किल्ले रायगडवर ‘शिवशाही’
By Admin | Published: May 30, 2016 04:54 AM2016-05-30T04:54:33+5:302016-05-30T04:54:33+5:30
१७ व १८ जूनला तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार
मुंबई : हिंदवी स्वराज्याची राजधानी ‘किल्ले रायगड’ येथे १७ व १८ जूनला तिथीनुसार महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा होणार असून, यावेळी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिवशाही अवतरणार आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने हा सोहळा दरवर्षीप्रमाणे शिवकालीन इतमामात व विधीप्रमाणे साजरा होईल.
१९९५ सालापासून ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी तिथीप्रमाणे होत असलेल्या या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तसेच राज्याबाहेरीलही हजारो शिवभक्तांचा सळसळता उत्साह यावेळी अनुभवायला मिळतो. या दोनदिवसीय सोहळ्याची सुरुवात ज्येष्ठ शुध्द द्वादशीला (१७ जून) शिर्काई देवीच्या पूजनाने होईल. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीही साजरी करण्यात येणार असून, त्यानंतर गणेशपूजन व जगदीश्वर पूजन कार्यक्रम पार पडतील.
त्याचप्रमाणे सायंकाळी महाराजांच्या उत्सवमूर्तीचे शिवभक्तांनी आणलेल्य विविध जिन्नस व मिष्टान्नांनी तुलादान करून त्याचे प्रसाद म्हणून वाटप केल्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता गडावर ध्वजारोहण झाल्यानंतर शिवराज्याभिषेकाच्या मुख्य सोहळ्यास सुरुवात होईल. यावेळी वेदमंत्रांचा जप आणि वैदिक विधीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून किल्ले रायगडावर पहिल्या शिवराज्याभिषेकाच्या स्मृती जागवल्या जातील. यानंतर राजदरबाद ते जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात महाराजांची पालखी मिरवणूक निघेल. (प्रतिनिधी)
>या सोहळ्यासाठी पहाटे ५ पूर्वी शिवराज्याभिषेकासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी शिवभक्तांना केले आहे. गडावर शिवभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी समितीतर्फे दोन्ही दिवस न्याहरी, जेवण आणि चहापानाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यावेळी रात्रभर रोप-वे सुरू राहणार आहे.
>यामुळे शिवभक्तांची गैरसोय दूर होईल. शिवाय महाड एसटी डेपोमधून एसडी महामंडळाच्या वतीने अतिरिक्त बसेसही सोडण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून मिळाली.