मुफ्तींच्या मुक्ताफळांनी मोदी सरकारची कोंडी
By admin | Published: March 3, 2015 02:58 AM2015-03-03T02:58:09+5:302015-03-03T02:58:09+5:30
जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी संयुक्त सरकारचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद आपल्या वादग्रस्त आणि राष्ट्रविरोधी वक्तव्यावरून ठाम राहिल्याने त्याचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेत उमटले.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी संयुक्त सरकारचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहंमद सईद आपल्या वादग्रस्त आणि राष्ट्रविरोधी वक्तव्यावरून ठाम राहिल्याने त्याचे तीव्र पडसाद सोमवारी संसदेत उमटले. विरोधकांच्या बरोबरीने मित्रपक्ष शिवसेनाही आक्रमक झाल्याने भाजपाची कोंडी झाली आहे. मुफ्ती यांच्या वक्तव्याशी आपला संबंध नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली असली, तरी ती विरोधकांच्या पचनी पडलेली नाही.
लोकसभेत काँग्रेससह विरोधी पक्षांनी सरकार व भाजपावर घणाघाती प्रहार करीत पंतप्रधानांच्या स्पष्टीकरणाची आणि निंदाव्यंजक प्रस्ताव पारित करण्याची मागणी केली. त्यानंतर सभात्याग केला. तर राज्यसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ करीत मुफ्ती यांचे वक्तव्य राष्ट्रविरोधी असल्याचा आरोप केला. केंद्र सरकारने मात्र मुफ्तींच्या त्या वक्तव्याचा सरकार अथवा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मुफ्ती मोहंमद सईद यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आणि त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत हुर्रियत, अतिरेकी संघटना आणि सीमेपलीकडील लोकांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केले, असे वादग्रस्त विधान केले होते. शिवाय हेच मत मोदींकडेही मांडल्याचा दावा केला.
मतदानाचे श्रेय जनतेचे
जम्मू-काश्मिरात शांततापूर्ण वातावरणात विधानसभा निवडणुका पार पडल्याचे श्रेय तेथील जनता, निवडणूक आयोग आणि निमलष्करी दलाला जाते. राज्यातील लोक मोठ्या संख्येने मतदानात सहभागी झाले होते.
- राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री
वक्तव्याचा चुकीचा अर्थ
माझ्या वक्तव्याचा विनाकारण राईचा पहाड केला जात आहे. मी रविवारी पाकिस्तान आणि हुर्रियतबाबत जे काही बोललो त्यावर कायम आहे. खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी गोळ्या किंवा ग्रेनेड नाही, तर लोकशाही पद्धतीने निवडणुकांची गरज असल्याचे त्यांना समजले आहे. म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला नाही. - मुफ्ती मोहंमद सईद