मे च्या दुसऱ्या आठवड्यात उल्हासनगरात सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:52 AM2018-04-24T01:52:16+5:302018-04-24T01:52:16+5:30

उल्हासनगरमधील पुढच्या टर्मचे महापौरपद शिवसेनेला हवे असून स्थायी समितीतही सभापतीपदासह वाटा हवा आहे.

In the second week of May, | मे च्या दुसऱ्या आठवड्यात उल्हासनगरात सत्तांतर

मे च्या दुसऱ्या आठवड्यात उल्हासनगरात सत्तांतर

Next

उल्हासनगर : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाच्या १३ मे रोजी होणाºया निवडणुकीत भाजपाने हक्क सोडला आणि शिवसेनेला ते पद दिले, तर लागलीच उल्हासनगरमध्ये सत्तांतर होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. उल्हासनगरमधील पुढच्या टर्मचे महापौरपद शिवसेनेला हवे असून स्थायी समितीतही सभापतीपदासह वाटा हवा आहे. त्यामुळे सध्याच्या स्थायी समितीतील काही सदस्यांचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच सत्तापालटानंतरच्या पदे वाटणीचा फॉर्म्युला ठरवण्याचे काम वेगात सुरू आहे.
उल्हासनगरचा विकास साधण्यासाठी भाजपा-शिवसेनेची नैसर्गिक युती हवी होती, असी खंत भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी व्यक्त करत साई पक्षाला सोबत घेण्यात चूक झाल्याचेच अप्रत्यक्षरित्या कबूल केले. ओमी कलानी यांचे महत्त्वाकांक्षी राजकारण पाहता त्यांनाही निवडणूक सोबत घेणे योग्य नसल्याची जाणीव भाजपा नेत्यांना झाली आहे.
सध्या ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यात उल्हासनगरच्या सत्तेबाबत वाटाघाटी सुरू असल्याचे बोलले जाते. कल्याण-डोंबिवलीत जेवढा त्याग भाजपा करेल, तेवढा त्याग उल्हासनगरमध्ये शिवसेनेला करावा लागणार आहे. भाजपाचे आमदारकीचे उमेदवार कुमार आयलानी यांना आपल्या पत्नीचे अडीच वर्षांचे महापौरपद पूर्ण व्हावे, असे वाटते; तर ओमी कलानी यांची टीम अजूनही जूनमध्ये आपल्याला महापौरपद मिळेल या आशेवर असल्याचे दिसते. येत्या पंधरवड्यात सारे चित्र स्पष्ट होईल आणि कल्याण-डोंबिवलीची महापौरपदाची निवडणूक पार पडल्यावर उल्हासनगरमध्ये सत्तांतर होईल, असे सध्याच्या घडामोडींवरून स्पष्ट झाले.

फुटीची शक्यता मावळली
भाजपाच्या ३३ सदस्यांपैकी साधारण १३ जणांचा ओमी कलानी यांची गट फुटून बाहेर पडेल, असे त्या गटातर्फे सांगितले जात होते. मात्र भाजपासोबत राहिल्यास सत्तेतील काही पदे मिळू शकतात, याचे भान आल्याने ते नगरसेवक भाजपाविरोधात असले तरी फुटून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे ओमी यांची पुरती कोंडी झाली आहे. भाजपातून फुटून बाहेर पडणाºया ओमी यांच्या गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करू, असे सांगणाºया शिवेसनेने आता पवित्रा बदलला असून ओमी टीमचे नगरसेवक भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्याने त्यांच्यासोबत युतीची शक्यता कमी असल्याची प्रतिक्रियाही शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी दिली.

शिवसेनेला बरोबरीने वाटा हवा : उल्हासनगरच्या सत्तेत सदस्यसंख्येनुसार वाटा मिळावा, अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. सध्याचे महापौरपद सलग भाजपाकडे राहिले, तर नंतरचे महापौरपद मिळावे; स्थायी समितीत सदस्यत्व, प्रसंगी सभापतीपद, अन्य समित्यांवर वर्णी अशा मागण्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे मांडल्या आहेत. नगरसेवकांच्या संख्येनुसार सत्तेचा वाटा लागेल, असे शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी स्पष्ट केले.

ओमी समर्थकही गटबदलू
भाजपाचे शहराध्यक्ष कुमार आयलानी यांनी निवडणुकीच्या अखेरपर्यंत ओमी टीमच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला होता. मात्र पक्षातील एका गटाच्या आग्रहामुळे तो गट महाआघाडीत समाविष्ट झाला. पण त्या टीमच्या सदस्यांना भाजपाच्या चिन्हावर रिंगणात उतरविल्याने सध्या भाजपा निश्चिंत आहे. आजवर ओमी कलानी समर्थक म्हणून मानला गेलेला भाजपा नेत्यांचा गटही या घडामोडींत आयलानी यांना जाऊन मिळाल्याने आयलानींचा एकमेव गट अस्तित्त्वात उरला आहे.

साई पक्ष ना घर का ना घाट का
भाजपा आणि ओमी टीमच्या राजकीय संघर्षात साई पक्षाचा बळी गेला आहे. गेली दहा वर्षे किंगमेकर म्हणून वावरणाºया या पक्षाचे महत्त्व अचानक संपुष्टात आले आहे. भाजपा-शिवसेना एकत्र येत असल्याने सध्या साई पक्षाकडे असलेले उपमहापौरपद, स्थायी समितीचे सभापतीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे. साई पक्षाने ती पदे सहजपणे न सोडल्यास स्थायी समितीतल काही सदस्यांना राजीनामे द्यायला लावून भाजपा-शिवसेना तेथील सत्ता समीकरणे बदलू शकते.

Web Title: In the second week of May,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.