‘सर्किट बेंच’साठी चार दिवसांत फाईल
By admin | Published: August 23, 2015 05:51 PM2015-08-23T17:51:35+5:302015-08-23T17:53:39+5:30
संकलनाचे काम सुरू : कृती समितीचे निमंत्रक राजेंद्र चव्हाण यांची माहिती
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ सहा जिल्ह्णांसाठी कोल्हापूर येथे स्थापन करावे, या खंडपीठ कृती समितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायाधीश शहा यांनी सहा जिल्ह्णांचे ठराव व संस्थानकाळातील कोल्हापुरातील खंडपीठाची माहिती मागविली आहे. ही माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून येत्या चार दिवसांत माहितीची फाईल मुख्य न्यायाधीश शहा यांच्याकडे सादर केली जाईल, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात शुक्रवारी (दि. २१) गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाच्या इमारतीमध्ये कृती समितीबरोबर मुख्य न्यायाधीश शहा यांची बैठक झाली. यावेळी कोल्हापूर कार्यक्षेत्रातील प्रलंबित खटले, प्रस्तावित सर्किट बेंचच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्णांचे कोल्हापूरपासून अंतर किती आहे, पक्षकारांना कोल्हापुरात येण्यासाठी कशा पद्धतीने सोय आहे याची माहिती घेतली. यावेळी अॅड. संभाजीराव मोहिते (कराड), श्रीकांत जाधव (सांगली), राजेंद्र चव्हाण, संतोष शहा, महादेवराव आडगुळे, माणिक मुळीक, प्रशांत चिटणीस, विवेक घाटगे आदींनी कोल्हापुरात सर्किट बेंच होण्यामागचे महत्त्व पटवून दिले होते. त्यानुसार शहा यांनी कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन व्हावे, या मागणीचे सहा जिल्ह्णांच्या ठरावाच्या प्रती व संस्थानकाळातील खंडपीठाची माहिती मागविली. कृती समिती निमंत्रक अॅड. चव्हाण, सुस्मित कामत, मिलिंद जोशी, विजय ताटे, धनश्री चव्हाण आदी सदस्य माहिती एकत्रित करण्याचे काम करत आहेत. रमेश कुलकर्णी यांच्याकडून १९३१ च्या संस्थानकाळात कोल्हापुरात उच्च न्यायालय, सुप्रीम न्यायालय सुरू असल्याचे पुराव्याचे पुस्तक त्यांनी घेतले आहे. तसेच सहा जिल्ह्णांतील प्रत्येक तालुक्यांचे ठराव गोळा करण्याचे काम सुरू आहे. ही सर्व एकत्रित माहिती जमा करून चार दिवसांच्या आत शहा यांना सादर केली जाणार असल्याचे अॅड. चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
तीन तालुक्यांशी चर्चा करणार
सोलापूर जिल्ह्णांतील अकरापैकी आठ तालुक्यांनी कोल्हापुरात ‘सर्किट बेंच’ स्थापन करण्याचे ठराव दिले आहेत परंतु सोलापूर शहर, अक्कलकोट व कर्माळा या तिन्ही तालुक्यांनी अद्याप ठराव दिलेले नाहीत. या तिन्ही तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करून ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.