डोंबिवलीत धावतात तीन हजार बेकायदा रिक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:14 AM2018-12-10T00:14:35+5:302018-12-10T00:15:01+5:30

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत नजर जाईल तिथे रिक्षाच दिसतात. दुचाकींची वाढलेली संख्या, अरूंद रस्ते, जिथे रस्ता रूंदीकरण झाले तिथे रिक्षाचालकांनी बेकायदा तळ सुरू केले आहेत.

Three thousand illegal rickshaws run in Dombivli | डोंबिवलीत धावतात तीन हजार बेकायदा रिक्षा?

डोंबिवलीत धावतात तीन हजार बेकायदा रिक्षा?

Next

-अनिकेत घमंडी, डोंबिवली

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत नजर जाईल तिथे रिक्षाच दिसतात. दुचाकींची वाढलेली संख्या, अरूंद रस्ते, जिथे रस्ता रूंदीकरण झाले तिथे रिक्षाचालकांनी बेकायदा तळ सुरू केले आहेत. पदपथ धड नाहीत, अशा परिस्थितीत आम्ही चालायचे कुठून, असा प्रश्न सर्वसामान्य डोंबिवलीकर विचारत आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल तीन हजार बेकायदा रिक्षा शहरात धावत असल्याने ही परिस्थिती किती गंभीर आहे, याचा सहज अंदाज येतो.

शहरातील दळणवळणाच्या साधनांमध्ये कल्याण- डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा प्रवाशांच्या नजरेत सपशेल अपयशी ठरत आहे. प्रवाशांना इच्छा नसतानाही रिक्षाचा पर्याय वापरावा लागतो. परिणामी डोंबिवलीत रिक्षाचालकांची मक्तेदारी झाली आहे. यातूनच काही उपद्रवी रिक्षाचालक मनमानी कारभार करून प्रवाशांशी हुज्जत घालतात. या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. बेकायदा रिक्षा चालवणे, स्टँडचे नियम न पाळणे, राजकीय वरदहस्त मिळवून वाहतूक नियमांना पायदळी तुडवणे, हम करे सो कायदा अशा अविर्भावात प्रवाशांना उद्धट वागणूक देऊन गुंडगिरी करणे आदी घटनांनी प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत. वाहतूक पोलिसांचा कानाडोळा आणि आरटीओ विभागाचा वचक नसल्याने शहरात अनागोंदी कारभार वाढत चालला आहे. या बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी शहरातील विविध पक्षांच्या तसेच अन्य रिक्षा संघटनेच्या पदाधिकाºयांनी एकमुखाने केली आहे. कारवाईच्या मागणीसाठी सर्व संघटना एकत्र येणे, हे चांगले द्योतक असून आता या कारभारावर कसा वचक निर्माण करायचा, हे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण परिवहन क्षेत्रात ४२ हजार रिक्षा असून त्या कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुरबाड आणि बदलापूर आदी भागांमध्ये धावतात. कल्याण, डोंबिवली परिसरात तीन हजार रिक्षा बेकायदा असून, गेल्या वर्षभरात विविध ठिकाणच्या कारवायांमध्ये सुमारे ६०० बेकायदा रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे ससाणे यांनी सांगितले; मात्र तरीही तीन हजारांहून अधिक बेकायदा वाहने रस्त्यावर बिनबोभाट धावत असतील तर ही परिस्थिती गंभीर नाही का, हा प्रश्न यंत्रणेला का भेडसावत नाही. त्यामुळे निर्माण झालेला पेच कुणी सोडवायचा आणि त्याला कोणी व का सामोरे जायचे, हा मोठा सवाल आहे. सुशिक्षितांच्या शहरामध्ये सिग्नल यंत्रणेचा अभाव आहे, झेब्रा क्रॉसिंग नाही, वेग मर्यादा नाही की रांगेची शिस्त नाही. त्यामुळे सगळा अनागोंदी कारभार दिसून येत आहे.

एकीकडे वारेमाप भाडे आकारले जाते, मीटर सक्ती असतानाही कोणताही रिक्षाचालक मीटर लावत नाही, ठाण्याचे उदाहरण केवळ नावालाच असून तेथील वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकाºयांना शहरातील समस्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे उपद्रवींचा शहरामध्ये हैदोस सुरू असून प्रवासी मात्र भरडलेजात आहेत.

