पालघर लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवारांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:38 AM2018-03-23T00:38:02+5:302018-03-23T00:38:02+5:30

चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यावा, असा प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांना पडला आहे.

 In the search for party candidates in Palghar Lok Sabha Constituency | पालघर लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवारांच्या शोधात

पालघर लोकसभा मतदारसंघात पक्ष उमेदवारांच्या शोधात

Next

- नंदकुमार टेणी

ठाणे : चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर लोकसभा मतदारसंघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यावा, असा प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांना पडला आहे.
शिवसेनेने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तिच्यावर या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी येऊन पडली आहे. सध्या सेनेत अमित घोडा यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु त्यांचे तरुण वय आणि अनुभव नसणे या दोन बाबी त्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत. त्यांच्या आमदारकीला लोकसभा निवडणुकीच्या वेळी कशीबशी दोन वर्षे पूर्ण झालेली असतील. इतक्या कमी अनुभवाच्या जोरावर एकदम खासदारकीची उमेदवारी देणे योग्य ठरेल काय? याबाबत शिवसेनेत मंथन सुरू आहे. जर त्यांच्या पारड्यात एकनाथ शिंदे आणि रवींद्र फाटक यांनी आपले वजन टाकले तर ते जड होऊ शकते. भाजपामध्ये अनेकांना या मतदारसंघातील खासदाकीचे शिवधनुष्य विष्णू सवरांनी उचलावे असे वाटते आहे. मंत्री म्हणून त्यांना मिळत असलेली प्रसिद्धी त्यांचा लोकसंपर्क याचा पक्षाला फायदा होईल असा विचार जसा या मागे आहे त्याचप्रमाणे त्यांच्या निष्क्रिय आणि काहीशा वादग्रस्त अशा राजकीय कारकिर्दीलाही राज्यातून दिल्लीत स्थलांतरीत करण्याचे कारस्थानही आहे. त्यादृष्टीनेच या पक्षात सध्या शहकाटशहाचे राजकारण सुरू आहे. काँग्रेसमध्ये असाच प्रकार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावीत यांना काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांची होर्डिंग्ज सगळीकडे लागलेली असतांना ज्येष्ठ नेते दामू शिंगडा यांनी केलेल्या प्रखर विरोधामुळे त्यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द केली गेली होती. या अनुभवामुळे आता यापुढे खासदारकीचे राजकारण नको, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली आहे. तरी श्रेष्ठी या उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात घालण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्यामुळेच पालघर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत राहिला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी धाऊन जाणे, आंदोलने करणे, पक्षाची भूमिका मांडणे या बाबी ते धडाडीने करीत आहेत. पालघर जिल्ह्यातील काँग्रेस म्हणजे राजेंद्र गावितांमुळे टिकून राहिलेला एकखांबी तंबू असे चित्र साकार झाले आहे. तर दामू शिंगडा पुन्हा एकदा शड्डू ठोकण्याच्या पवित्र्यात आहेत. मी नाही तर माझा पुत्र यापैकी एकाला उमेदवारी द्या! हा त्यांचा हट्ट अजूनही कायम आहे. त्यामुळे आता सारे काही श्रेष्ठींच्या हाती असेल. गावितांच्या निष्ठेची आणि धडपडीची कदर करून त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालायची की, शिंगडा यांच्या बुलिंग टॅक्टीजपुढे झुकायचे? यापैकी जो निर्णय घेतला जाईल, त्यानुसार येथे काँग्रेसचा उमेदवार ठरेल. काँग्रेसने जर पारंपारिक विचार केला तर शिंगडांच्या पुत्राला उमेदवारी देणे व गावीतांना राज्याच्या राजकारणात ठेवणे असे दोन पक्षी ती एकाच दगडात मारू शकेल. परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत शिंगडा आणि त्यांच्या पुत्राने जी बंडखोरी केली ती यावेळी कदाचित त्यांना अडचणीची ठरू शकेल. राजकीय कूटनीतीपेक्षा जर पक्षनिष्ठा महत्वाची मानली गेली तर गावीतांचे पारडे जड ठरू शकते.
बहुजन विकास आघाडीमध्ये माजी खासदार बळीराम जाधव यांचेच नाव जास्त चर्चेत आहे. २००९ च्या निवडणुकीत ते थोड्या मतांनी विजयी झाले आणि २०१४ च्या निवडणुकीत प्रचंड मतांनी पराभूत झालेत तरी या दोनही वेळच्या विजय पराभवामुळे जनतेसमोर त्यांचे नाव आणि चेहरा सातत्याने राहिला आहे. पक्षाशी त्यांची असलेली निष्ठा या सगळ्याचा विचार केला तर त्यांच्याच नावाचा पुन्हा विचार होऊ शकतो. तर तरुणाईला संधी देऊन पहावी असाही एक विचार बविआमध्ये आहे. परंतु शेवटी श्रेष्ठी ठरवतील तीच पूर्वदिशा असणार आहे. डाव्या पक्षांचे थोडेसे बळ या मतदारसंघात आहे आणि ते आजमावून पाहण्यासाठी कोणा एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे. डावे पक्ष लोकसभा निवडणुकीत विजयासाठी इथे लढतच नाहीत. त्यांना फक्त त्यांचे सामर्थ्य आजमावून पाहायचे असते. या मर्यादित हेतूपुरती त्यांची लढत असते. परंतु ती दोन प्रबळ उमेदवारांच्या जयापराजयाला कारणीभूत ठरू शकते. म्हणूनच त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. गेल्या निवडणुकीतील ओझरेंच्या बंडखोरीमुळे ते ही नव्या चेहºयाच्या शोधात आहेत.

2009 च्या निवडणूकीत पालघर मतदारसंघात बविआचे उमेदवार बळीराम जाधव यांनी २२३२३४ म्हणजेच एकूण मतदानाच्या ३०.४७ टक्के मते मिळवून विजय मिळविला होता. तर भाजपाच्या वनगा यांना २१०८७५ म्हणजे २८.७८ टक्के मते मिळाली. काँग्रेसचे दामू शिंगडा यांनी १६०५७० म्हणजे २१.९२ टक्के मते मिळवून तर मार्क्सवादी लहानू कोम यांनी ९२२२४ म्हणजे १२.५९ टक्के मते मिळवून जाधव यांच्या विजयाला हातभार लावला होता. मतविभागणी झाल्यामुळे जाधव यांना १२३६० मतांनी विजय मिळवता आला होता. या मतदार संघात या निवडणूकीत ७३२५८७ म्हणजे ४८.१० टक्के मतदान झाले होते.

2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपच्या चिंतामण वनगा यांनी ५३,३२०१ म्हणजेच ५३.७२ टक्के मते मिळवून विजय मिळविला होता. गत निवडणूकीच्या तुलनेत त्यांच्या मतात २४.९४ टक्के वाढ झाली होती. तर बविआचे मावळते खासदार बळीराम जाधव यांना २९३६८१ म्हणजे २९.५९ टक्के मते मिळाली होती. मार्क्सवादी उमेदवार लडक्या खरपडे यांनी ७६.८९० मते मिळविली होती. विशेष म्हणजे या निवडणूकीत २१.७९७ मतदारांनी नोटाचा वापर केला होता. तर वनगा यांचे मताधिक्य २३९५२० एवढे म्हणजे २२.४५ टक्के इतके विक्रमी होते.

Web Title:  In the search for party candidates in Palghar Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.