निश्चयाने मोदींनी गाठले मौदा
By Admin | Published: August 22, 2014 01:37 AM2014-08-22T01:37:59+5:302014-08-22T01:37:59+5:30
प्रतिकूल हवामानामुळे एटीसी, पायलट यांनी पंतप्रधानांना मौदा येथे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. धुंवाधार पाऊस ऐकायला तयार नव्हता. शेवटी सुरक्षा अधिकाऱ्यांनी (एसपीजी)
प्राईम मिनिस्टर बाय रोड : मोदींना मौद्याला न्यायचे कसे?
नरेश डोंगरे - नागपूर
प्रतिकूल हवामानामुळे एटीसी, पायलट यांनी पंतप्रधानांना मौदा येथे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. धुंवाधार पाऊस ऐकायला तयार नव्हता. शेवटी सुरक्षा अधिकाऱ्यांनी (एसपीजी) पंतप्रधानांना बाय रोड मौद्याला नेण्याचे ठरवले. एसपीजींच्या या निर्णयाने नागपूर-महाराष्ट्राची सुरक्षा यंत्रणा हादरली. कारण मौद्याच्या कार्यक्रमस्थळापासून पाच किलोमीटरचा रस्ता गर्दीने फुलला होता. अशास्थितीत पंतप्रधानांना रस्त्यावरून नेणे म्हणजे ‘हाय रिस्क’! ती पत्करण्याची पोलीस यंत्रणेची तयारी नव्हती. वरिष्ठांचे मतभेद होण्यापर्यंतची वेळ आली अन् ... पाऊस ऐकला (थांबला!). वातावरण अनुकूल झाले. त्यामुळे पंतप्रधानांना घेऊन हेलिकॉप्टरचा ताफा मौद्याकडे रवाना झाला. मात्र, तो दीड-पावणे दोन तासांचा कालावधी अवघ्या सुरक्षा यंत्रणेची धाकधुक वाढवणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नियोजित वेळेनुसार विशेष विमानाने रांची (झारखंड) येथून आज दुपारी ३.०५ वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. पंतप्रधानांचे विमान धावपट्टीवर उतरत असतानाच धुंवाधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना विमानतळावरील व्हीआयपी लाऊंजमध्ये नेण्यात आले. तेथेच राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अतिमहत्त्वांचे व्यक्ती मा. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी यांनाही विमानतळावरून नेण्यात आले. दरम्यान, पंतप्रधानांना मौदा येथे नेण्यासाठी चार हेलिकॉप्टरचा ताफा तयार होता. परंतु अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, एक तास झाला तरी पाऊस थांबायला तयार नव्हता. हवामान प्रतिकूल झाल्यामुळे एटीसीसह विमानतळावरील वरिष्ठ, पायलट यांनी अशा हवामानात हेलिकॉप्टर उडविण्यास नकार दिला. पंतप्रधान मोदींना मौद्याला न्यायचे कसे, असा प्रश्न सुरक्षा अधिकाऱ्यांना अस्वस्थ करीत होता. आकाशातून शक्य नसल्यामुळे पंतप्रधानांना मौद्याला रस्त्याने (बाय कार) नेण्याचा निर्णय एसपीजीने घेतला.
सुरक्षा यंत्रणेवर दडपण
या निर्णयामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रचंड दडपण आले. कारण मौद्याच्या कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी एकच रस्ता होता. पंतप्रधान येणार म्हणून हा रस्ता सुमारे पाच किलोमीटरपर्यंत अक्षरश: फुलला होता. मिळेल त्या वाहनाने कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी नागगरिकांची, भाजपा कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. अशास्थितीत या रस्त्यावरून पंतप्रधानांना वाहनाने नेणे अत्यंत धोक्याचे (हाय रिस्क) होते. हा धोका पत्करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तयार नव्हती. सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये ‘आॅन एअर’ गंभीर चर्चा सुरू झाली. पंतप्रधानांना रस्त्याने नेण्याला अनेक अधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला होता.
सुरक्षा व्यवस्थेची अग्निपरीक्षा
पंतप्रधानांना नागपूर विमानतळावरून मौदा येथील कार्यक्रमस्थळी वाहनातून नेण्याचे दिव्य नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण पोलीस या दोघांनाही पार पाडायचे होते. कारण नागपूर शहरातील सुरक्षेची जबाबदारी शहर पोलीस दल तर, नागपूर बाहेरची नेण्या-आणण्याची सुरक्षा व्यवस्था नागपूर ग्रामीण पोलिसांना सांभाळायची होती. नाही म्हणायला ही व्यवस्था (अर्धीअधुरी) शहर आणि ग्रामीण पोलिसांनी करूनही ठेवली होती. मात्र, सकाळपासून दुपारी २.३० पर्यंत वातावरण स्वच्छ असल्यामुळे या व्यवस्थेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. त्यात पावसाने रस्ता खराब केला, अन् सुरक्षा व्यवस्थेची अग्निपरीक्षा घेणे सुरू केल्यामुळे शहर आणि ग्रामीण पोलिसांवर अचानक मोठे दडपण आले. सुरक्षा अधिकाऱ्यांमधील कुजबूज वाढली. मोठा धोका नजरेसमोर असल्यामुळे अखेर मौद्याचा कार्यक्रम (पंतप्रधानांचा दौरा) रद्द करण्यावर दुपारी ४.१५ च्या सुमारास एकमत होऊ लागले.
वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, मौदा दौरा रद्द करण्यासाठी सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांची अनुमती घेण्याचीही तयारी केली. मात्र, पंतप्रधान मोदींना मौद्यात जायचेच होते.