पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे भिवंडीत रहिवाशांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:36 AM2019-05-17T00:36:44+5:302019-05-17T00:36:56+5:30

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Due to irregularities in water supply, the affluent residents | पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे भिवंडीत रहिवाशांची वणवण

पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे भिवंडीत रहिवाशांची वणवण

Next

भिवंडी : महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात काही ठिकाणी चोवीस तास, तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा केला जात आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पालिका स्टेमकडून ७३ एमएलडी, मुंबई महानगरपालिकेकडून ४० एमएलडी पाणी विकत घेते, तर २ एमएलडी पाणी पुरवठा वºहाळा तलावातून केला जात आहे. अशा प्रकारे शहरासाठी ११५ एमएलडी पाणी पुरवठा होत असून, त्याचे नियोजन नसल्याने शहरातील पाणी वितरणात असमानता दिसून येते. सर्वांना नियमीत व वेळेत पाणी मिळावे यासाठी १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ ६ टाक्या सुरू करण्यात आल्या असून, एक टाकी येत्या महिन्यात सुरू होणार आहे.
महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया स्टेम व मुंबई महानगरपलिकेने प्रत्येक आठवड्यास २० टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी चोवीस तास पाणी बंद असते. त्यानंतर आलेले पाणी जलवाहिनीत भरण्यासाठी १० तास लागतात. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जलवाहिनीचे शेवटचे टोक असलेल्या भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. अशा वेळी मागणीप्रमाणे अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळात पाणी पुरवठा कमी दाबाने, अथवा पाणी न आल्याने अंबीकानगर, ब्राम्हणआळी, अशोकनगर, अंजूरफाटारोड, निजामपूर, देवजीनगर, भंडारी कंपाऊंड, टावरे कंपाऊंड, विठ्ठलनगर भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यापैकी ३ ठिकाणी दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मनपाच्या पाणी पुरवठ्याच्या वेळा काही भागात ठरवून दिल्या आहेत. काही ठिकाणी चोवीस तास पाणी पुरविले जात आहे. शहरातील अनेक लोकवस्तींमध्ये रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, सर्वांना सकाळी ६ ते रात्री १० वाजताच्या दरम्यान पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.

शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी १४ टाक्या बांधलेल्या असून, त्यापैकी केवळ ६ टाक्या सुरू करण्यात यश आले आहे. स्टेम आणि मुंबई मनपाकडून मुबलक पाणी मिळत आहे. हे पाणी सर्व टाक्यांतून रहिवाशांना देण्याची व्यवस्था झाल्यास, शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने होणारी पाणी टंचाई दूर होणार आहे.
- संदिप पटनावर,
उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, भिवंडी महानगरपालिका

Web Title: Due to irregularities in water supply, the affluent residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी