भाजपाने बहुमताच्या जोरावर सर्व प्रभाग समित्या राखल्या हाती; सेना, काँग्रेसचा विरोध अल्पमतात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 05:30 PM2017-10-18T17:30:45+5:302017-10-18T17:31:09+5:30

गेल्या आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत चार पॅनल पद्धतीने एकूण 24 प्रभाग अस्तित्वात आले आहेत.

BJP has kept all the ward committees on the strength of majority; The army, the opposition opposes the Congress | भाजपाने बहुमताच्या जोरावर सर्व प्रभाग समित्या राखल्या हाती; सेना, काँग्रेसचा विरोध अल्पमतात

भाजपाने बहुमताच्या जोरावर सर्व प्रभाग समित्या राखल्या हाती; सेना, काँग्रेसचा विरोध अल्पमतात

Next

राजू काळे 
भार्इंदर - गेल्या आॅगस्टमध्ये पार पडलेल्या मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीत चार पॅनल पद्धतीने एकूण 24 प्रभाग अस्तित्वात आले आहेत. यामुळे अस्तित्वातील प्रभाग समित्यांची भौगोलिक रचना बदलण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून सोमवारी पार पडलेल्या महासभेत चर्चेसाठी आणण्यात आला होता. त्यात सत्ताधारी भाजपाने बहुमताच्या जोरावर बदल करून सर्व प्रभाग समित्या आपल्याच हाती राखण्यात यश मिळविले. यातील प्रभाग समिती ३ व ५ पासून अनुक्रमे सेना व काँग्रेसला दूर ठेवल्याने भाजपाच्या बहुमतापुढे तीव्र विरोध करणारी सेना व काँग्रेस मात्र अल्पमतात राहिली.

आॅगस्टमध्ये पार पडलेल्या पालिका निवडणुकीत चार उमेदवारांच्या पॅनलप्रमाणे पूर्वीच्या ४५ पैकी एकूण ९५ जागांचे २४ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. प्रभाग २४ मध्ये मात्र तीनचे पॅनल निश्चित करण्यात आले आहे. चार सदस्यांच्या पॅनल पद्धतीमुळे प्रशासनाने अस्तित्वातील एकूण सहा प्रभाग समित्यांच्या भौगोलिक रचनेत बदल करण्याचा प्रस्ताव सोमवारी पार पडलेल्या महासभेत चर्चेसाठी आणला होता. त्यात भार्इंदर पश्चिमेकडील प्रभाग समिती कार्यालय १ अंतर्गत प्रभाग ८, २३ व २४ तर २ अंतर्गत प्रभाग १, ६ व ७ समाविष्ट करण्यात आले. भार्इंदर पूर्वेकडील प्रभाग समिती कार्यालय ३ अंतर्गत प्रभाग २, ३, ४, ५ व ११ तर ४ अंतर्गत प्रभाग १०, १२, १३ व १८ समाविष्ट करण्यात आले. तसेच मीरा रोड मधील प्रभाग समिती कार्यालय ५ अंतर्गत प्रभाग ९, १९, २०, २१ व २२ तर ६ अंतर्गत १४, १५, १६ व १७ समाविष्ट करण्यात आले. यातील भार्इंदर पश्चिमेकडील प्रभाग १, ६, ७, ८, २३ व २४ मधील एकूण २३ जागांपैकी भाजपाला १९ व सेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे प्रभाग समिती १ व २ मध्ये भाजपाचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाले आहे. भार्इंदर पूर्वेकडील प्रभाग २, ३, ४, ५, १०, ११, १२, १३ व १४ मधील एकूण ३६ जागांपैकी भाजपाला सर्वाधिक २३ जागा तर सेनेला १३ जागा मिळाल्या आहेत. यानुसार प्रभाग समिती ३ व ४ मध्ये देखील भाजपाचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले असले तरी प्रभाग समिती ३ मध्ये प्रभाग समिती ४ अंतर्गत असलेला प्रभाग १० समाविष्ट करण्याची सूचना सेनेकडून करण्यात आली. यामुळे भाजपाची सदस्य संख्या कमी होऊन त्यात सेनेचे वर्चस्व वाढविणार असल्याचे लक्षात येताच भाजपाने त्याला त्याला विरोध करुन प्रशासनाचा प्रभाग समिती ३ व ४ चा प्रस्ताव जैसे थे ठेवला. त्याला सेनेने जोरदार विरोध केला.

मीरा रोडमधील प्रभाग ९, १५, १६, १७, १८, १९, २०, २१ व २२ मधील एकूण ३६ जागांपैकी भाजपाला २०, काँग्रेसला १२ तर सेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. प्रभाग समिती ५ मध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपाने त्यातीलच काँग्रेसचे बालेकिल्ले ठरलेले प्रभाग ९ व १९ प्रभाग समिती ६ मध्ये समाविष्ट करण्याचा ठराव मांडला. भाजपाच्या या ठरावाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवून सत्ताधारी भाजपावर मनमानी कारभाराचा आरोप केला. यामुळे उठलेल्या गदारोळात उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी दोन्ही विरोधी पक्षांना नसलेली ताकद कशाला दाखवता, असा टोला लगावून जागेवरच बसण्याचे आवाहन  केले. यामुळे आणखी सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याने अखेर दोन्ही बाजूंनी मांडलेल्या ठरावावर महापौर डिंपल मेहता यांनी मतदान घेण्याचे निर्देश दिले. त्यात भाजपाने मांडलेला ठराव ६१ विरोधी ३४ या बहुमताने मंजूर झाल्याने सेना, काँग्रेसचा ठराव अल्पमतातच राहिला. याबाबत काँग्रेस नगरसेवक अनिल सावंत यांनी सांगितले की, प्रशासनाने सादर केलेल्या ठरावाला भाजपाने केराची टोपली दाखवून बहुमताच्या जोरावर प्रभाग समितीच्या भौगोलिक रचनेत बदल करण्याचा ठराव मंजूर केला आहे. तो आक्षेपार्ह असून तो रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. राज्य सरकारने त्याची दखल न घेतल्यास न्यायालयात दाद मागणार आहोत. 

Web Title: BJP has kept all the ward committees on the strength of majority; The army, the opposition opposes the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.