...तर १५ जुलैपासून शाळा बेमुदत बंद!
By admin | Published: May 30, 2016 04:47 AM2016-05-30T04:47:36+5:302016-05-30T04:47:36+5:30
१५ जुलैपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य शिक्षण बचाव निर्धार लढा समितीच्या रविवारच्या मेळाव्यात देण्यात आला.
कोल्हापूर : वेतनेतर अनुदान द्यावे, २० पटसंख्येखालील शाळा बंद करू नयेत, आदी मागण्यांकडे वेळोवेळी लक्ष वेधूनही शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे १५ जुलैपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा राज्य शिक्षण बचाव निर्धार लढा समितीच्या रविवारच्या मेळाव्यात देण्यात आला. समाजातील सर्वच घटकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी सोमवारपासून जागृती करणार असल्याचेही समितीने जाहीर केले.
विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे आतापर्यंतचे सर्वांत अधिक फसवे मंत्री असल्याची टीका केली. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आंदोलन मागे घेऊ नये. जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत शाळांचे कुलूप काढू नये, असेही त्यांनी सांगितले. माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे आपल्या भाषणात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन करीत असल्याचे जाणवले. त्यामुळे श्रोत्यांमध्ये काही शिक्षकांनी साळुंखे यांच्या मुद्द्यांवर आक्षेप घेत त्यांचे भाषण रोखल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. (प्रतिनिधी)
>आंदोलनाचा कार्यक्रम
दि. ३० मे ते १४ जून - लोकप्रतिनिधींना संपर्क.
१५ ते ३० जून -
राज्यभर मेळावे, जागृती करणे, काळ्या फिती लावून काम करणे.
४ जुलै : एक दिवस शाळा बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयामोर आंदोलन,
१५ जुलैपासून -
बेमुदत शाळा बंद.
>महत्त्वाच्या मागण्या
शाळा तेथे मुख्याध्यापक ठेवावेत
शिक्षक भरतीस परवानगी द्यावी
सन २०१५-१६ च्या संचमान्यतेस स्थगिती द्यावी
प्राथमिक शाळांना पाचवी ते आठवीचे वर्ग
जोडू नयेत
विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना त्वरित पगार द्या
कला-क्रीडा शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात
शिक्षकेतर सेवकांची नवीन आकृतिबंध करावा
प्राथमिक शाळेमध्ये लिपिक व सेवकांची पदे मान्य करावीत.