कल्याण-डोंबिवलीत धो-धो कोसळला, सखल भागांत तुंबले पाणी, खड्ड्यांची नव्याने भर पडल्याने वाहतूक मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:37 AM2017-09-21T03:37:12+5:302017-09-21T03:37:13+5:30

कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये मंगळवारी दुपारपासून कोसळणा-या पावसाने बुधवारीही चांगलेच झोडपून काढले. मागील २४ तासांत १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

Kalyan-Dombivli washed and washed, the tumble water in low lying areas, the potholes were loaded again, the traffic collapse | कल्याण-डोंबिवलीत धो-धो कोसळला, सखल भागांत तुंबले पाणी, खड्ड्यांची नव्याने भर पडल्याने वाहतूक मंदावली

कल्याण-डोंबिवलीत धो-धो कोसळला, सखल भागांत तुंबले पाणी, खड्ड्यांची नव्याने भर पडल्याने वाहतूक मंदावली

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये मंगळवारी दुपारपासून कोसळणा-या पावसाने बुधवारीही चांगलेच झोडपून काढले. मागील २४ तासांत १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जोरदार सरींमुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले. आधीच खड्ड्यांनी मंदावलेल्या वाहतुकीचा पाणी तुंबल्याने अधिकच बोजवारा उडाला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे भरण्याची कामे केडीएमसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू झाली असली, तरी पावसाने त्या कामांवर पाणी फेरले. त्यामुळे खड्डे कायम आहेत.
हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार, मंगळवारपासूनच पावसाने जोर धरल्याने बहुतांश चाकरमान्यांनी कामावर न जाता घरीच राहणे पसंत केले. काही शाळाही बंद होत्या. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोड, महाराष्ट्रनगर, तर पूर्वेकडील रेल्वेस्थानक परिसर गोळवली, कचोरे, एमआयडीसी निवासी भागातील एम्स हॉस्पिटल, मिलापनगर परिसर तसेच कल्याणमधील शिवाजी चौक, रेल्वेस्थानक परिसर, महंमदअली चौक, अहिल्याबाई चौक, परिवहन डेपो, बैलबाजार, अशोकनगर, वालधुनी, स्वानंदनगर, खडेगोळवली, कोळसेवाडी, विठ्ठलवाडी रेल्वेस्थानक परिसर, सिद्धार्थनगर, पावशेनगर, कैलासनगर या सखल भागांमध्ये काही प्रमाणात पाणी साचले होते.
दरम्यान, भरतीच्या वेळेस कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढली होती. मात्र, या मुसळधार पावसामुळे कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन विभागातर्फे देण्यात आली. शहरात कुठेही झाडे पडली नसल्याचे सांगण्यात आले.
>उल्हास, बारवी नद्या दुथडी भरून
बिर्लागेट : मुसळधार पावसामुळे उल्हास आणि बारवी नद्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे कल्याण-मुरबाड मार्गावरील रायता येथील उल्हास नदीवरील पुलाच्या कमानीला, तर बारवी नदीवरील दहागाव, पोई आणि बदलापूर यांना जोडणाºया पुलाच्या कठड्याला पाणी लागले आहे. तसेच आपटी वाहोली, आपटी मांजर्ली, पोई, रायता, दहागाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. रायता-आपटी रस्त्यावरील अम्मू रिसॉर्टजवळील पूल नदीच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे आपटी चोण, आपटी बाºहे, कातकरीवाडी आदी गावांचा संपर्क तुटला आहे. मानिवली-रायता रस्त्यावरील आश्रमाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने हा रस्ता बंद झाला आहे. बांधकाम विभागाने दोनतीन दिवसांपूर्वी कल्याण-मुरबाड मार्गावरील म्हारळ, वरप, कांबा, पावशेपाडा येथील खड्डे बुजवले होते. मात्र, पावसामुळे हे रस्तेच वाहून गेल्याने त्याला नाल्याचे स्वरूप आले आहे. नाले व गटारेही भरून वाहत आहेत. प्रीती अ‍ॅकॅडमी शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याने शाळा बंद ठेण्यात आली. म्हारळ येथे पाणी भरल्याने सेंच्युरी शाळाही बंद होती. गावातील बोडखे चाळ, राधाकृष्णनगरी, अण्णासाहेब पाटीलनगर येथील घरांमध्ये पाणी भरले होते. परंतु, कुठेही अनुचित घटना घडली नाही, असे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
