडळींनी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंगळवारी वाघबीळ भागात विचारे यांची रॅली गेली होती. यावेळेस गावकºयांनी ती थांबवण्याचा जोरदार प्रयत्न केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्तही होता. परंतु, त्यानंतरही गावकºयांची रॅली रोखून त्यांना पिटाळले. मागील पाच वर्षांत खासदार आमच्याकडे फिरकले नाहीत. आमच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. आता मात्र मते मागण्यासाठी आल्यानेच त्यांना आम्ही विरोध केल्याचे गावकºयांनी यावेळी स्पष्ट केले.

ग्रामस्थांच्या नाराजीची ही आहेत प्रमुख कारणे
मागील काही महिन्यांपासून स्थानिक भूमिपुत्रांकडून क्लस्टरला विरोध सुरूआहे. गावाचे सीमांकन निश्चित केल्यानंतरच क्लस्टर योजना राबवावी, असेही त्यांचे म्हणणे आहे. परंतु, असे असतानाही पालिकेच्या माध्यमातून सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. शिवाय, वाघबीळ गावात इतर काही प्रकल्पांसाठीसुद्धा पालिकेने जमीन अधिग्रहण करण्यासाठी तयारी केली आहे.
सत्तेत असलेल्या शिवसेनेने याला विरोध करण्याऐवजी यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे यासंदर्भातही ग्रामस्थांची नाराजी आहे. शिवाय, यापूर्वीसुद्धा विविध प्रकल्पांसाठी येथील रहिवाशांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. शिवाय, विविध विकास प्रकल्प राबवले जात असल्याने त्यामुळे येथील नुकसान झाले आहे. त्यामुळे हळूहळू गावपण हरपू लागले आहे.
एकूणच याबाबतीत राजकीय मंडळींकडून, विशेषत: शिवसेनेकडून काहीच न झाल्याने त्याचा रोष आता सहन करण्याची वेळ अखेर उमेदवार राजन विचारे यांच्यावर आली आहे. केवळ वाघबीळच नव्हे, तर ठाण्यातील बाळकुम, कावेसर, मानपाडा, ढोकाळी, कासारवडवलीसह नवी मुंबईतील सर्व ग्रामस्थांच्या प्रॉपर्टीकार्डसह इतर प्रश्नांवर शिवसेनेने कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही.

Web Title: Waghbil villagers threw Rajan's ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.