गझलगळ्यातील नवी रत्नमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:00 AM2018-04-22T06:00:36+5:302018-04-22T06:00:36+5:30

कवितेतल्या गझल संप्रदायाने बाजी मारल्याचे असे सुखद क्षण उपभोगताना आनंद होतो आणि अशा वेदनेचा वेद करणारी कवयित्री आपल्यापाशी आहे, याचाच मोठा आनंद आहे .

Gazhalgala's new Ratnamtala | गझलगळ्यातील नवी रत्नमाला

गझलगळ्यातील नवी रत्नमाला

Next

अरुण म्हात्रे
 

जीव द्यायचे कुणामध्येही धाडस नसते, हा शेर म्हणजे वर्षानुवर्षे जगभर चाललेल्या अटळ लेखन अपरिहार्यतेमागचे बोचरे सत्य. जे उच्चारायचे धाडस आरती प्रभू, एखादे मर्ढेकर, एखादे तुकोबा, एखादा गालिब, एखादा गुरुनाथ धुरी करू शकतो, तेच करतेय गझलेच्या प्रांतात नुकताच प्रवेश केलेली एक नवी गझलकारा... प्रचलित वाट न चोखाळणारी...


सुसाध्याच माणसाचा एल्गार येत आहे...
हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही!

रेश भटांच्या गझल अभियानात त्यांच्या मनातील साधी माणसे असावीत. ती सर्वसामान्य पण वृत्तीने परखड, काहीशी अबोल, थोडेसेच पण नेमके बोलणारी, शांत पण जिद्दी आणि चेहऱ्यावर कसलाही मुत्सद्दी भाव नसलेली, पण आतून तयार ... लढायला सज्ज... हे वर्णन त्यांच्यानंतर हा गझल संप्रदाय आपला मानणाºया कैक नव्या दमाच्या गझलकारांचे होते... आता कुठे बोलायला केली खरी सुरुवात मी! अशा नव्या अस्फूट हुंकारांचे शब्दवैभव मराठी गझलेच्या झोळीत पडेल, याची सुरेश भटांना खात्री होती, हा त्यांच्या दूरदृष्टीचा करिश्माच म्हणायला हवा.
एरव्ही, ठाण्याच्या विटाव्यासारख्या भागात जिथे मराठी साहित्य अभावानेच पोहोचते, अशा भागातील कवयित्री, जिच्या आयुष्यात शाळेतल्या एक स्मिता मोरे मॅडम या मराठीच्या बाई सोडल्या, तर कवितेची ही अनवट वाट दाखवणारे कोणी नाही, अशा कवयित्रीच्या अगदी सुरुवातीच्याच गझलेत जगण्याचा चिवट जिद्दी स्वर इतक्या नेमकेपणाने येतो, हे आश्चर्य, आश्चर्य राहत नाही...
हसता हसता माझे सगळे दु:ख विसरते
तुटल्यानंतर स्वत:लाच मी फुल समजते
सांग कशी मी तुला हवी ती सोबत होऊ?
कधी कधी तर माझ्यासोबत मीही नसते
कुठेच नाही तसा राबता दोघांमध्ये
तरी मला मी तुझ्या उल्याचा सानी म्हणते
लिहू लागलो आपण कविता गझल वगैरे
जीव द्यायला कुणामधेही धाडस नव्हते
नवीन दिसतो एक चेहरा आरशामधे
तुझ्यात ‘ रत्ना’ परके हल्ली कोण राहते?
डोंबिवलीच्या एका गझल संमेलनात या कवयित्रीला मी ऐकले आणि जीवनाचा प्रगल्भ अहसास असलेले तिचे शेर ऐकून मी सटपटून गेलो.
जीव द्यायचे कुणामधेही धाडस नसते, हा शेर म्हणजे वर्षानुवर्षे जगभर चाललेल्या अटळ लेखन अपरिहार्यतेमागचे बोचरे सत्य जे उच्चारायचे धाडस एखादा आरती प्रभू, एखादे मर्ढेकर, एखादे तुकोबा, एखादा गालिब, एखादा गुरुनाथ धुरी करू शकतो, ते करतेय गझलेच्या प्रांतात नुकताच प्रवेश केलेली एक नवी गझलकारा... रत्नमाला शिंदे!
रत्नमाला शिंदे ही अलीकडे तिच्या अशा आरपार शेरांमुळे अनेक गझलकारांच्या चर्चेचा विषय झाली आहे, पण तरी ती नवीन आहे. ना तिचे पुस्तक आलेय, ना तिला गझलचा घरापासूनचा वारसा आहे...फक्त एकच वर्ष झालंय तिला गझल लिहायला सुरुवात करून. कविता लिहितालिहिता तिला गझलचे गमक गवसले आणि तिला कळले की, तिच्या मनातील आणि जगण्यातील पेच पकडण्यासाठी गझलेची दोन ओळींची पकड योग्य आहे आणि ती भराभर लिहीत गेली...
इथे माझे कुणी नाही, असो चल चांगले आहे
स्वत:ला का कधी कोणी स्वत:चे मानले आहे?
कुणाला काय मी देऊ पुरावे नष्ट झाल्याचे
पुराव्यांसह कितीदा मी स्वत:ला जाळले आहे !
मला तर येतही नाही इथे आवाज कोणाचा
मला कोणी अशा दुर्गम ठिकाणी आणले आहे
बरे झाले तुला कळली जराशी पात्रता माझी
कुठे इतके तरी मीही स्वत:ला जाणले आहे
गरज नाही कुणालाही कुणी समजून घेण्याची
इथे समजून झाल्यावर कुणी पस्तावले आहे?
रत्नमालाचे स्वत:चे एक खाजगी विश्व आहे. ज्यात चाललेल्या अनेक घडामोडींचा अंदाज आपण करू शकतो. मात्र, तिने आपल्या दिशेने केलेल्या निर्देशांकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही... असे जिव्हारी तेजाबाचे थेंब रत्नमालेच्या शेरांतून आपल्या चरित्रावर पडतच राहतात...!
