मेट्रोसाठी धामणकर पूल तुटणार, वाहतूककोंडी वाढण्याचीच भीती अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:33 AM2018-01-22T02:33:01+5:302018-01-22T02:33:20+5:30

भिवंडीतून धावणारी मेट्रो ही रस्त्यामधून जाणार आहे. केवळ स्थानकादरम्यान तिला वळण देण्यात येणार आहे. ही मेट्रो अंजूरफाटा रेल्वेपुलावरून जाणार आहे.

 Dramakan bridge will be broken for the Metro, more fears of traffic congestion | मेट्रोसाठी धामणकर पूल तुटणार, वाहतूककोंडी वाढण्याचीच भीती अधिक

मेट्रोसाठी धामणकर पूल तुटणार, वाहतूककोंडी वाढण्याचीच भीती अधिक

googlenewsNext

भिवंडीतून धावणारी मेट्रो ही रस्त्यामधून जाणार आहे. केवळ स्थानकादरम्यान तिला वळण देण्यात येणार आहे. ही मेट्रो अंजूरफाटा रेल्वेपुलावरून जाणार आहे. तर या मार्गावर अडथळा ठरणारा भाऊसाहेब धामणकर उड्डाणपूल जमीनदोस्त करण्यात येणार आहे. मेट्रोच्यानिमित्ताने धामणकर नाक्याचे विस्तारीकरण होणार असून तेथे पादचा-यांसाठी व छोट्या वाहनांसाठी भुयारी मार्ग करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच धामणकरनाका रेल्वे स्थानकावरही वाणिज्य हब उभे रहाणार आहे. पुढे ही मेट्रो रामेश्वरमंदिर समोरून खोका कंपाउंड येथून वळणार असून ती राजीव गांधी पुलावरून थेट टेमघर येथे जाणार आहे. या दरम्यान सुरू असलेल्या नवीन उड्डाणपुलावरून मेट्रोचा मार्ग जाणार असून त्यासाठी सर्व ठिकाणांप्रमाणे या मार्गावरही ३० मीटर रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्यावर दोन्ही बाजूने खांब उभे करून त्यावरून मेट्रो नेण्याचे प्रस्तावित आहे. पुढे साईबाबा मंदिरापासून ते दुर्गाडीपर्यंतही मध्यावरून धावणार आहे. कशेळीपासून ते दुर्गाडीपर्यंत ३० मीटरचा मार्ग प्रस्तावित असून या मार्गावर सर्व्हीस रोड होणार आहे.तसेच या मार्गावर परिवहनच्या बसही धावणार आहेत.
कशेळीमार्गे येणारी मेट्रो अंजूरफाट्यावरील दिवा-वसई रेल्वे पुलावरून जाणार आहे. अंजूरफाटा येथे नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या आग्रहास्तव ओसवाल वाडी ते होली मेरी स्कूलपर्यंत उड्डाणपुल बांधण्याची घोषणा खासदार कपिल पाटील यांनी केली. येथील उड्डाणपूल मेट्रोला नक्कीच अडथळा ठरणार आहे. सध्या दिवा-वसई रेल्वेपुलाखालील रस्ता वाढत्या रहदारीमुळे आता अरूंद वाटू लागला आहे. एमएमआरडीएने मेट्रो मार्गावरील रस्ते ३० मीटरचा करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार सध्या असलेल्या रेल्वे पुलाखालील रस्ताही ३० मीटरचा झाल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यातच मेट्रोचे स्थानकही अंजूरफाटा येथे होणार आहे. त्यामुळे धामणकरनाकाप्रमाणे अंजूरफाट्याचे विस्तारीकरण आधीच करणे अपेक्षित आहे. अंजूरफाट्याच्या पुढे गोदामाचापट्टा सुरू होतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला गोदामांमध्ये जाण्यासाठी वाहनांची वर्दळ सुरू असते. येथे नेहमी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे अंजूरफाटा ते कशेळी या दरम्यान सर्व्हिसरोड झाल्यास होणारी कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.
अंजूरफाटा ते कशेळी या परिसरातील गोदामपट्टा मुंबई-नाशिक महामार्गापर्यंत विस्तारला आहे. अहमदाबादहून मुंबईला जाण्यासाठी अंजूरफाटा मार्गे जाणारे वसई-माणकोली या मार्गाने जातात. तर कशेळीहून शहरात येणारा जुना आग्रारोडवरही वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. अशा दोन्ही बाजूने होणाºया वाहतुकीचा ओघ अरूंद अंजूरफाटा रेल्वे पुलाखाली कोंडला आहे. त्यासाठी रेल्वेपूलही ३० मीटर रूंद होणे गरजेचे आहे. तसेच पुढे कशेळीपर्यंत ३० मीटर रस्ता झाल्यास गोदामात जाणा-या अवजड वाहनांचा वाहतुकीवर परिणाम करणार नाहीत. त्यामुळे मेट्रोपूर्वीच वाहतुकीचा नेमका विचार गरजेचा आहे. तो न केल्यास मेट्रो येऊनही शहरातील वाहतूक कोंडी फुटणार नाही; उलट ती अधिक कोंडीची होत जाईल.
राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे शहरातील रस्त्यांचे रूंदीकरण झाले नाही. रूंदीकरणास पालिका प्रशासनाने सुरूवात केली की विरोध करायला सुरूवात होते. व्होटबँक सांभाळण्यासाठी अनेकवेळा नेतेमंडळींनी शहराचा गळा घोटला आहे. परंतु भिवंडीतील नव्या पिढीला आता मेट्रोमधून प्रवास करायचा आहे. जर तुम्ही भिवंडीकरांना स्वप्न दाखवले आहे तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचे श्रेय जरी वेगवेगळे नेते घेत असले तरी प्रकल्पाची आखणी ही काँग्रेसच्या काळात झाली आहे. या बाबतचा ठराव २००३ मध्ये महापालिकेत आला होता. तेव्हापासून ते आजतागायत शहरात मेट्रो हवी की नको यावर नेत्यांचा खल सुरू आहे. परंतु या वादातून ठोस मार्ग काढला जात नाही. १५ वर्षात या मेट्रो मार्गावर नवी बांधकामे झाली. वास्तविक पालिकेकडे मेट्रोच्यामार्गाची कागदपत्रे असतानाही या मार्गावर नवीन इमारतींना परवानगी कशी दिली, हा संशोधनाचा विषय आहे.
दर २० वर्षांनी विकास आराखडा करताना पालिका प्रशासनाने बदलत्या शहराप्रमाणे आपल्या गरजांचा विचार केला नाही. त्यामुळे शहर वाढले, पण फारसे बदलले नाही. गटार, पदपथ व रस्ते यामध्ये गुंतून पालिकेची तिजोरी रिकामे करणारे प्रशासन व नगरसेवकांनी ठोस सुधारणा केलेल्या नाहीत. भिवंडीचा एमएमआरडीए क्षेत्रात समावेश केल्यावर सुविधांवर भर देण्यात आला. त्यातून मेट्रो प्रकल्प आकाराला आला.
गोपाळनगर व धामणकरनाका हमखास प्रवासी मिळतील अशी ठिकाणे मानली जातात. या ठिकाणाजवळ मेट्रो आणण्याची नागरिकांची प्रमुख मागणी आहे. त्यामुळे पूर्व विधानसभा, पश्चिम विधानसभेबरोबर ग्रामीण विधानसभा क्षेत्रालाही मेट्रोचा लाभ मिळेल. त्यासाठी गोपाळनगरपर्यंत मेट्रो असावी,अशी नागरिकांची मागणी आहे. मेट्रोचा मार्ग ठरवताना या सर्वांचा विचार झाला आहे. मात्र स्थानिक राजकारणांमुळे शहरातील मेट्रोला कल्याणरोड वरून जाण्यास विरोध झाला. त्यामुळे वेगवेगळे मार्ग सुचवून गोंधळ वाढवण्याचा, गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुनर्वसन, त्याचे धोरण ठरणे अत्यंत गरजेचे
वास्तविक शहरात २० वर्षापासून रस्तारूंदीकरणाचे प्रभावी काम झाले नाही. शहरात ५२ सिमेंटचे रस्ते होणार आहेत. त्यासाठीही रस्ता रूंदीकरणाची आवश्यकता आहे. हा विकास काळानुरूप होणे गरजेचे असताना महापालिका प्रशासनाने शहरातील बांधकामे तोडण्यापूर्वी रहिवाशांचे व व्यापाºयांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पर्यायी जागांचा विचार केला पाहिजे. मात्र प्रशासन आपली भूमिका जाहीर करत नसल्याने नागरिकांमध्ये गैरसमज पसरले जात आहेत.
विकासासाठी हवी इच्छाशक्तीची जोड
महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार रस्तारूंदीकरण करण्यापूर्वी पालिकेच्या आरक्षित जागेवरही पर्यायी जागा देता येणे प्रशासनास शक्य आहे. त्यासाठी नगरसवेक, अधिकाºयांनी स्वत:पेक्षा नागरिकांचा विचार केला तर या विकासाला गती मिळू शकेल.
भिवंडीत मेट्रो आणण्याचा ठराव २००३ मध्ये काँग्रेसच्या राजवटीत महापालिकेत आला होता. तब्बल पंधरा वर्षानंतर या प्रकल्पास भाजपा सरकारने प्रत्यक्षात आणण्याच्या हलचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसच्या काळात शहराच्या विकासाच्यादृष्टीने आखलेला कल्याणरोड मार्ग कायम ठेवला पाहिजे. कामतघरमार्गे जाणारा अंजूरफाटा ते साईबाबा हा मार्ग पूर्णपणे चुकीचा आहे. कल्याणरोड मार्गावर वन खात्याच्या व वज्रेश्वरी संस्थानच्या जागेवर लोकवस्ती झालेली आहे. त्यामार्गावर रस्तारूंदीकरण करताना बेघर व व्यापाºयांची पर्यायी व्यवस्था पालिका प्रशासनाने व एमएमआरडीएने करणे अपेक्षित आहे. ही रेल्वे कल्याणरोड मार्गे नेल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल.
- सुरेश टावरे, माजी खासदार
मेट्रो नेताना रस्तारूंदीकरणात जाणा-या मालमत्ताधारकांना नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. कल्याणरोड मार्गे जाणाºया मेट्रोला आमचा विरोध नाही. परंतु ही मेट्रो वंजारपाटीनाका -वडपामार्गे सोनाळे येथून कल्याणला गेल्यास शहराच्या आजूबाजूच्या नागरिकांनाही त्याचा लाभ होईल. असे दोन्ही ठराव आम्ही सरकारला देणार आहोत. सध्याचा कल्याण रोडच्या डीपी रोडचा ठराव देखील प्रलंबित आहे. प्रशासनाने फेरीवाला क्षेत्र बनवले नसल्याने कल्याण रोडवरील फेरीवालेही अडचणीत आले आहेत. एमएमआरडीएने नागरिकांच्या होणाºया नुकसानाबाबत खुलासा केल्यास हा मार्ग मेट्रोसाठी मोकळा होईल.
- जावेद दळवी, महापौर.

Web Title:  Dramakan bridge will be broken for the Metro, more fears of traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.