विसापूरच्या गुप्त दरवाजाने घेतला मोकळा श्वास!
By admin | Published: May 30, 2016 04:35 AM2016-05-30T04:35:39+5:302016-05-30T05:46:00+5:30
. जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या काळात सलग येणारे सात रविवार त्यांनी या किल्ले संवर्धनासाठी खर्र्च केले आहेत.
अजय महाडिक,
मुंबई- शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील शेकडो गडकोटांची दुरवस्था सुरू असताना सह्याद्रीचे शिलेदार संघाच्या तब्बल ५० शिलेदारांनी मुंबईहून पुण्याला जाताना लोणावळा सोडले की, लागणाऱ्या विसापूरच्या किल्ल्याचे मातीमध्ये गाडले गेलेले दोन प्रवेशद्वार मोकळे केले. विशेष म्हणजे मुंबई, खोपोली आणि पुणे येथील अस्सल चारकमानी असताना स्वत:चे बिझी शेड्युल बाजूला ठेवून त्यांनी किल्ले संवर्धनाची ही मोहीम पार पाडली आहे. या संघामध्ये तीन वर्षांच्या मुलांपासून ६५ वर्षांच्या काकांचाही समावेश आहे. जानेवारी ते फेब्रुवारी २०१६ या काळात सलग येणारे सात रविवार त्यांनी या किल्ले संवर्धनासाठी खर्र्च केले आहेत.
आतापर्यंत या संघाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर २८ वेळा स्वच्छता मोहीम राबवली आहे. डिसेंबर २०१५ मध्ये केलेल्या विसापूरच्या सर्वेक्षणात त्यांना किल्ल्याचे दोन दरवाजे जवळपास आठ ते दहा फूट मातीमध्ये गाडले गेल्याचे आढळून आले. गत शंभर-सव्वाशे वर्षांत ही दुर्गती झाल्याचे अविनाश निंबाळकरे यांनी सांगितले. मग काय, या मंडळीने एकमेकांना संपर्क साधून ‘मिशन विसापूर’ मोहीम आखली. ८ जानेवारी २०१६ चा मुहूर्त ठरला. कुणी माळवली रेल्वे स्थानकावर उतरून तर कुणी आपल्या खासगी वाहनाने भाजे गावात पोहोचले. कारण, येथे आल्याशिवाय लोहगड व त्याच्या पाठी लपलेल्या विसापूरच्या किल्ल्याचे दर्शन होत नाही. लोणावळा (बोर) घाटाचे संरक्षण करण्यासाठीच या किल्ल्याची निर्मिती केली गेली.
सुमित आहेर, अविनाश निंबाळकर, शंकर बुर्डे, रोहिदास झंजाड, कुणाल आमले व सुमित वाणी या अनुभवी शिलेदारांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू झाली. विसापूर किल्ल्याची वाट तशी अरुंद होती. दुपारपर्यंत दरवाजाचा काही भाग मोकळा झाला, तरी पलीकडची बाजू दिसत नव्हती. काम सुरूच होते. संध्याकाळी ६ च्या सुमारास अथक परिश्रमानंतर दरवाजाच्या पलीकडून वाऱ्याची मंद झुळूक आली. दरवाजा दीड फूट उघडला गेला होता. शंकर बुर्डे व स्वप्नील गाडगे यांनी पहार घेऊन पलीकडचा गाळ काढला. दुसऱ्या दिवशी दोन्ही दरवाजांच्या दोन्ही बाजूंना काम सुरू करून जवळपास तीन फूट पायऱ्या मोकळ्या करण्यात आल्या. संध्याकाळपर्यंत दुसरा दरवाजाही एक फूट मोकळा झाला होता. असे करताकरता दोन महिन्यांत सलग सात मोहिमा राबवण्यात आल्या. साधारण दोन महिने प्रत्येक रविवार ‘सह्याद्रीचे शिलेदार संघ, महाराष्ट्र’ने विसापुरात घालवला.
शिलेदारांमध्ये गृहिणी व बच्चेकंपनीचा समावेश
या मोहिमेमध्ये गौरी आहेर, कीर्ती बुर्डे, नेहा होनकळसे, अर्चना उबाळे, रूपल देसाई, राजश्री पवार व नीलिमा म्हामुणकर या गृहिणींनी प्रत्यक्ष भाग घेतला. तर साई आहेर (५), अंशू बुर्डे (५), शौर्य झंजाड (८), दर्शील देसाई (३) यांनी खारीचा वाट उचलला.
खोदकामात सापडली तोफ
दुसऱ्या दिवशी खोदकाम सुरू असताना दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला सागर, अविनाश, स्वप्निल व प्रणय खिंड लढवत होते. काम सुरू असतानाच पहार कशावर तरी आदळली आणि खणऽऽ खणऽऽ असा आवाज आला. काय असेल... दुर्गमित्रांच्या मनी प्रश्नांनी गर्दी केली अन् काय, तोफ सापडली. जवळपास पाच फूट गाडली गेलेली तोफ सापडली होती. तोफ तेथेच गुप्त दरवाजात ठेवण्यात अर्थ नव्हता. अर्थात, ती चाळीस फूट वर न्यायची होती आणि वजन होते १ टन (एक हजार किलो). पहार आणि दोराच्या साहाय्याला होती हर हर महादेवची स्लोगन अन् बघताबघता ती वर चढली.