सीएनजी आली पण आजही याठिकाणी पेट्रोलचे दर आकारून प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे. ठाण्यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी १८ रूपये आकारण्यात येत असतानाच कल्याण, डोंबिवलीत मात्र पहिल्या टप्प्यासाठी २० रूपये आकारले जातात. घारडा, एमआयडीसी, नांदिवली, कल्याण फाटा आदी ठिकाणी स्वतंत्र जायचे असेल तर किती भाडे आकारले जाईल याचा काहीही अंदाज नसतो. प्रवाशांना नाना अनुभव येत असल्याने ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशा अवस्थेत नागरिक वावरत आहेत. तक्रार करायची झाली, तर वाहतूक नियंत्रण विभागाकडे तगादा लावावा लागतो. आरटीओच्या कल्याण कार्यालयात जायचे, तर दिवसाचा खोळंबा होतो. शिवाय तिथे गेल्यावरही काम होईलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मनमानी कारभारास विरोध करायचा कुणी प्रयत्न केला, तर त्या चांगल्या माणसाच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण केले जाते, हा अनुभव सातत्याने नागरिकांना येतो. ही गंभीर परिस्थिती असूनही अधिकारी निष्काळजी असतील, तर आगामी काळात सुशिक्षितांचे हे शहर काही मुजोर रिक्षाचालकांचे संस्थान बनेल आणि ते संस्थान खालसा करणे, हे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनेल, अशी विचित्र स्थिती आहे.

शहरांमधील काही रिक्षातळावर रांगेत वाहने लावण्यासाठी २ रूपयांपासून १० रूपयांपर्यंत आकारले जातात. काही ठिकाणी बॅज आणि परवाना नसतानाही रिक्षा चालवल्या जातात, असा आरोप रामनगरच्या रिक्षाचालकांनी वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांकडे केला होता. त्यात तथ्य असल्याचे शहरातील पूर्वेकडील काही स्टँडवर फेरफटका मारल्यावर दिसून येते. गोळा होणारा निधी कुठे, कोणासाठी वापरला जातो, तो कोणाच्या घशात जातो हे प्रश्न वर्षानुवर्षे अनुत्तरीतच आहेत. त्याचा कसलाही ताळेबंद, कुणाकडेही नाही.

आरटीओ अधिकारी केव्हा मिळणार?
डोंबिवलीमध्ये पूर्णवेळ आरटीओ अधिकारी हवा ही मागणी वर्षानुवर्षे कागदावरच असून येथील अधिकारी त्यासंदर्भात केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेव्हा कोंडीची समस्या उद्भवते आणि जेव्हा काही रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळीच ही मागणी पुन्हा जोर धरते. त्याची दखल कल्याण, ठाणे या ठिकाणचे आरटीओ अधिकारी घेत नाहीत.

डोंबिवली पूर्वेला संगीतावाडी भागातील ट्रॅफिक गार्डन नावाला उरले असून, तेथे अधिकारी कार्यरत राहावा, यासाठी संबंधित यंत्रणेमध्येच इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे. गल्लोगल्ली रिक्षातळ बनले असून सर्व ठिकाणी प्रवाशांना समस्या भेडसावत आहेत. वाहतूक, आरटीओ, स्थानिक पोलीस आणि महापालिका आदींच्या समितीने दिलेला अहवाल काटेकोरपणे का पाळला गेला नाही, हे न उलगडणारे कोडे आहे.

बंद करायचे रिक्षातळ
चिमणी गल्ली, मदन ठाकरे, सरोवर बार गोग्रासवाडी, वामननगर गोग्रासवाडी, पाथर्ली गावठाण, सावरकर रोड महादेव मंदिराजवळ, विवेकानंद सोसायटी, सारस्वत कॉलनी, गावदेवी मंदिर चौक, शिवमंदिर चौक, हनुमाननगर स्नेहांकित मित्र मंडळ चौक, कृष्णसुदामा, हनुमान नगर डीएनसी शाळेच्या पाठीमागे, ओम बंगला आयरे रोड, स्वामी नारायण मद्रासी मंदीर, साईबाबा मंदिर आयरे रोड, राजगंगा तसेच पश्चिमेकडील अपूर्व हॉस्पिटल, म्हाळसाई, सखाराम, शास्त्रीनगर, तुळशीराम जोशींच्या बंगल्याजवळ, श्रीराम मंदिर स्टँड क्रमांक ३ जवळ, नेमाडे गल्ली स्टँड क्र.१, गिरिजामाता मंदिराजवळ, फुलेनगर, गावदेवी मंदिराजवळ, गोपीनाथ चौकाच्या नाल्याजवळ, अनमोल नगरी, श्रीधर म्हात्रे चौक, गरिबाचा वाडा, नीलकमल बंगल्याजवळ देवीचा पाडा, फुले रोड स्वामी शाळेजवळ, भरत भोईर नगर रिक्षा स्टँड रेतीबंदर रोड, महाराष्ट्र नगर अभिनंदन सोसायटीजवळ, महाराष्ट्र नगर योग संकुलासमोर, श्रमसाफल्य बंगल्याजवळ विजय सोसायटी, नवापाडा-सुभाष रोड, करण बिल्डिंगजवळ, शंखेश्वर पाडा सुभाष रोड, चर्चजवळ, गणपती मंदिराजवळ, गांधी उद्यानानजीक, जयहिंद कॉलनी, रोकडे बिल्डिींगीजवळ, ट्रांझिट कॅम्पनजीक, त्रिभुवन सोसायटी, राजश्री बंगला, सम्राट चौक, लक्ष्मी डेअरीजवळ - दीनदयाळ रोड आणि प्लेक्स जिमजवळचा स्टँड बंद करण्याचे अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले होते. या अहवालात डोंबिवली पश्चिमेला ६० तर पूर्वेला ६३ रिक्षा थांबे असल्याचे नमूद करण्यात आले होते. या थांब्यांवर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने तेथील काही रिक्षाचालक नियम तोडतात, त्यामुळे भांडणे होतात. त्यासाठी शहरामध्ये सर्व ठिकाणचा आढावा घेत एकूण ६३ रिक्षा थांबे असावेत, अशी सूचना करण्यात आली होती. त्यात पूर्वेकडे ३४ तर पश्चिमेला २९ रिक्षा थांबे असावेत, असे समितीद्वारे सुचवण्यात आले होते.

