Atal Bihari Vajpayee : गगन में लहराता भगवा हमारा, डोंबिवली जनसंघाचा बालेकिल्ला असल्याचा वाजपेयींना होता आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 02:13 AM2018-08-17T02:13:17+5:302018-08-17T02:13:25+5:30

३१ डिसेंबर १९८० रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी डोंबिवलीस भेट दिली होती. आताच्या इंदिरा गांधी चौकात स्वामी विवेकानंदांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले होते.

 Atal Bihari Vajpayee Dombivali Visit News | Atal Bihari Vajpayee : गगन में लहराता भगवा हमारा, डोंबिवली जनसंघाचा बालेकिल्ला असल्याचा वाजपेयींना होता आनंद

Atal Bihari Vajpayee : गगन में लहराता भगवा हमारा, डोंबिवली जनसंघाचा बालेकिल्ला असल्याचा वाजपेयींना होता आनंद

Next

- अनिकेत घमंडी
डोंबिवली : ३१ डिसेंबर १९८० रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी डोंबिवलीस भेट दिली होती. आताच्या इंदिरा गांधी चौकात स्वामी विवेकानंदांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. डोंबिवली जनसंघाचा बालेकिल्ला आहे. गगन मे लहराता भगवा हमारा... या उक्तीला साजेसे वातावरण डोंबिवलीत असून त्याचा मनस्वी आनंद होतो, असे जनसंघाचे प्रचारक वाजपेयी त्यावेळी म्हणाले होते. तेव्हापासून आजतागायत डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला आहे, असे येथील जनसंघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी वाजपेयींच्या स्मृतींना उजाळा देताना सांगितले.
राजकारणातील एक महाऋषी अटलबिहारी वाजपेयींच्या रूपाने गुरुवारी पडद्याआड झाला. डोंबिवलीवर विशेष प्रेम करणाऱ्या वाजपेयींचे निधन ही समस्त डोंबिवलीकरांसाठी दु:खाची घटना आहे. त्यांचा सहवास लाभलेल्या डोंबिवलीतील काही मान्यवरांनी यानिमित्ताने त्यांच्या स्मृती विशद केल्या. वाजपेयी एकदोनवेळा डोंबिवलीत आले होते. प्रगल्भ हिंदुत्वाचा ते आविष्कार होते. काटकसरीने जीवन जगणे आणि जे जगणे ते केवळ देशासाठी. संपूर्ण आयुष्य त्यांनी संघ स्वयंसेवकांसारखे साधेपणाने जगले. त्यांचा सहवास हा मौल्यवान ठेवा असून त्यासाठी आम्ही स्वत:ला भाग्यवान समजतो, अशा शब्दांत माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी वाजपेयींच्या स्मृतींना उजाळा दिला.
डोंबिवलीनगरीत एकदा ते आले होते. त्यावेळी डॉ. यू.व्ही. राव यांच्याकडे त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या तत्कालीन उपनगराध्यक्षा वंदना कुलकर्णी यांच्या प्रकृतीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती. नगर परिषदेच्या स्थायी समितीचे तत्कालीन सभापती हरिहर कांत यांनीही त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. डोंबिवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण वाजपेयी यांनी केले होते. त्यावेळी टिळकनगर शाळेनजीकच्या पटांगणावर त्यांचे भाषण झाले होते. वाजपेयींना ऐकण्यासाठी पटांगणावर प्रचंड गर्दी झाली होती. त्यावेळी जनसंघाचा कष्टदायी प्रवास त्यांनी सर्वांसमोर मांडून, पक्षाची पुढील वाटचालही स्पष्ट केली होती. डोंबिवली हा जनसंघाचा बालेकिल्ला आहे. वाजपेयींनी त्याबद्दल अभिमान व्यक्त करून डोंबिवलीकरांवर विशेष प्रेम असल्याचे सांगताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. भाषणाला चांगली दाद मिळते, याचा अर्थ येथील नागरिक सुजाण आहेत. ते लक्षपूर्वक ऐकतात, जाणतात. सजगतेचे हे लक्षण असल्याचे वाजपेयी म्हणाले होते. त्यावेळी कै. रामभाऊ म्हाळगी यांचे कौतुक करताना वाजपेयी यांनी प्रशंसोद्गार काढले होते.
एका बँकेच्या उद्घाटनासाठी वाजपेयी पुन्हा एकदा डोंबिवलीत आले होते. या उपक्रमाचे वाजपेयींनी भरभरून कौतुक केले होते. डोंबिवलीतील मराठी मंडळी एकत्र येऊन भरपूर काम करतात. संघटनात्मक उपक्रमांमधून आनंद मिळवतात, हे सशक्त लोकशाहीसाठी उपयुक्त असल्याचेही ते म्हणाले होते.
अटलजींच्या निवडक ५१ कविता आबासाहेब पटवारी यांनी अनुवादित केल्या होत्या. गीत नवे गातो मी, हे त्या कवितासंग्रहाचे नाव आहे. त्याचे प्रकाशन संसद भवनमध्ये वाजपेयींच्या हस्ते करण्यात आले होते. दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनपटावर आधारित माझी जीवनगाथा हे पुस्तकही पटवारी यांनी अनुवादित केले होते. या पुस्तकाला वाजपेयींची प्रस्तावना असावी, असा मानस पटवारी यांनी कलाम यांच्याजवळ व्यक्त केला होता; पण ते प्रस्तावना देतील का, असा सवाल कलाम यांनी केला. त्यानंतर, पंतप्रधान वाजपेयींशी संपर्क साधला असता, त्यांनी होकार दिला. मात्र, राजशिष्टाचारामधील बड्या अधिकाºयाने तशी प्रस्तावना देता येणार नसल्याचे सांगितले. वाजपेयींनी त्यावर तातडीने तोडगा काढत, प्रस्तावना नही तो नही, पर शुभसंदेश तो दे सकता हुँ ना... असे म्हटल्यावर मात्र तो अधिकारी निरुत्तर झाला. प्रत्यक्षात, वाजपेयींनी शुभसंदेश नव्हे तर प्रस्तावनाच दिली आणि आम्हीही ती प्रसिद्ध केल्याचे पटवारी यांनी सांगितले.
अब्दुल कलाम किंवा वाजपेयी हे दोघेही कवी म्हणून एकाच उंचीचे आहेत. माझ्यासाठी त्या दोघांचे साहित्यातून एकत्र येणे, याचा आनंद गगनात मावेनासा होता, असे पटवारींनी सांगितले. अटलजींचा प्रस्तावनापर शुभसंदेश बघितल्यावर, आबासाहेब आपने तो कमाल कर दी... असे अब्दुल कलाम उत्स्फूर्तपणे म्हणाले होते.
वाजपेयींची स्मरणशक्ती विलक्षण होती, असे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी त्यांच्याविषयी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, प्रत्यक्षात त्यांच्याशी विशेष भेट झाली नाही. दिवंगत खासदार चिंतामण वनगांच्या प्रचारसभेसाठी ते पालघरमध्ये आले असता, निवडक पदाधिकाºयांसमवेत त्यांची भेट झाली. त्यानंतर, तब्बल २० वर्षांनी भेट झाल्यानंतर वाजपेयींनी नाव घेऊन आपले कुशल-मंगल विचारल्याचे पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांची वाजपेयींसमवेत तीनवेळा भेट झाली होती. त्या स्मृती जोगळेकर यांनी यानिमित्ताने जागवल्या.

