ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न सत्यात उतरणार
By admin | Published: September 22, 2014 10:15 PM2014-09-22T22:15:05+5:302014-09-23T00:14:13+5:30
माणिकराव साळुंखे : भाऊराव पाटील जयंती सोहळ्यात दिली माहिती
सातारा : शाहू-फुले-आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्था निर्माण केली. कर्मवीरांनी पाहिलेले ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न संस्थेच्या शताब्दीपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत आशादायक घटना आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अॅड. रावसाहेब शिंदे होते. यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. अनिल पाटील, प्राचार्य आर. के. शिंदे, शहाजी डोंगरे, अॅड. के. व्ही. पाटील, अॅड. दिलावर मुल्ला, प्राचार्य नानासाहेब गायकवाड उपस्थित होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्था ही भारतीय शिक्षण व्यवस्थेची मातृसंस्था असून देशाच्या प्रगतीचा दर ठरविण्याचे पायाभूत कार्य कर्मवीर अण्णांच्या कार्यामुळे घडले. शिक्षण हे नाविन्याचा शोध घेणारे असावे. केवळ माहिती देणारे शिक्षण पुरेसे नसून कौशल्यावर आधारित शिक्षणपद्धती असावी.’
अॅड. शिंदे म्हणाले, ‘संस्थेने विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. बीपीओच्या माध्यमातून तसे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तोच रयत शिक्षण संस्थेचा गाभा असून भविष्यात ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले जाणार आहे.’
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य गणेश ठाकून यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. सहसचिव प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)