सलाम न केल्याने तरुणाचा हात छाटला!
By admin | Published: August 22, 2014 02:01 AM2014-08-22T02:01:39+5:302014-08-22T02:01:39+5:30
सलाम न केल्याबद्दल 17 वर्षाच्या तरुणाचा हात छाटण्याची धक्कादायक घटना विरुधुनगर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे.
Next
मदुराई : महिला सरपंचाचा पती आपल्या भावांसह गावात फेरफटका मारत असताना आदराने उठून त्याला सलाम न केल्याबद्दल 17 वर्षाच्या तरुणाचा हात छाटण्याची धक्कादायक घटना विरुधुनगर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. मुकुल्लम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा क्रूर प्रकार मंगळवारी घडला. नरीकुडी ग्रुप ग्रामपंचायतीमधील सिरुवनूर गावात देवी या महिला सरपंच आहेत. त्यांचे पती कार्तिक रामादुराई आणि त्यांचे दोन भाऊ रविवारी गावात फेरफटका मारत होते तेव्हा 17 वर्षाचा कृष्णन आपल्या घराबाहेरील ओटय़ावर बसला होता.
आपल्याला पाहून कृष्णनने उठून सलाम करावा, अशी गुर्मीत असलेल्या कार्तिकची अपेक्षा होती. पण कृष्णन तसाच बसून राहिला. त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. पण गावक:यांनी समजूत घातल्यावर कार्तिक निघून गेला.
कृष्णन शिवगंगा येथे मोलमजुरी करतो व काही दिवसांसाठी घरी आला होता. झाल्या प्रकाराचा कार्तिक डूक ठेवेल अशी कृष्णनच्या आईला भीती वाटली व म्हणून तिने त्याला काही दिवस गावात न राहता शिवगंगा येथे जाऊन राहण्याचा सल्ला दिला.
पोलिसांनी सांगितले की, आईचा सल्ला ऐकून कृष्णन मंगळवारी शिवगंगा येथे जाण्यासाठी निघाला. परंतु कार्तिक व कन्नन आणि कुमार या त्याच्या दोन भावांनी त्याला वाटेतच अडविले व त्याला एका झुडपामागे फरफटत नेऊन त्याचा डावा हात छाटला. हाताचा काही भाग छाटलेला कृष्णन नंतर गावक:यांना बेशुद्धावस्थेत आढळला. ते त्याला घेऊन तातडीने मदुराईच्या राजाजी सरकारी इस्पितळात आले. हाताचा छाटलेला भाग तासाभरात आणला तर तो पुन्हा जोडता येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. रात्री उशिरा गावात परत येऊन गावक:यांनी बराच शोध घेतला पण तुटलेल्या हाताचा भाग सापडेर्पयत सकाळचे 7 वाजले. तोर्पयत हात पुन्हा जोडण्याच्या दृष्टीने बराच उशीर झाला होता. कृष्णनवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून कार्तिक, कन्नन व कुमार यांचा शोध सुरू आहे. (वृत्तसंस्था)
महिलांची सत्ता नाममात्र
भारतात लोकशाही असली तरी ग्रामीण भागात ती किती सरंजामी वृत्तीने राबविली जाते याचे विदारक चित्र यामुळे पुन्हा एकदा समोर आले आहे. पंचायत राज व्यवस्थेत आरक्षणामुळे महिला सरपंच होत असल्या तरी अनेक वेळा त्यांचे पतीच सत्ता गाजवीत असतात हे सत्यही यातून अधोरेखित झाले आहे.