>कल्याण-नगर मार्ग बंद
म्हारळ : मुसळधार पाऊस व बारवी धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने रायते गावाजवळील पुलावरून पाणी वाहण्याची शक्यता गृहीत धरून कल्याण-मुरबाड-नगर राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे. बुधवारी दुपारी काही काळ वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, नंतर हा मार्गच बंद ठेवण्याचा निर्णय झाला. या मार्गावरील वाहतूक टिटवाळा-गोवेलीमार्गे मोहने-कल्याण अशी वळवली आहे.
>भक्तांची वाट खडतर : नवरात्रोत्सवाच्या धर्तीवर काही ठिकाणी खड्डे बुजवण्याची कामे सुरू करण्यात आली होती. परंतु, दोन दिवसांपासून कधी संततधार, तर कधी मुसळधार पडणाºया पावसामुळे शहरांतील खड्ड्यांमध्ये अधिकच भर पडली आहे. कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव थाटामाटात साजरा होतो. परंतु, किल्ल्यासमोरील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाºया भक्तांची वाटही खडतर आहे. एकीकडे खड्ड्यांची समस्या कायम असतानाच खड्ड्यांमध्ये पाणी भरल्याने रस्त्यांवरून जाणाºया वाहनांची कसरत होताना दिसत होती.
>टिटवाळ्याजवळील दोन पूल पाण्याखाली
टिटवाळा : कल्याण तालुक्यात मंगळवारपासून कोसळणाºया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रुंदे गावाजवळील काळू नदीवरील पूल आणि वालकस बेहेरे गावांलगत असणारा भातसा नदीवरील पूल पाण्याखाली गेला. परिणामी, तेथील गावांचा टिटवाळा शहराशी संपर्क तुटला आहे.दोन दिवसांपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. रुंदे गावालगत असणारा काळू नदीवरील पूल बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पाण्याखाली गेला. परिणामी तेथील रुंदे, आंबिवली, फळेगाव, उशीद, मढ, दानबाव, पळसोली, काकडपाडा, वेहले, भोंगळपाडा, आरेळा आदी १० ते १२ गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. विद्यार्थी, चाकरमानी आणि रुग्ण यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. यंदाच्या पावसात हा पूल आतापर्यंत सहा ते सात वेळा पाण्याखाली गेला आहे. गणेशोत्सवात झालेल्या पावसात पूल पाण्याखाली होता. त्यामुळे येथे नवीन उंच पूल बांधावा, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची त्वरित दखल घेऊन समस्येवर तोडगा काढावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील वालकस, बेहरे या गावांलगत भातसा नदीवर असलेल्या पुलाचीही अशीच अवस्था आहे. हा पूलही सकाळी ७ पासून पाण्याखाली आहे. यामुळे येथील गावांचाही शहराशी संपर्क तुटला आहे.
>आधारवाडी डम्पिंगचा रस्ता बंद
मंगळवारपासून पडणाºया पावसाचा फटका येथील आधारवाडी डम्पिंगला बसला. पावसामुळे कचरा वाहून आल्यामुळे येथील रस्ता बंद झाला. परिणामी,डम्पिंगच्या ग्राउंडवर आलेल्या कचºयाच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. याचा फटका या परिसरातील वाहतुकीलाही बसला होता. दरम्यान, महापौर राजेंद्र देवळेकर यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, घनश्याम नवांगुळ, उपअभियंता भालचंद्र नेमाडे, मिलिंद गायकवाड यांच्यासमवेत बुधवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.संबंधित रस्त्याचे काम सुरू करा आणि तात्पुरत्या स्वरूपात डम्पिंग ग्राउंडशेजारी असलेल्या ट्रक टर्मिनलच्या जागेतून गाड्या नेऊन त्याच्यामागे डम्पिंग ग्राउंडवर कचरागाड्या रिकाम्या कराव्यात, अशा सूचना महापौरांनी दिल्या. हे काम तातडीने सुरू करावे व कचरागाड्यांची कोंडी सोडवावी, असेही आदेश त्यांनी दिले.

Web Title: Kalyan-Dombivli washed and washed, the tumble water in low lying areas, the potholes were loaded again, the traffic collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.