फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचा श्वास कोंडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 10:45 AM2018-11-14T10:45:19+5:302018-11-14T11:01:44+5:30

वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण दिवसें दिवस वाढत असतानाच मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदुषणात आणखीनच भर पडली आहे.

Due to the crackers of the crackers, the children's breathing stops | फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचा श्वास कोंडला

फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचा श्वास कोंडला

ठळक मुद्देप्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या विकारांना तोंड द्यावे लागत असून यंदा रुग्णांमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  फटाक्‍यांमधून निर्माण झालेला धूर वातावरणात तसाच राहत असल्याने नागरिकांना श्‍वसन संस्थेशी संबंधित आजारांना तोंड द्यावे लागते. नाक गळणे, नाक चोंदणे ही फटाक्यांच्या प्रदूषणातून निर्माण होणारी लक्षणे आहेत.

मीरारोड - वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण दिवसें दिवस वाढत असतानाच मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदुषणात आणखीनच भर पडली आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचे परिणाम जास्त करून भोगावे लागत आहेत. या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या विकारांना तोंड द्यावे लागत असून यंदा रुग्णांमध्ये 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.  

शहरात दररोज किमान लाखो लिटर पेट्रोल व डिझेलचा धूर निघत असून  या धुरामुळे होणारे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर होत आहे. आता दिवाळीत मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदुषणात आणखीनच भर पडली असून याचे परिणाम लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना भोगावे लागत आहेत. वाऱ्यामुळे फटाक्‍यांमधून निर्माण झालेला धूर वातावरणात तसाच राहत असल्याने नागरिकांना श्‍वसन संस्थेशी संबंधित आजारांना तोंड द्यावे लागत आहे. 

नाक, कान, घसा तज्ञ डॉ. निपा वेलीमुट्टम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मागील काही वर्षांत फटाके वाजवण्याचे प्रमाण घटले आहे. यामुळे ध्वनी प्रदूषण कमी झाले असले तरी वायू प्रदूषणात मात्र घट झालेली दिसत नाही. आवाजाचे फटाके कमी झाले असले तरी रोषणाई, प्रकाशाच्या फटाक्‍यांचे प्रमाण वाढले आहे. विविध रंगी प्रकाश पसरवणारे हे फटाके मात्र मोठ्या प्रमाणात धूर सोडतात. हा धूर दीर्घकाळ हवेमध्ये राहत असल्याने त्याचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होत असून यावर्षी लहान मुलांच्या  श्वसन विकारात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे'

दिवाळीत फटाक्यांमधून निघणारे सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजनडाय ऑक्साईड हे अनैसर्गिक विषारी वायू हवेत मिसळतात. ही हवा नाकाद्वारे शरिरात घेतल्यास कपाळ, गालांखालचा भाग, डोळे, डोके दुखू लागणे, डोके जड होणे, खाली वाकल्यास डोके दुखणे श्वसननलिकेला सूज येणे, नाक चोंदणे, लाल चट्टे येणे, कफ जमा होणे ही लक्षणे दिसून येतात. अनेक नागरिकांना  सतत खोकल्याची उबळ येत असल्याने रात्रीची चांगली झोप मिळत नाही. नाक गळणे, नाक चोंदणे ही फटाक्यांच्या प्रदूषणातून निर्माण होणारी लक्षणे असल्याचंही  वेलीमुट्टम यांनी सांगितलं. 

दुचाकी व चारचाकी वाहन बाळगणे ही नागरिकांमध्ये प्रतिष्ठेची बाब मानली जात असल्यानेही वाहनांची संख्या वाढत आहे. दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, अक्षयतृतीया असे शुभमुहूर्त साधून शहरात वाहन खरेदीत भर पडत आहे. गेल्या दोन वर्षात मीरा भाईंदर सह ठाणे व पालघर जिल्ह्यात  दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाढलेल्या संख्येमुळे वातावरणात  प्रदूषण वाढत आहे. वाढत्या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून वाढत्या धुरामुळे श्‍वसनविकारांमध्ये वाढ झाली असून आता फटाक्यांच्या धुराची भर पडली आहे. वाढत्या वायू प्रदूषणा बद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

Web Title: Due to the crackers of the crackers, the children's breathing stops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.