रत्नमाला शांत असते. सगळ्या गझलगोतावळ्यात असली तरी मोजके बोलते, तिला गझल मिरवायची नसते, तर तिच्या गझलेने ती तिचे अस्तित्व शांतपणे शाकारत असते...
कुणावरही कधी मी रागवत नाही
मला इतकी मिजासी परवडत नाही
मला हरवून जावे वाटते आहे
तशी जागा कुठेही सापडत नाही
तुझ्यामाझ्या चुका झाल्या किती मोठ्या
तरी आपण कसे मोठे बनत नाही!
या अशा शेरांमुळे रत्नमाला नव्या गझलकार लोकांत उठून दिसते. कारण, हरवून जाण्याचा ध्यास घेतलेले आणि तशी जागा न सापडलेले कवितेत काय, गझलमध्ये काय किंवा प्रत्यक्ष आयुष्यात काय फार दुर्मीळ असतात. रत्नमाला अशा दुर्मीळ गझला घेऊनच मराठी गझलप्रांतात आली आहे.
तिला गझल समजावून सांगणारे तिचे कैक सहृद आहेत, गुरूही आहेत. पण, आपल्या मनातील अडून राहिलेल्या शल्यांना उच्चार शिकवणारा कोणी गुरू नाही. ते काम आपले आपल्यालाच करावे लागेल, हे रत्नमालाने ओळखले आहे.
एवढ्या जवळून माझ्या जात नाही मी
माहिती आहे मला माझ्यात नाही मी
शक्यता नाहीच माझ्या राख होण्याची
भास होतो पण तरी स्वप्नात नाही मी
वाटले असते मला हरवून मी जावे
एवढ्या मोठ्या अशा शहरात नाही मी
पातळी कळणारही नाही तुला माझी
फार तर पाहून घे पाण्यात नाही मी
आता असं सज्जड लिहिणाºया रत्नमालेच्या अंतर्मनातील खळबळीचा गुरू कोण होणार? रत्नमालेची गझलची वाट ही प्रचलित वाट नाही इतकेच आपण समजू शकतो! का कुणास ठाऊक पण रत्नमालाचे शेर वाचताना सारखे दादा (कविवर्य सुरेश भट) आठवतात ! जणू त्यांची मानसकन्याच हे त्यांच्या सुप्त जाणिवेचे निखारे आज पेलते आहे...
काय खोटे अन्् खरे ते ठरवले आहेस तू
वाटते आहे तुला जे मानले आहेस तू
जे मला बोलायचे मी बोलले आहे कुठे
जे तुला ऐकायचे ते ऐकले आहेस तू
हृदय, मेंदू आणि मनही खात आहे बघ किती
कोणते भलते जनावर पाळले आहेस तू
गझल ही अनेकांना उसाच्या चरकासारखी रदीब काफियांच्या चरकातून शेरांचे सरबत देणारी शब्दसारणी वाटते. मग वाट आहे, दाट आहे, लाट आहे , असं जुळवताजुळवता चाट आहे, भाट आहे, राठ आहे इथपर्यंत जुळवणीची शेर-माळ गुंफायची कसरत आहे, असे वाटते. मग, तिथे आतला जिव्हारी अस्वस्थ हुंकार वा डागासारखे आयुष्याला चिकटलेले चरित्रातील विषण्ण करणाºया घटनांचे घाव उजळून येत नाहीत, तर कामचलाऊ काफियांनी गझलपूर्ततेची इतिकर्तव्यता करण्याकडे गझलकारांचा कल जातो.
रत्नमालाला असे कामचलाऊ गझलकार बनायचे नाही. तिला गझलमध्ये आपले नाव व्हावे, अशीही महत्त्वाकांक्षा नाही. तिच्या भागात लहान गरीब मुलांसाठी शाळा वा क्लासेस काढून काहीतरी सामाजिक काम करावे, असा तिचा स्वत:चा खाजगी अजेंडा आहे आणि त्यात अधूनमधून गझलेतून सहजपणे आपल्या स्वाभाविक स्पंदनलयीत व्यक्त व्हावे, अशी तिची सरळसाधी धारणा आहे. रत्नमालेच्या लेखनप्रवासात सुरुवातीलाच हे वळण आले आहे, ही केवढी मोठी गोष्ट आहे. जगण्याने तिला आताच इतके शहाणे केले आहे की, ती सहज सारे लिहिते. मन मोकळे करते आणि अशा मोकळ्या झालेल्या मनदालनात स्वत:च्या शेरांसोबत हसत सहज झोपी जाते... ना गझलेचा उच्चरवात ती गजर करते, ना स्वत:शी पुटपुटत त्याचा आलाप करते...
उगाचच शांत बसण्याचा मला आलाय कंटाळा
स्वत:शी वाद करण्याचा मला आलाय कंटाळा
मला रमवायला सुद्धा कधी माझ्यात मी नसते
अशा माझ्यात नसण्याचा मला आलाय कंटाळा
स्वत:साठी स्वत:मध्ये कधी परतून ये रत्ना
तुझ्यावाचून जगण्याचा मला आलाय कंटाळा...
मला खात्री आहे की, केवळ रत्नमालेच्या या सुरुवातीच्या दिवसांत तिच्याविषयी बोलणे शक्य होते आहे, या वेगाने ती लिहीत राहिली तर तिच्या गझलेची चिकित्सा करणेही काहीसे दुरापास्त होत जाणार आहे.
गझल लिहायला घेतल्यापासून काही महिन्यांतच रत्नमालाच्या गझलेला अशी ठाम लय मिळाली आहे, पुढे काय असेल, आपण कल्पनाही करू शकत नाही.
रत्नमालेच्या विचक्षण शेरांची नुसती झलक पाहिली तरी आपल्याला हबकून जायला होते...
आता असे काही शेर पाहा...
नेहमी कव्हरेज क्षेत्राच्या कसे बाहेर असते
घेतले आहे सुखाने फालतू सीमकार्ड बहुधा
एवढ्यासाठीच जन्मा जा तुला मी माफ केले
घातल्या माझ्यामुळे तू व्यर्थ इतक्या येरझारा
एवढ्यासाठीच होता जन्म माझा का
मी जगाच्या आवडीचे खेळणे व्हावे
दाद देण्याची तुझी स्टाइल आवडली
समजला माझा मला दर्जा लिखाणाचा
लांब रस्ता उदास मन माझे
थांबलेला प्रवास मन माझे

मला तर वाटते आहे जळावे श्वास हे लवकर
तुझ्यावाचून जगल्याचे पुरावे काय कामाचे
एवढ्या जवळून कोणाच्या कुणी जाऊ नये
की असे डोक्यात कोणी जन्मभर राहू नये
चल आपण दोघे कुठलेसे रस्ते होऊ
भेट कदाचित होईल एखाद्या वळणावर
तुला दाखवू का कशी शिस्त असते
नको येत जाऊस लाडात दु:खा
रत्नमालाने तिच्या या सुरुवातीच्या गझलांनी बुजुर्गांपुढे असे प्रश्न उभे केले आहेत की, त्यांनीही त्यांच्यापाशीचे जुने गझलतारांगण नव्याने उत्खनून पाहावे. अशी गझल जी कधी शांताबाई शेळके यांच्या ‘विलया जग हे जाईल सारे’ची आठवण देते वा कधी परवीन शाकिरजींच्या अगतिक स्त्रीत्वाची बोचरी आठवण देते. अशी रत्नमालाची मोठी रेंज आपल्याला जाणवते.
कारण, एके ठिकाणी रत्नमाला म्हणते-
प्रवाहाच्या दिशेने वाहणे आहेच सर्वांना
नव्या माझ्या प्रवाहाची दिशा ठरवून घेऊ का
मला कळले उशिराने प्रवासातच मजा होती
स्वत:ला त्याच जागी मी पुन्हा सोडून येऊ का
कवितेतल्या गझल संप्रदायाने बाजी मारल्याचे असे सुखद क्षण उपभोगताना आनंद होतो आणि अशा वेदनेचा वेद करणारी कवयित्री आपल्यापाशी आहे, याचाच मोठा आनंद आहे .

Web Title: Gazhalgala's new Ratnamtala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.