भाडेवाढ मिळणार असल्याने रिक्षाचालक समाधानी; पण प्रवाशांच्या सुविधांचे काय?
शहरातील पश्चिमेत झालेल्या अचानक रिक्षाभाडेवाढीमुळे नागरिक आणि रिक्षाचालक यांच्यातील संघर्ष समोर आला. त्याची दखल घेत कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रिक्षा संघटनांची बैठक बोलावली होती.
या बैठकीत सीएनजी रिक्षांसाठी २०१५ मध्ये आरटीओने मंजूर केलेले दर विविध तळांवर प्रदर्शित करून सध्याच्या शेअर रिक्षांच्या भाड्यात वाढ झाली तर ती देणे अथवा भाडे कमी आकारण्याच्या सूचना असतील तर त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी असे एकमताने ठरवण्यात आले.
त्यामुळे एकूणच काय तर रिक्षा चालकांना सध्याच्या भाड्यामध्ये २ रूपये ते १० रूपये अशी घसघशीत वाढ मिळणार असल्याने रिक्षाचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पण त्या बदल्यात ते रिक्षाचालक प्रवाशांना दर्जात्मक सुविधा देतील का, याची शाश्वती मात्र नाही.

परिस्थितीमध्ये बदल हवा आहे
ठाण्यातील वरिष्ठांनी समिती स्थापन केल्यानंतर आम्ही तातडीने प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल बनवला. तो वरिष्ठांकडे दोन महिन्यांपूर्वीच दिला. त्यावर सूचना, हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुढे काय झाले याची कल्पना नसल्याचे मत तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील रिक्षा युनियन कार्यालये, रिक्षाचालक आणि डोंबिवलीतील सामाजिक संस्था या सगळ्यांना बदल हवा आहे. पण तरीही प्रशासकीय यंत्रणांचे सहकार्य आणि त्यांची कारवाईची स्पष्ट भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनीही त्याची दखल घेत, नागरिकांनी या अहवालावर आॅनलाइन हरकती-सूचना नोंदवाव्यात असे आवाहन केले होते. पण त्यावेळी नागरिकांनी फारसा पुढाकार घेतला नव्हता. त्यामुळे महत्त्वाच्या विषयावर नागरिकही कमी पडत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. या समितीने महापालिकेने सर्व विषयांवर कारवाई करावी, बदल करावेत यासाठी अहवाल दिला होता.
परंतु त्यानुसार महापालिकेने अद्यापही विशेष बदल केलेले नाहीत. शहरात कुठेही सिग्नल यंत्रणा नाही, हा प्रश्न तातडीने मार्गी लावा असेही या अहवालात सूचित करण्यात आले होते. पण निविदा प्रक्रिया सुरू करण्याखेरीज दीड वर्षात कोणतीही अंमलबजावणी होऊ शकली नाही, ही शहरातील नागरिकांची शोकांतिका आहे.

रिक्षाचालक रांग सोडून सर्रास घुसखोरी करतात. अशा गाड्यांचे नंबर वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या वाहनचालकांवर काय कारवाई केली ते सांगावे? इंदिरा गांधी चौकात चार पोलीस एकत्र असतात. त्यापेक्षा त्यांनी विविध ठिकाणी विभागून राहवे, यासाठी पत्र दिले आहे. आता या मुजोरीबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.
- संजय मांजरेकर, अध्यक्ष, शिवसेनाप्रणित रिक्षा युनयिन

ही जबाबदारी ही निश्चितच आरटीओची आहे. येथे पूर्णवेळ अधिकारी का देत नाहीत? येथे जागा आहे, पण तरीही अभावानेच अधिकारी येतात. त्यामुळे काही उपद्रवी रिक्षा चालकांचे फावते. बेकायदा वाहतूक करणाºयांवर कारवाई व्हावी, यासाठी कितीतरी वेळा आम्ही पत्रव्यवहार केला आहे.
- शेखर जोशी, उपाध्यक्ष, रिक्षा चालक- मालक युनियन

Web Title: Three thousand illegal rickshaws run in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.