स्वच्छ आणि पारदर्शी नेता काळाच्या पडद्याआड

आता इंदिरा गांधी चौक म्हणून ओळख असलेल्या आणि तेव्हाच्या स्वामी विवेकानंद चौकामध्ये स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष श्रीपाद ऊर्फ आबासाहेब पटवारी यांनी वाजपेयींना बोलावले होते. ंमात्र, या पुतळ्याचा खर्च कोण करणार आहे, नगर परिषदेवर त्याचा बोजा आहे का, निधीचे नियोजन कसे केले आहे, अशा अनेक मुद्यांवर वाजपेयींनी पटवारींकडून माहिती घेतली आणि मगच कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले. ते खºया अर्थाने स्वच्छ आणि पारदर्शी होते. सर्व प्रश्नांची माहिती घेतल्यानंतरच ते डोंबिवलीत आले होते.

शिफारस नसतानाही भेट
डोंबिवलीमधून डॉ. उपासनी दिल्लीला गेले होते. त्यांना वाजपेयींना भेटण्याची इच्छा होती; मात्र त्यांच्याजवळ कोणतेही पत्र किंवा शिफारस नव्हती. सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. अटलजींना असे भेटता येणार नसल्याचे त्यांनी उपासनी यांना सांगितले. मात्र, डोंबिवलीचे कुणीतरी आल्याचे कळल्यानंतर कोणताही शिष्टाचार न पाळता वाजपेयींनी डॉ. उपासनी कुटुंबीयांची भेट घेऊन चहापान केले होते.

Web Title:  Atal Bihari Vajpayee Dombivali Visit News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.