औष्णिक केंद्रातून ४,०२४ मेगावॉट वीजनिर्मिती
By admin | Published: May 30, 2016 04:50 AM2016-05-30T04:50:07+5:302016-05-30T04:50:07+5:30
राज्यातील सहा महाऔष्णिक वीज केंद्रातून चार हजार २४ मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे.
अजिंक्य वाघमारे,
दुर्गापूर (चंद्रपूर)- राज्यातील सहा महाऔष्णिक वीज केंद्रातून चार हजार २४ मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. परळी वीज केंद्र पाण्याअभावी गत एक वर्षापासून बंद आहे. याशिवाय अन्य कोणत्याही वीज केंद्राची पाण्याअभावी वीज निर्मिती प्रभावित झाली नसून सर्व वीज केंद्रांच्या जलाशयात जून अखेरपर्यंत पुरेल एवढा जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याअभावी वीज निर्मिती खंडीत होणार नाही. राज्यात महानिर्मितीचे एकूण सात औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहेत. प्रत्येक वीज निर्मिती केंद्राचे स्वतंत्र धरण व जलाशय आहे. वीज केंद्राला वर्षभर पुरेल एवढा पाण्याचा साठा साठवून ठेवण्याची या धरण व जलाशयांची क्षमता आहे. यंदा पाण्याच्या टंचाईमुळे वीज निर्मिती प्रभावित होईल, अशी भीती व्यक्त होत होती. मात्र परळी वीज केंद्र वगळता कोणत्याच वीज केंद्रावर जलसंकट ओढवले नाही. चंद्रपूर, नाशिक, खापरखेडा, पारस, भुसावळ या महाऔष्णिक वीज केंद्रात सुरळीत वीज निर्मिती सुरू आहे. कोराडी वीज केंद्रात चार संचापैकी केवळ एकाच संचातून वीज निर्मिती सुरू आहे. परळी वीज केंद्र पाण्याअभावी बंद आहे.