मोबाईल टॉवर्स धोकादायक
By Admin | Published: August 3, 2015 02:22 AM2015-08-03T02:22:32+5:302015-08-03T02:22:32+5:30
आधुनिक युगात सर्वांच्या हाती मोबाईल खुळखुळू लागला आहे. विजेप्रमाणेच मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे.
उच्च दाब लहरी : मानवी शरीरावर होतोय विपरीत परिणाम
वणी : आधुनिक युगात सर्वांच्या हाती मोबाईल खुळखुळू लागला आहे. विजेप्रमाणेच मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. मात्र गावोगावी या मोबाईलसाठी उभारण्यात येणारे टॉवर्स धोकादायक ठरत आहे. त्यांचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
सध्या आधुनिकतेचा काळ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली आहे. दळवळणाची विविध साधने उपलब्ध झाली आहे. संपर्कासाठीही विविध साधने उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जग आता अत्यंत जवळ येत आहे. क्षणात हजारो किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधणे अत्यंत सोपे झाले आहे. त्यासाठी पूर्वी लॅण्ड लाईनचा वापर केला जात होता. आता त्यात भ्रमणध्वनीची भर पडली आहे. परिणामी आजच्या युगात भ्रमणध्वनीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
ग्रामीण भागातही आता भ्रमणध्वनी पोहोचले आहे. अगदी गुराख्याच्या हातातही भ्रमणध्वनी दिसून येत आहे. गावोगावी एकाच घरात अनेक भ्रमणध्वनी आले आहेत. प्रत्येकाच्या हातात भ्रमणध्वनी खुळखुळत आहे. एकाच कुटंबातील जवळपास सर्वच सदस्यांकडे भ्रमणध्वनी आले आहेत. एकाच व्यक्तीकडे दोन ते तीन भ्रमणध्वनीही दिसून येत आहे. या भ्रमणध्वनीच्या ‘कव्हरेज’साठी अनेक शहरे आणि गावांमध्ये विविध कंपन्यांनी टॉवर्स उभारले आहेत. आता तेच टॉवर्स सर्वांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावोगावी आणि शहरात उभारण्यात आलेल्या टॉवर्समार्फत भ्रमणध्वनी कंपनी ग्राहकांना सेवा देते. या टॉवर्समधून उच्च प्रतीच्या लहरी निघतात. त्या उच्च लहरींमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या लहरींचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होतो, असे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. सोबतच पशुपक्ष्यांवरही त्यांचा विपरीत परिणाम होतो. टॉवर्स उभारण्यासाठी शासनाने काही नियम केले आहेत. मात्र त्यांचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही.
सन १९९६ मध्ये केंद्र शासनाने नवीन पर्यावरण संरक्षण कायदा तयार केला. मात्र त्या कायद्याची टॉवर्स उभारताना पायमल्ली होत आहे. त्या कायद्यानुसार टॉवर्स उभारणीसाठी विविध मागदर्शक तत्वे पाळण्याचे बंधन आहे. केंद्र शासनाच्या विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळाच्या सूचनेनुसार टॉवर्स व ब्रॉडबँड मशिनरीमधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानव, वनस्पती, प्राणी, पक्षी, मासे आणि सूक्ष्मजीवांवर पेशीय, उपपेशीय, रेणूविय, उपरेणूवीय जैवरासायनिक परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या लहरींमुळे मानवाला कर्करोग, हृदयरोग, डोळ्यांचे व हाडांचे आजार होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
शहरे आणि गावोगावी उभारण्यात आलेल्या या टॉवर्समधून निघणाऱ्या किरणोत्साराच्या लहरींमुळे बालकांना व्यंगत्व, आंधळेपणा येण्याची शक्यताही मंडळाने वर्तविली. सर्वच टॉवर २०० फूट उंच असतात. मात्र त्यातून निघणाऱ्या उच्च किरणोत्सार लहरी २०० फूट समांतर जमिनीस सिमेंट काँक्रीटच्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात, असेही मंडळाने स्पष्ट केले. त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरित परिणाम होतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गावागावांत असे धोकादायक टॉवर्स आता उभे आहेत.
भ्रमणध्वनीसाठी उभारण्यात आलेले टॉवर्स मानवाला अपायकारक ठरण्याचीच जादा शक्यता आहे. हे टॉवर्स विजेवर किंवा डिझेलवर चालतात. त्यातून प्रदूषणालाही चालना मिळत आहे. आता किमान नवीन टॉवर्स गाव तथा शहरापासून दूर उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)