बासमतीचा सुगंध ११० रुपयांनी महागला!
By admin | Published: November 18, 2015 11:49 PM2015-11-18T23:49:55+5:302015-11-18T23:50:28+5:30
बाजारातील सुरुवातच तेजीने : तुरडाळीपाठोपाठ तांदळालाही आला ‘भाव’
नाशिक : तुरडाळीच्या भाववाढीतून नागरिक सावरत नाही तोच तांदळाचा बाजारही अचानकपणे तेजीत आल्याने व्यापाऱ्यांबरोबरच नागरिकदेखील अवाक् झाले आहे. उच्च प्रतीच्या बासमती तांदळाच्या दरात किरकोळ बाजारात किलोमागे १०० ते ११० रुपयांनी वाढ झाली आहे.
बासमती तांदळाचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत; मात्र जुन्या तांदळाला नवीन तांदळाच्या तुलनेत कमी मागणी मिळते. त्यामुळे बाजारात तांदळाचे दर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवाळी आटोपल्यानंतर बाजारात येणारा नवीन तांदूळ तसेच आगामी लग्नसराई यामुळे तांदळाला मागणी अधिक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर तांदळाचा होणारा पुरवठा कमी पडल्यास बाजारात मागणी जास्त अन् पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे सध्या तांदळाचा दर अधिक उंची गाठण्याची शक्यता व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.
तांदळाचा साठा शासनाकडून करण्यात आल्याने तसेच तांदळाची निर्यात व अल्पवृष्टीचाही फटका तांदूळ उत्पादनाला बसला आहे. किरकोळ बाजारात चांगल्या प्रतीचा बासमती तांदूळ ७०-८० रुपये प्रति किलो दराने मिळत होता; मात्र सध्या १८० रुपयांपर्यंत चांगल्या प्रतीच्या बासमतीचा भाव पोहोचला आहे. (प्रतिनिधी)