आम्हीच लय भारी
By admin | Published: November 22, 2014 02:05 AM2014-11-22T02:05:55+5:302014-11-22T02:05:55+5:30
विश्वचषक स्पर्धेपूर्वी होणा-या आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा आम्ही पुरेपूर फायदा उचलण्यास सज्ज असून, यजमानांपेक्षा आमचाच संघ लय भारी असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले
स्वदेश घाणेकर, मुंबई
विश्वचषक स्पर्धेपूर्वी होणा-या आॅस्ट्रेलिया दौऱ्याचा आम्ही पुरेपूर फायदा उचलण्यास सज्ज असून, यजमानांपेक्षा आमचाच संघ लय भारी असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत विराटमधील आत्मविश्वास जाणवत होता. ‘आॅसीं’ना त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्याची हीच योग्य संधी आहे. यापूर्वीही आम्ही असे केले आहे. २०११ङ्कमधल्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील अनुभव चांगला होता. हाच अनुभव संघाला विजय मिळवून देण्यासाठी सत्कर्मी लावेन, असे विराटने सांगितले.
या दौऱ्याकडे आव्हान म्हणून पाहत असल्याचे कोहली म्हणाला. रवी भाई ज्या पद्धतीने तरुणांना समजावतात ते सर्वांना प्रोत्साहित करणारे असते. या दौऱ्यावर भारत मोठा चमू घेऊन दाखल होत आहे, त्याबाबत कोहली म्हणाला, आॅस्ट्रेलियासमोर आव्हान उभा करणारा अंतिम अकराजणांचा संघ निवडल्यानंतर आत्मविश्वास वाढतो. जे संघाबाहेर असतील त्यांचाही येथील वातावरणात कसा खेळ करावा याचा अभ्यास होईल. एखादा खेळाडू जखमी झाल्यास आमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
यावेळी रवी शास्त्री म्हणाले, गेल्या अनेक वर्षांत धोनी फार कमी सामन्यांना चुुकला आहे. त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी वेळ द्यायला हवा. विराट पहिल्यांदाच कसोटी संघाचे नेतृत्व करीत असला तरी त्याची देहबोली ही २५ सामन्यांमध्ये नेतृत्व केल्याचा अनुभव असलेल्या कर्णधारासारखी आहे.